रुग्णांकडून भरमसाठ फी आकारल्यास कारवाई, आरोग्यमंत्र्यांचा रुग्णालयांना इशारा

| Updated on: May 07, 2020 | 10:02 PM

रुग्णालयांनी रुग्णांकडून भरमसाठी फी आकारली तर त्या रुग्णालयांवर कारवाई केली जाईल, असा इशारा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे (Health Minister warns hospitals).

रुग्णांकडून भरमसाठ फी आकारल्यास कारवाई, आरोग्यमंत्र्यांचा रुग्णालयांना इशारा
Follow us on

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहेत (Health Minister warns hospitals). राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 18 हजार 162 वर पोहोचली आहे. अशा परिस्थितीत कोणत्याही रुग्णालयाने रुग्णांकडून भरमसाठी फी आकारली तर त्या रुग्णालयावर कारवाई केली जाईल, असा इशारा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे (Health Minister warns hospitals).

राजेश टोपे यांनी आज (7 मे) सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्य सरकार कोरोनाविरोधात लढण्यासाठी कोणकोणती उपाययोजना करत आहे, याबाबतही माहिती दिली. यावेळी त्यांनी रुग्णांकडून जास्त पैसे घेणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई केली जाईल, अशी माहिती दिली.

“आज अनेक रुग्णालये रुग्णांकडून वेगवेगळ्या पद्धतीने चार्जेस घेतात. रुग्णांकडून कुणी 1 लाख तर कुणी 50 हजार दररोज चार्जेस घेत असल्याच्या तक्रारी आमच्याकडे आल्या आहेत. मात्र, रुग्णांकडून असे भरमसाठ चार्जेस घेणं हे कधीही चालणार नाही. त्यासाठी अनेक वेगवेगळ्या कायद्यांचा विचार करुन आरोग्य विभाग आणि मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार एक निर्णय घेण्यात आला आहे. रुग्णालयांना मनाला वाटेल तो रेट ठरवता येणार नाही. त्यासाठी काही इन्शुरन्स कंपनींचा आधार असणार आहे. जिप्सा आणि टीपीए या संस्थांच्या आधारे रुग्णांलयांना चार्जेस ठरवावे लागतील”, असं आरोग्य मंत्र्यांनी सांगितलं.

“एका रुग्णालयाने रुग्णाला विनाकारण 1 लाख 40 हजार रुपये चार्जेस आकारले होते. महात्मा जोतिबा फुले योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर शिंदे यांना याबाबत कारवाई करण्याचं सांगण्यात आलं. अखेर कायद्यान्वे रुग्णालयाला ते पैसे रुग्णाला परत द्यावे लागले. रुग्णालांना रुग्णांकडून जास्त फी घेऊ देणार नाही. यासाठी सुधाकर शिंदे यांना प्राधिकृतपणे कारवाई करण्याचे अधिकार दिले आहेत. याबाबत तक्रारी असल्यास शिंदे यांच्याकडे करावी”, असं आवाहन राजेश टोपे यांनी केलं.

‘राज्यात 64 टेस्टिंग लॅब’

“राज्यात 2 लाखांपेक्षा जास्त लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 12 हजार लोकांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करण्यात आलं आहे. आपण टेस्टिंग मोठ्या संख्येने करतो आहोत. आतापर्यंत 2 लाख लोकांच्या टेस्ट करण्यात आल्या आहेत. आता टेस्टिंग लॅब संख्या 64 वर गेली आहे. त्यामुळे आपण दररोज 14 हजार टेस्ट करु शकतो. टेस्टिंग सुविधा वाढवलेल्या आहेत. टेस्टिंगमुळे रुग्णांची अचूक संख्या निदर्शनास येत आहे”,  असं आरोग्य मंत्र्यांनी सांगितलं.

‘मुंबईतील 10 हजार नागरिक क्वारंटाईनमध्ये’

“केंद्राच्या अधिकाऱ्यांनी इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत. राज्य सरकारचाही तोच आग्रह आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रविण परदेशी यांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनसाठी मैदान, वेगवेगळे हॉल्स उपलब्ध करुन देण्याची विनंती करण्यात आली आहे”, असं राजेश टोपे यांनी सांगितलं.

“धारावी सारख्या परिसरातील नागरिकांना उचलून दुसरीकडे ठेवत नाही, तोपर्यंत संसर्ग टाळता येणार नाही. त्यामुळे आयसीएमआरच्या नियमांनुसार जे क्लोज कॉन्टॅक्ट आहेत त्यांना क्वारंटाईन करण्यात यावं. मात्र, धारावीतील लोकांना त्यांच्या दहा बाय दहाच्या खोलीत ठेवून चालणार नाही. त्या खोलीत एक जरी पॉझिटव्ह आढळला तर सगळ्यांना उचलून बाहेर ठेवावच लागेल. मुंबईत आज 10 हजार लोक बाहेर ठेवले आहेत. पण तेवढ्यामध्ये पुरत नसेल तर आणखी जागा घ्यावी लागेल”, असं राजेश टोपे म्हणाले.

‘घाबरु नका, पण काळजी घ्या’

“कोरोनाबाधितांचा संख्या बघून घाबरु नका. संख्या तेवढी वाढलेली नाही. पण दुर्लक्षही करु नका. लोकांनी स्वत: हून समोर यावं, जेणेकरुन लवकर उपचार करता येईल. आपल्यामुळे लोकांनाही संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे सामाजिक जबाबदारी म्हणून समोर यावं”, असं आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केलं.