मराठवाड्यात नुसतीच भूरभूर, तरीही नदीला महापूर

| Updated on: Sep 26, 2019 | 6:55 PM

गेवराई तालुक्यातील 32 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. शनीचे राक्षस भुवन येथील शनी मंदिरात पाणी शिरलं आहे. पांचाळेश्वर मंदिरही पाण्याने वेढलं आहे.

मराठवाड्यात नुसतीच भूरभूर, तरीही नदीला महापूर
Follow us on

बीड/औरंगाबाद/नाशिक : मराठवाड्याचा छोटा समुद्र असलेल्या जायकवाडी (Jayakwadi marathwada flood) धरणातून पाणी सोडल्यामुळे पाऊस नसतानाही बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात पूरस्थिती (Jayakwadi marathwada flood) आहे. नाशिक जिल्ह्यातील पावसामुळे जायकवाडीत मोठ्या प्रमाणात आवक सुरु आहे. त्यामुळे जायकवाडीतून विसर्ग वाढवण्यात आलाय. गेवराई तालुक्यातील 32 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. शनीचे राक्षस भुवन येथील शनी मंदिरात पाणी शिरलं आहे. पांचाळेश्वर मंदिरही पाण्याने वेढलं आहे.

जायकवाडीतून विसर्ग आणखी वाढवला

नाशिक जिल्ह्यात पडत असलेल्या पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे. त्यामुळे आधीच शंभर टक्के भरलेल्या जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. जायकवाडी धरणाचे तब्बल 16 दरवाजे अडीच फुटाने उचलून तब्बल 37 हजार क्यूसेक्सने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे धरणाखालील परिसरात गोदावरी नदीला पूर आला आहे. पाण्याचा विसर्ग धरणात आणखी वाढला तर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग गोदावरी नदी पात्रात केला जाण्याची शक्यता आहे.

जायकवाडीत मोठ्या प्रमाणात आवक सुरु

नाशिक जिल्ह्यात होत असलेल्या मुसळधार पावसाच्या पाण्याने नांदूर मध्यमेश्वर धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. या धरणातून 53 हजार 875 क्यूसेक पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीच्या पात्रात जायकवाडीच्या दिशेने करण्यात येत आहे. यंदाच्या पावसाच्या हंगामात नाशिक जिल्ह्यातील गोदावरी खोऱ्यात सोडण्यात आलेले पाणी निफाड तालुक्यातील नांदूर मध्यमेश्वर धरणातून गुरुवारी पहाटेपर्यंत 106 टीएमसी पाणी हे दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील 102 टीएमसी क्षमता असलेल्या जायकवाडी धरणाच्या दिशेने गोदावरी नदी पात्रात सोडण्यात आलं आहे.

नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, त्रंबकेश्वर, नाशिक आणि दिंडोरी तालुक्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे गंगापूर, दारणा, कडवा, मुकणे आणि पालखेड धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने या धरणातून पाण्याचा विसर्ग निफाड तालुक्यातील गोदावरी, दारणा आणि कादवा नद्यांच्या संगमावर असलेले नांदूर मध्यमेश्वर धरणात करण्यात येत आहे.

नांदूर मध्यमेश्वर धरणाच्या पाणीपातळीत वाढ होत असल्याने धरणातून 53 हजार 875 क्यूसेक पाण्याचा जायकवाडीच्या दिशेने गोदावरी नदी पात्रात विसर्ग सुरू आहे. नांदूर मध्यमेश्वर धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने धरणाच्या बॅकवॉटरला असलेले निफाड तालुक्यातील सायखेडा, चांदोरी, शिंगवे आणि करंजगाव या गावांसह नदीकाठच्या गावांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे

बीड जिल्ह्यात भीषण दुष्काळ

बीड जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा दिवसेंदिवस तीव्र होत आहेत. जिल्ह्यात 750 हून अधिक टँकरने ग्रामीण भागातील नागरिकांची तहान भागवली जात आहे. तर त्याच बरोबर शहरातही टंचाईच्या झळा तीव्र असल्याने खाजगी टँकरला मागणी वाढली आहे. सर्वदूर पाणी टंचाईच्या झळा नागरिकांना सहन कराव्या लागत आहेत. बीड, परळी, माजलगाव, गेवराई, आष्टी, पाटोदा, शिरूर या सर्व तालुक्यात पाणीटंचाई तीव्र आहे.