महत्त्वाची बातमी: इतिहास तज्ज्ञ राजवाडेंचा खोडसाळपणा, म्हणे आद्यकवी मुकुंदराज विदर्भाचे… कौतिकराव ठालेपाटलांचा थेट आरोप

| Updated on: Sep 25, 2021 | 6:25 PM

महाराष्ट्राच्या वाङ्मयाचा वेगळा इतिहास नाही. महाराष्ट्राच्या एकूण वाङ्ममयाचा इतिहास तो मराठवाड्याचा आहे, असं वक्तव्य अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष कौतीकराव ठाले पाटील यांनी आज केलं. यामुळे मुकुंदराज विदर्भाचे की मराठवाड्याचे या वादाला पुन्हा तोंड फुटले आहे.

महत्त्वाची बातमी: इतिहास तज्ज्ञ राजवाडेंचा खोडसाळपणा, म्हणे आद्यकवी मुकुंदराज विदर्भाचे... कौतिकराव ठालेपाटलांचा थेट आरोप
41 व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे उद्घाटन शनिवारी अशोक चव्हाण यांच्या हस्ते झाले.
Follow us on

औरंगाबाद: आद्य कवी मुकुंदराज (Poet Mukundraj) हे मराठवाड्याचे की विदर्भाचे, हा वाद पुन्हा एकदा पेटलाय. मराठी साहित्य आणि भाषेची निर्मिती ही मराठवाड्यात झाली याचे सगळे पुरावे आहेत. मात्र इतिहास तज्ञ  विश्वनाथ राजवाडे (Historian Vishwanath Rajwade ) यांनी खोडसाळ पणा करत मराठीचा आद्य कवी मुकुंदराज हे विदर्भाचे होते सांगून संभ्रम निर्माण केलाय, असा थेट आरोप मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी केला आहे. 41 व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. औरंगाबादमधील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये 25 आणि 26 सप्टेंबर रोजी या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

काय म्हणाले कौतिकराव ठाले पाटील?

औरंगाबादमधील संमेलनाच्या उद्घाटनपर भाषणात कौतिकराव ठाले पाटील म्हणाले, गोदावरीच्या काठाकाठाने जाणारा संपूर्ण प्रदेशात मराठीचा जन्म झाला. महाराष्ट्र म्हणजे मराठवाडा आहे. सध्याचा महाराष्ट्र हा बृहन महाराष्ट्र आहे. पूर्वी महाराष्ट्र नव्हताच, तो नंतर तयार झाला. आधी मराठवाडा होता. मराठवाड्याच्या वाङ्ममयाचा इतिहास हाच महाराष्ट्राच्या वाङ्ममयाचा इतिहास आहे. महाराष्ट्राच्या वाङ्मयाचा वेगळा इतिहास नाही. महाराष्ट्राच्या एकूण वाङ्ममयाचा इतिहास तो मराठवाड्याचा आहे. असं वक्तव्य अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष कौतीकराव ठाले पाटील यांनी आज आयोजित करण्यात आलेल्या 41 व्या मराठवाडा साहित्य संमेलनात केले आहे. ठाले पाटील यांच्या या वक्तव्यामुळे आता साहित्य वर्तुळात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

संमेलनाचे उद्घाटन अशोक चव्हाण यांच्या हस्ते

आज औरंगाबाद शहरात 41 व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे दिमाखात उद्घाटन करण्यात आले. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते हे उद्घाटन करण्यात आले. संमेलनाच्या उद्घाटनपर भाषणात बोलताना अशोक चव्हाण म्हणाले, ” बदलत्या माहिती तंत्रज्ञानाचा वापर वाचन संस्कृती वाढवण्यासाठी कसा करता येइल याबाबतही चिंतन होणे गरजेचे आहे. वाचनातून वैचारिक बैठक तयार होवून समाजाला दिशा दर्शक भावी पिढी घडवण्याचं काम साहित्य करित असते. तसेच माणसाचे विचार व्यक्त करण्याची मोकळीक साहित्य लेखनातून मिळते. म्हणूनच साहित्याचा उल्लेख समाजाचे प्रतिबिंब म्हणून केला जातो.”

संमेलनाच्या अध्यक्षस्थानी कादंबरीकार बाबू बिरादार

41 व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष देगलूरचे ज्येष्ठ कादंबरीकार बाबू बिरादार हे आहेत. संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमात बिरादार यांच्या ‘अधिवास’ या कादंबरीचे प्रकाशन अशोक चव्हाण आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झालं. तत्पूर्वी कार्यक्रमाच्या सुरुवातीला भगवान देशमुख यांच्या ‘संत महंताची भूमी माझ्या मराठवाड्याची’ या गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. तर मसापच्या ‘गोंदन’ या स्मरणिकेचे प्रकाशन कार्यक्रमाच्या अखेरच्या सत्रात करण्यात आले. अध्यक्षीय भाषणात बोलताना बाबू बिरादार म्हणाले, ‘मराठवाड्याची संत परंपरा, निसर्ग, अनुभव व संस्कार यामुळे मराठवाड्यातील साहित्यिक जमिनीवर राहून लिखाण करीत आहे.’ तसेच बिरादार यांनी आपली साहित्यिक जडणघडण व जीवनातील अनुभवही व्यक्त केले. (Mukundaraj is a poet from Marathwada, Rajwade’s claim is false, Kautukrao Thale Patil’s allegation in Aurangabad)

इतर बातम्या- 

महाराष्ट्रात मराठी विद्यापीठ स्थापन होण्याची दाट शक्यता, 41व्या मराठवाडा साहित्य संमेलनात अशोक चव्हाणांचे वक्तव्य

लिटफेस्टच्या माध्यमातून भारतीय भाषांमधील साहित्य जगापुढे यावे; राज्यापालांच्या उपस्थितीत ग्लोबल लिटररी फेस्टिवलचे उद्घाटन