सांगली, कोल्हापूर आणि सोलापूरचे 44 भाविक तेहरानमध्ये अडकले

| Updated on: Feb 29, 2020 | 12:02 PM

जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकुळ घातला आहे. अशातच महाराष्ट्रातील 44 भाविक इराणमध्ये अडकल्याचं समोर आलं आहे.

सांगली, कोल्हापूर आणि सोलापूरचे 44 भाविक तेहरानमध्ये अडकले
Follow us on

सोलापूर : जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकुळ घातला आहे. अशातच महाराष्ट्रातील 44 भाविक इराणमध्ये अडकल्याचं समोर आलं आहे (Maharashtrian tourist stuck in Iran). यात सांगली, कोल्हापूर आणि सोलापूरच्या भाविकांचा समावेश आहे. यामुळे भाविकांच्या कुटुंबीयांकडून काळजी व्यक्त केली जात आहे. तसेच सरकारकडे लवकरात लवकर त्यांना परत आणण्याची मागणी कुटुंबीय करत आहेत.

इराणमध्ये धार्मिक तीर्थयात्रेला गेलेले जवळपास 2 हजार मुस्लीम भाविक तेहरानजवळ अडकून पडले आहेत. यात महाराष्ट्रातील 44 भाविकांचा समावेश आहे. यानंतर या प्रवाशांची तेथून लवकरात लवकर सुटका व्हावी यासाठी धडपड सुरु आहे. भारताने कोरोना व्हायरसचा संसर्ग होऊ नये म्हणून इराणमधील विमानांना भारतात उतरण्याची परवानगी नाकारली आहे. त्यामुळे हे सर्व भाविक मागील 8 दिवसांपासून तेहरान परिसरात अडकून पडले आहेत.

अकलूज, सांगोला, सोलापूर, सांगली, कोल्हापूर भागातील 44 भाविक कोल्हापूर येथील साद ट्रॅव्हल्स कंपनीद्वारे धार्मिक यात्रेसाठी गेले. त्यांनी 21 फेब्रुवारीला मुंबई येथून तेहरानला उड्डाण केले. मात्र, कोरोना व्हायरसमुळे अनेक देशांनी त्यांच्या सीमा बंद केल्याने या भाविकांना तेहरानमध्येच अडकून पडावे लागले आहे. त्यामुळे आता भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून यावर काय उपाय केला जातो हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, भारताने एअर इंडियाच्या मदतीने कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग असलेल्या चीनमधून अनेक भारतीय नागरिकांना स्वदेशात आणले आहे. अशावेळी इराणमधील महाराष्ट्रीय भाविकांना परत आणण्याबाबत परराष्ट्र खात्याकडून अद्याप पावलं उचलण्यात आलेली नाहीत. त्यामुळे संबंधित भाविकांचे कुटुंबीय मात्र, काळजीत पडले आहेत.

Maharashtrian tourist stuck in Iran