पोलिसांना विश्रांतीची गरज, केंद्राची 20 सुरक्षा पथकं पाठवा, राज्याची केंद्राकडे मागणी

| Updated on: May 13, 2020 | 1:47 PM

राज्य सरकारने पोलिसांच्या मदतीला केंद्रीय सुरक्षा पथकांची मागणी केली आहे. केंद्राने 20 पथकं महाराष्ट्रात पाठवावी, अशी मागणी राज्य सरकारने केली आहे.

पोलिसांना विश्रांतीची गरज, केंद्राची 20 सुरक्षा पथकं पाठवा, राज्याची केंद्राकडे मागणी
Follow us on

मुंबई : राज्य सरकारने पोलिसांच्या मदतीला केंद्रीय सुरक्षा पथकांची मागणी केली आहे. केंद्राने 20 पथकं महाराष्ट्रात पाठवावी, अशी मागणी राज्य सरकारने केली आहे. (Maharashtra government request Deployment Of Central Forces) “राज्यात कोरोनामुळे पोलीस दल अहोरात्र कार्यरत आहे. त्यामुळे त्यांच्यावर अतिरिक्त कामाचा भार पडत आहे. याखेरीज रमजान आणि येणारा ईद सण तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी राज्य पोलिस दलाच्या मदतीसाठी केंद्राकडे केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या (CAPF) वीस कंपन्यांची मागणी करण्यात आली”, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

महाराष्ट्रात राज्य राखीव पोलीस दलाच्या 32 कंपन्या कार्यरत आहेत. त्यांच्या मदतीने पोलीस दल कार्य करत आहे. मात्र पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी यांना देखील कोरोनाची बाधा झालेली आहे. पोलिसांना विश्रांतीची गरज आहे. त्यामुळे राज्यात तातडीने केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या 20 कंपन्या मिळाव्यात अशी मागणी केली असल्याचे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले.

यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईत लष्कराला पाचारण करणार नाही असं म्हटलं होतं. पोलिसांना विश्रांती देण्यासाठी आवश्यकता वाटल्यास केंद्राकडून सुरक्षा पथकं मागवू असं मुख्यमंत्र्यांनी 8 मे रोजीच्या निवेदनात स्पष्ट केलं होतं. मुंबईत लष्कर येणार ही केवळ अफवा आहे. जे करेल ते तुम्हाला सांगून करेल. सध्या मुंबईत लष्कराची गरज नाही, ते मुंबईत येणार नाही, असं मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं होतं.

मुख्यंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर आता पोलिसांवरील ताण पाहता, राज्याने केंद्राकडे सुरक्षा पथकांची मागणी केली आहे.

  • महाराष्ट्र पोलिसांना कोरोनाचा विळखा

महाराष्ट्रात अनेक पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. आतापर्यंत एकूण 925 पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना कोरोनाची बाधा झाली आहे. यामध्ये 100 अधिकारी आणि 825 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. कोरोनाची लक्षणे असलेल्या पोलिसांची संख्या मोठी आहे. 84 अधिकारी आणि 709 अशा एकूण 793 पोलिसांना कोरोना लक्षणे दिसून येत आहेत. तर 16 अधिकारी आणि 108 पोलीस कर्मचारी असे एकूण 124 जण बरे होऊन घरी परतले आहेत. दुर्दैवाने आतापर्यंत 8 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

(Maharashtra government request Deployment Of Central Forces)

संबंधित बातम्या 

मुंबईत लष्कर येणार नाही, जे करेन ते तुम्हाला सांगून करेन : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे