‘अनेक लग्न करुनही तो संतुष्ट झाला नाही’, कंगनाच्या आरोपांना अनुरागच्या दोन्ही पत्नींकडून प्रत्युत्तर

| Updated on: Sep 21, 2020 | 11:26 PM

कंगना रनौतने अनुराग कश्यप अनेक लग्न करुनही संतुष्ट झाला नसल्याचं म्हणत टीका केली. याला अनुरागच्या दोन्ही पत्नींनी प्रत्युत्तर दिलं आहे (Kalki Koechlin and Aarati Bajaj respond on Anurag Kashyap).

अनेक लग्न करुनही तो संतुष्ट झाला नाही, कंगनाच्या आरोपांना अनुरागच्या दोन्ही पत्नींकडून प्रत्युत्तर
Follow us on

मुंबई : दिग्दर्शक आणि निर्माता अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचे आरोप झाल्यानंतर बॉलिवूडमधील अनेक आघाडीच्या अभिनेत्री त्याच्या बाजूने उभ्या राहिलेल्या दिसत आहेत. त्यांनी अभिनेत्री पायल घोषचे आरोप फेटाळून लावले आहेत. विशेष म्हणजे या आरोपांनंतर कंगना रनौतने अनुराग कश्यप अनेक लग्न करुनही संतुष्ट झाला नसल्याचं म्हणत टीका केली. याला अनुरागच्या दोन्ही पत्नींनी प्रत्युत्तर दिलं आहे (Kalki Koechlin and Aarati Bajaj respond on Anurag Kashyap).

अभिनेत्री पायल घोषनं नुकताच दिग्दर्शक अनुराग कश्यपवर 2014 मध्ये लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला. त्यानंतर मी टू मोहिमेला पुन्हा एकदा हवा मिळाली आहे. पायल घोषनं थेट अनुराग कश्यप विरोधात पोलिसात तक्रार करण्याचा निर्णय घेतलाय. अनुराग कश्यपकडून त्याच्या वकील प्रियंका खेमानी यांनी अनुरागची बाजू मांडत सर्व आरोप फेटाळले आहेत. खेमानी म्हणाल्या, “पायल घोषने केलेले सर्व आरोप खोटे आणि दुर्भाग्यपूर्ण आहेत. यातून मी टू सारख्या आंदोलनाचा चुकीचा वापर होतोय. कोणाचं चारित्र्य हनन करण्यासाठी आणि शस्त्राप्रमाणं मी टू मोहिमेचा दुरुपयोग केला जातोय. यामुळे खरंच पीडित आहेत त्यांना वेदना होणार आहे.”

पायल घोषच्या आरोपांनंतर कंगना रनौतनं अनुराग कश्यपला अटक करण्याची मागणी केली. त्यानंतर कंगनाने आता बॉलिवूडवर आणखी गंभीर आरोप केलाय. ती म्हणाली, “अनुरागनं हे स्वीकार केलंय की अनेक लग्न केल्यावरही तो कधी संतुष्ट झाला नाही. अनुरागनं जे पायल घोषसोबत केलंय, ती बॉलिवूडमध्ये सामान्य गोष्ट आहे. इथं संघर्ष करणाऱ्या बाहेरील तरुणींसोबत सेक्स वर्करसारखा व्यवहार केला जातो.”

अभिनेत्री ऋचा चढ्ढा, माही गिल आणि हुमा कुरेशी या अनुरागसोबत कंफर्टेबल असायच्या असं अनुराग म्हटल्याचाही दावा पायल घोषनं केलाय. मात्र, यानंतर तात्काळ अभिनेत्री ऋचा चढ्ढाने पायल घोषचे दावे फेटाळले असून तिच्याविरोधात कायदेशीर कारवाई करत नोटीस बजावली आहे. कंगना पायलच्या बाजूनं उभी राहिलीय, तर इकडे मी टू मोहिमेतून लैंगिक शोषणाचे आरोप झाल्यावरही अनुरागच्या बाजूनं बॉलिवूडमधून आवाज उठवलाय.

अनुरागची पहिली पत्नी आरती बजाज इंन्स्टाग्रामवर पोस्ट करुन अनुराग कश्यपच्या बाजूनं उभी राहिलीय. तिने अनुरागवर अनेक लग्नांवरुन केलेल्या शेरेबाजीवर कंगनाला सडेतोड उत्तर दिलंय. आरती बजाज म्हणाल्या, “हा आतापर्यंतचा सर्वात घाणेरडा स्टंट आहे. आधी मला याचा खूप राग आला, मात्र त्यानंतर हसू आलं. कारण मुद्दाम करण्यात आलेल्या आरोपांनंतर होणार तरी काय? तुलाही या परिस्थितीतून जावं लागत आहे याचा मला खेद वाटतो. तू उभा राहा आणि आवाज उठवत राहा, आम्ही सर्वजण तुझ्यावर प्रेम करतो.”

अनुराग कश्यपची दुसरी पत्नी अभिनेत्री कल्कीने देखील अनुरागसोबत उभे असल्याचं सांगितलं आहे. तु तुझ्या कामाच्या ठिकाणी नेहमीच स्त्रीयांना सुरक्षित वाटेल असे निर्णय घेतले आहेस, असं म्हणत कल्कीने अनुरागची बाजू घेतली.

अभिनेत्री तापसी पन्नूनंही अनुरागला जाहीरपणे समर्थन दिलंय. ती म्हणाली, “तू माझा मित्र आहेस, कारण सर्वात मोठ्या स्त्रीवादी व्यक्तीला मी ओळखते. तुझ्या नव्या सेटवर लवकर भेट होईल. ज्यात दाखवलं जाईल की, तू बनवलेल्या दुनियेत महिला किती शक्तीशाली आणि सार्थक आहेत.”

दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनीही अनुराग कश्यपची बाजू घेत, ज्याही महिला आणि अभिनेत्री अनुरागच्या बाजूनं उभ्या राहत आहेत, त्यांना धन्यवाद दिलं. ऑस्कर विजेत्या निर्मात्या गुनित मोंगा यांनीही अनुराग कश्यपसाठी ट्विट केलंय. अनुराग कश्यप काय आहे, हे ट्विटवर सांगण्याची गरज नाही. मी टू मोहिमेचा नाश करण्साठी काहींचा अजेंडा आहे, असं मत गुनित मोंगा यांनी व्यक्त केलं.

मी टू मोहिमेत आतापर्यंत नाना पाटेकरांपासून साजिद खान, अनू मलिक, कैलाश खेर, आलोक नाथ यांच्यासारखे अनेक जण अडकलेत. एवढंच काय एम जे अकबर यांनाही केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आता 6 वर्षांनी पायलनं अनुरागवर आरोप केलेत. पोलिसांमध्येही तक्रार केल्यानंतर या प्रकरणी पोलीस तपासात सत्य बाहेर येईलच. मात्र सध्या तरी पायल घोषच्या आरोपांवर बॉलिवूडमधूनच शंका उपस्थित केल्या जात आहेत.

Kalki Koechlin and Aarati Bajaj respond on Anurag Kashyap