देशभरात कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या 22.17 टक्क्यांवर, 85 जिल्ह्यांमध्ये गेल्या 14 दिवसात एकही नवा रुग्ण नाही

| Updated on: Apr 27, 2020 | 6:45 PM

देशभरातील 85 जिल्ह्यांमध्ये गेल्या 14 दिवसात (Corona recovery rate) एकही नवा कोरोनाबाधित रुग्ण आढळलेला नाही, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

देशभरात कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या 22.17 टक्क्यांवर, 85 जिल्ह्यांमध्ये गेल्या 14 दिवसात एकही नवा रुग्ण नाही
Follow us on

नवी दिल्ली :देशभरातील 85 जिल्ह्यांमध्ये गेल्या 14 दिवसात (Corona recovery rate) एकही नवा कोरोनाबाधित रुग्ण आढळलेला नाही. तर देशातील 16 जिल्ह्यांमध्ये गेल्या 28 दिवसांपासून एकही नवा रुग्ण आढळलेला नाही. याशिवाय कोरोनावर मात करणाऱ्यांचं प्रमाण वाढत आहे. हे प्रमाण आता 22.17 टक्क्यांवर आलं आहे”, अशी दिलासादायक माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी दिली. केंद्रीय आरोग्य आणि गृह मंत्रालयाच्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते (Corona recovery rate).

“देशात गेल्या 24 तासात 1463 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर 60 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात 24 तासातील मृत्यूचा हा सर्वाधिक आकडा आहे. देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 28,380 वर पोहचला आहे. यापैकी 6,362 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर 886 रुग्णांचा बळी गेला आहे. देशात सध्या 21, 132 रुग्णांवर उपचार सुरु आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

दरम्यान, गेल्या 24 तासात 381 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशभरात आतापर्यंत 6,362 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, अशीदेखील माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली.

“कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज देशातील सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची व्हिडीओ कॉन्फरंन्सिंगद्वारे महत्त्वपू्ण बैठक झाली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. कोरोनासोबतच इतर आजारांवरही योग्य उपचार व्हायला हवा. आरोग्य कर्मचारी किंवा कुठल्याही व्यक्तीवर अन्याय व्हायला नको. आपली लढाई रुग्णाविरोधात नसून कोरोनाविरोधातील आहे. याशिवाय आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ला व्हायला नको, असं सांगण्यात आलं आहे”, असं लव अग्रवाल यांनी सांगितलं.

दरम्यान, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदने सर्व राज्यांना रॅपिड टेस्टिंग संदर्भात नवी गाईडलाईन जारी केली आहे. या गाईडलाईनमध्ये चीनकडून आलेल्या पीपीई किट्स न वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे, अशी माहितीदेखील यावेळी देण्यात आली.