‘क्यार’नंतर आता राज्यात ‘महा’चक्रीवादळाचे सावट, वादळाची नेमकी दिशा काय?

| Updated on: Nov 04, 2019 | 11:55 PM

संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्याची परिस्थिती असतानाच आता अरबी समुद्रात झालेल्या "महा" चक्रीवादळाचा फटका राज्याला बसणार (Maha Cyclone Hit Gujarat and Maharashtra) आहे.

क्यारनंतर आता राज्यात महाचक्रीवादळाचे सावट, वादळाची नेमकी दिशा काय?
Follow us on

मुंबई : संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्याची परिस्थिती असतानाच आता अरबी समुद्रात झालेल्या ‘महा’ चक्रीवादळाचा फटका राज्याला बसणार (Maha Cyclone Hit Gujarat and Maharashtra) आहे. यामुळे सुलतानी संकटाला तोंड देत असतानाच पुन्हा अस्मानी संकट समोर उभे ठाकले (Maha Cyclone Hit Gujarat and Maharashtra) आहे.

परतीच्या पावसानं राज्यात हाहाकार उडवलेला असताना आता राज्यासमोर महाचक्रीवादळाचं संकट घोघांवत आहे. परतीच्या पावसामुळे बळीराजाला मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागत आहे. त्याच्या हाताशी आलेलं पीकदेखील वाया गेलं आहे. त्यामुळे आता जगायचं तरी कसं? आणि करायचं तरी काय? असा प्रश्न त्याला पडला आहे. या साऱ्या गोष्टी कमी होत्या म्हणून की काय राज्यासमोर आता चक्रीवादळाचं संकट उभं ठाकलं आहे.

येत्या 6 ते 8 नोव्हेंबरदरम्यान उत्तर कोकणासह, उत्तर मध्य महाराष्ट्राला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी विजेच्या गडगडाटासह पाऊस होईल असा इशारा देखील हवामान विभागानं दिला आहे. त्याशिवाय मच्छिमारांनी देखील समुद्रात जाऊ नये, असं आवाहन हवामान विभागानं केलं आहे. या पार्श्वभूमीवर एनडीआरएफच्या तुकड्या महत्त्त्वाच्या ठिकाणी रवाना करण्यात आल्या आहेत.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रात ‘महा’नावाचे चक्रीवादळ निर्माण झाले आहे. राज्यात विशेषत: पालघर आणि ठाणे जिल्ह्यात अधिक सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. हे चक्रीवादळ गुजरात किनाऱ्याला धडकल्यावर त्याचा परिणाम महाराष्ट्रात जाणवण्यास सुरुवात (Maha Cyclone Hit Gujarat and Maharashtra) होईल.

महा चक्रीवादळाचे मुख्य प्रभाव क्षेत्र गुजरातमध्ये आहे. दीव आणि पोरबंदरमधून येत्या 6 नोव्हेंबर मध्यरात्री किंवा 7 नोव्हेंबरला सकाळच्या वेळी प्रभाव क्षेत्रात निर्माण होण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात त्याचा वेग कमी असेल. मात्र महाराष्ट्रातील उत्तर कोकण किनारपट्टीवर वादळी वारे वाहतील. पालघर, ठाणे आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.

पुढील तीन दिवस मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये. तसेच जे मच्छिमार समुद्रात गेले आहेत. त्यांनी तातडीनं परत यावे. मच्छिमारांनी परतताना जवळच्या बंदरावर आसरा घ्यावा, असे आवाहन राज्याचे मुख्य सचिव अजोय महेता यांनी केले आहे.

या चक्रीवादळामुळे पालघर, ठाणे तसेच मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पालघरमधील एकूण 67 गावांसह समुद्रकिनाऱ्यावरील गावांमध्ये जाहीर आवाहन करण्यात आलं आहे.  तसेच गावातील तात्पुरती निवारा व्यवस्था करण्यात आली आहे. त्याशिवाय 6 नोव्हेंबरपासून 8 नोव्हेंबरपर्यंत शाळा कॉलेज बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले (Maha Cyclone Hit Gujarat and Maharashtra) आहेत.

या जिल्ह्यात एकूण मच्छीमारांच्या 2774 बोटी आहेत. यातील 288 बोटी समुद्रात मासेमारीसाठी गेल्या असून त्यापैकी 150 बोटी रोज ये-जा करणाऱ्या असल्याने त्या परतण्याची शक्यता आहे. तर 138 बोटी 10 नोटिकल मैलापेक्षा आत मासेमारी समुद्रकिनारी परतण्याच्या सूचना देण्याचे प्रयत्न सुरु आहेत.