ऑल द बेस्ट! ‘दहावीची लढाई’ सुुरु, 17 लाख विद्यार्थी परीक्षेला

| Updated on: Mar 03, 2020 | 8:06 AM

यंदा राज्यभरातून 17 लाख 65 हजार 898 विद्यार्थी दहावीची परीक्षा देणार आहेत. यात 9 लाख 75 हजार 894 विद्यार्थी, तर 7 लाख 89 हजार 898 विद्यार्थिनींचा समावेश आहे

ऑल द बेस्ट! दहावीची लढाई सुुरु, 17 लाख विद्यार्थी परीक्षेला
Follow us on

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात होत आहे. 3 मार्च ते 23 मार्च 2020 या कालावधीत परीक्षा होणार असल्याची माहिती बोर्डाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी दिली. (Maharashtra Board SSC Exam Updates)

यंदा राज्यभरातून 17 लाख 65 हजार 898 विद्यार्थी दहावीची परीक्षा देणार आहेत. यात 9 लाख 75 हजार 894 विद्यार्थी, तर 7 लाख 89 हजार 898 विद्यार्थिनींचा समावेश आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 65 हजार परीक्षार्थींची वाढ आहे. तर 80 उपद्रवी केंद्र असून नाशिक विभागात सर्वाधिक आहेत.

यंदाही ऑनलाइन हॉल तिकीट उपलब्ध करुन दिल्याचे मंडळाने स्पष्ट केले. परीक्षेत कोणताही गैरप्रकार होऊ नये म्हणून राज्यभरात मिळून 273 भरारी पथके नेमण्यात आली आहेत. ही पथके ‘गैरमार्गाशी लढा’ या नावाने काम करणार आहेत. यामध्ये महिलांचे एक विशेष पथक काम करणार आहे. याशिवाय प्रत्येक विभागीय मंडळात हेल्पलाईन तयार करण्यात आल्या असून विद्यार्थ्यांना, पालकांना येणाऱ्या अडचणींवर या माध्यमातून 24 तास मार्गदर्शन करण्यात येईल.

परीक्षेसाठी 4 हजार 979 परीक्षा केंद्र आहेत. तर विद्यार्थ्यांनी परीक्षेला अर्धा तास वेळेवर उपस्थित राहण्याची सूचना करण्यात आली. त्याचबरोबर बारावीप्रमाणे दहावीच्या प्रश्नपत्रिकाही सीलबंद पाकिटात येणार आहेत. विद्यार्थ्यांच्या सहीने हे पाकीट उघडलं जाणार आहे.

तोंडी परीक्षा आणि प्रात्यक्षिक परीक्षा राहिलेल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा 24 आणि 26 मार्च रोजी होणार आहेत. सकाळच्या सत्रात पेपर असल्यास साडेदहा वाजता, तर दुपारच्या सत्रात पेपर असल्यास अडीच वाजता उपस्थित राहणे बंधनकारक असेल. उत्तरपत्रिका आणि पुरवण्यांची अदलाबदल होऊ नये, म्हणून सर्व पुरवण्या आणि उत्तरपत्रिकांवर बारकोडची छपाई करण्यात आली आहे. (Maharashtra Board SSC Exam Updates)