Corona | महाराष्ट्राने दहा हजारांचा टप्पा ओलांडला, चार जिल्ह्यांत हजाराहून अधिक कोरोनाग्रस्त

| Updated on: May 01, 2020 | 8:47 AM

महाराष्ट्रातील मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे आणि पुणे या चार जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी एक हजाराहून अधिक रुग्ण आहेत. (Maharashtra Corona Patients crosses ten thousand)

Corona | महाराष्ट्राने दहा हजारांचा टप्पा ओलांडला, चार जिल्ह्यांत हजाराहून अधिक कोरोनाग्रस्त
Follow us on

मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांनी दहा हजारांचा टप्पा ओलांडला आहे. काल दिवसभरात (30 एप्रिल) राज्यात तब्बल 583 नवे रुग्ण आढळल्यामुळे कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 10 हजार 498 वर गेला आहे. राज्यातल्या 4 जिल्ह्यांत प्रत्येकी एक हजाराहून अधिक रुग्ण आहेत. (Maharashtra Corona Patients crosses ten thousand)

एकट्या मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा सात हजारांच्या पार गेल्यामुळे चिंता वाढली आहे. तर पुण्यातील रुग्णांची संख्याही बाराशेच्या घरात आहे. राज्यात आतापर्यंत 459 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रातील मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे आणि पुणे या चार जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी एक हजाराहून अधिक रुग्ण आहेत. संपूर्ण मुंबईत 7061, तर पुणे जिल्ह्यात एकूण 1700 रुग्ण आढळले आहेत. नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, पालघर, पनवेल इत्यादी क्षेत्रांचा समावेश असलेल्या ठाणे मंडळात एकूण 1183 कोरोनाग्रस्त आहेत.

महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यांत प्रत्येकी 100 हून अधिक रुग्ण आढळले आहेत. नाशिक, नागपूर, औरंगाबादमध्ये शंभरच्या वर रुग्ण आहेत. तर सोलापुरातील रुग्णसंख्या शंभरीच्या उंबरठ्यावर आहे. एकट्या मालेगावात दीडशेहून अधिक रुग्ण सापडल्याने नाशिकची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे.

ग्रीन झोनमध्ये तीन जिल्हे

राज्यात 36 पैकी 17 जिल्हे रेड झोनमध्ये, 16 जिल्हे ऑरेंज, तर तीन जिल्हे ग्रीन झोनमध्ये आहेत. अमरावती, जळगावमधील कोरोना मृत्यूदर काहीसा चिंताजनक आहे. अमरावतीत 35 रुग्णांची नोंद झाली असून 7 बळी गेले आहेत, तर जळगावात 37 रुग्णांची नोंद झाली असून 9 जणांना प्राण गमवावे लागले आहेत

दरम्यान, 21 दिवस ज्या जिल्ह्यात ‘कोरोना’चे संक्रमण होणार नाही, असे जिल्हे ग्रीन झोनमध्ये राहणार आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या निर्देशानुसार आधी 28 दिवसांचा कालावधी होता, परंतु हा निकष बदलून आता 21 दिवसांचा करण्यात आला आहे.

राज्यात आतापर्यंत 1 लाख 45 हजार 798 लोकांची तपासणी करण्यात आली आहे. याशिवाय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य कर्मचाऱ्यांच्या 10 हजार 92 पथकांनी घरोघरी जाऊन सर्वेक्षण केलं.