गुप्ताला अन्यत्र हलवलं नाही, तर पुढचा दौरा मुंबईचा : संभाजीराजेंचा इशारा

| Updated on: Jan 11, 2020 | 3:06 PM

राज्यसभा खासदार छत्रपती संभाजीराजे (mp sambhaji raje bhosale) यांनी आज सारथी संस्था वाचवण्यासाठी लाक्षणिक उपोषण सुरु केलं आहे.

गुप्ताला अन्यत्र हलवलं नाही, तर पुढचा दौरा मुंबईचा : संभाजीराजेंचा इशारा
Follow us on

पुणे : राज्यसभा खासदार संभाजीराजे छत्रपती (mp sambhaji raje bhosale) यांनी आज सारथी संस्था वाचवण्यासाठी लाक्षणिक उपोषण सुरु केलं आहे. पुण्यात हे उपोषण सुरु असून, राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी उपोषणस्थळी जाऊन संभाजीराजेंची भेट घेतली. या भेटीनंतर संभाजीराजेंनी आपलं उपोषण मागे घेतलं.

या भेटीनंतर संभाजीराजेंनी उपोषणाला बसलेल्या सर्वांशी संवाद साधला. यावेळी “गुप्ता नावाचा अधिकारी हटवला नाही तर मग आम्ही पाहू”, असा इशारा संभाजीराजेंनी दिला (mp sambhaji raje bhosale).

“स्पर्धा परीक्षा मुलांची स्कॉलरशिप बंद केली, त्यामुळं मग सारथी ठेवायची कशाला? मुख्यमंत्र्यांनी विनंती केली की मंत्रिमंडळाचा विस्तार व्हायचा आहे त्यामुळे थोडा वेळ आम्हाला द्या. मुख्यमंत्र्यांना माहिती नाही की गुप्ता नावाचा अधिकारी नेमकं काय करत आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री यांनी मला माहिती विचारली. गुप्ता यांना अन्यत्र हलवणे गरजेचं आहे, जो मुख्यमंत्र्यांना किंमत देत नाही तो कोण लागला, तो हटला नाही तर मग आम्ही पाहू, असा इशारा संभाजीराजेंनी दिला. गुप्ताला हलवलं नाही तर पुढचा दौरा आमचा मुंबईला असेल”, असं संभाजीराजे म्हणाले.

संभाजीराजे म्हणाले, “हे स्वराज्य मावळ्यांचे आहे. छत्रपती शाहू महाराजांच्या नावाने ही संस्था निर्माण झाली आहे. सारथी संस्थेची स्वायत्ता अबाधित राहण्यासाठी आपण सगळेजण एकत्र जमले आहोत. सर्वांचे मी मनापासून स्वागत करतो.

“मंत्री एकनाथ शिंदे आल्याचे समजले तेव्हा मला बरं वाटलं. मुंबईतल्या मोर्चात एकनाथ शिंदे यांनीच ताकद लावली होती. शाहू महाराज आणि शिवाजी महाराजांचे स्वप्न होतं की, माझा माणूस माझ्यापेक्षी मोठा व्हायला हवा. सारथीच्या माध्यमातून मराठा, कुणबी समाजाच्या तरुणांना अधिकारी घडवायचे आहे. मंत्री एकनाथ शिंदे इथं आल्याचं समजलं मला मनापासून बरं वाटलं. कोणता साधासुधा मंत्री आला असता तर आम्हाला परवडलं नसतं”, असं संभाजीराजे म्हणाले.

“आम्ही कोणीही पक्षविरोधी बोलणार नाही, कुणीतरी म्हणालं मी खाली बसलो. तर मी खाली बसलो नाही तर जनतेच्या बरोबर बसलो आहे. शाहू महाराज असेच, जनतेबरोबर बसत होते. मात्र मला खाली मांडीला मांडी लावून बसायला उशीर लागला. असं असलं तरच मी शाहू महाराजांचा विचार पुढे घेऊन जाईल”, असं संभाजीराजे म्हणाले.

“आपला माणूस आपला पेक्षा मोठा व्हावा, ही शाहू महाराजांचा भूमिका होती, आरक्षणाने सर्व समस्या सुटणार नाही, समाजातील मुले अधिकारी झाली तर हे जिवंत स्मारक ठरेल. मात्र हे मोडून टाकण्याचं कारस्थान केलं जात आहे”, असा घणाघात संभाजीराजेंनी केला.