Nagrota Encounter: दहशतवाद्यांना मोबाईलद्वारे थेट पाकिस्तानमधून सूचना, पुरावे सापडले; पाकिस्तानच्या राजदूतांना समन्स

| Updated on: Nov 21, 2020 | 11:44 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शुक्रवारी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि गुप्तचर यंत्रणांच्या अधिकाऱ्यांशी झालेल्या बैठकीत या घटनेची गंभीर दखल घेतली होती. | Nagrota encounter

Nagrota Encounter: दहशतवाद्यांना मोबाईलद्वारे थेट पाकिस्तानमधून सूचना, पुरावे सापडले; पाकिस्तानच्या राजदूतांना समन्स
Follow us on

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या नगरोटा (Nagrota Encounter) येथे भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीसंदर्भात आता खळबळनजक माहिती समोर आली आहे. या चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्यांकडे काही गोष्टी सापडल्या आहेत. यावरून या सगळ्यात पाकिस्तानचा (Pakistan) संबंध असल्याचे ठोस पुरावे भारतीय यंत्रणांच्या हाती लागले आहेत. चकमकीदरम्यान या दहशतवाद्यांना पाकिस्तानमधून मोबाईल फोनद्वारे सातत्याने सूचना दिल्या जात होत्या, अशी माहितीही तपासात पुढे आली आहे. (Jammu Nagrota encounter phones medicines weapons from Pakistan)

या पार्श्वभूमीवर भारताने आता पाकिस्तानविरोधात कडक पावले उचलण्याचे संकेत दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शुक्रवारी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि गुप्तचर यंत्रणांच्या अधिकाऱ्यांशी झालेल्या बैठकीत या घटनेची गंभीर दखल घेतली होती. त्यानंतर आज भारताकडून पाकिस्तानच्या राजदूतांना समन्स बजवण्यात आले आहे. या समन्समध्ये नगरोटातील दहशतवाद्यांचे पाकिस्तानशी थेट कनेक्शन असल्याचा उल्लेख आहे. या सगळ्याचे पुरावे सादर करून भारताकडून पाकिस्तानची कोंडी केली जाऊ शकते.

भारताला नक्की कोणते पुरावे सापडले?
नागरोटा चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्यांकडून एक डिजिटल मोबाइल रेडियो (DMR) मिळाला. या मोबाईल रेडिओवर पाकिस्तानमधून ‘कहां पहुंचे. क्या माहौल है. कोई मुश्किल तो नहीं है. 2 बजे फिर बता देंगे…’ असे संदेश पाठवण्यात आले होते. त्यामुळे दहशतवाद्यांना पाकिस्तानमधील हँडलर्सकडून सूचना दिल्या जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पाकिस्तानच्या Q मोबाइल कंपनीचा स्मार्टफोन
सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर एक स्मार्टफोन जप्त केला. हा पाकिस्तानातील Q कंपनीचा मोबाइल आहे. दहशतवाद्यांकडे कराचीत तयार करण्यात आलेली काही अँटिबायोटिक आणि युनानी औषधेही मिळाली आहेत. तसेच दहशतवाद्यांच्या पायातील बूटही ‘मेड इन पाकिस्तान’ असल्याची माहिती समोर आली आहे.

दहशतवाद्यांचा पुन्हा 26/11 हल्ला घडवण्याचा कट?

भारतात येत्या 26 नोव्हेंबर रोजी दहशतवाद्यांचा मोठा घातपात घडवण्याचा डाव असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली होती. त्यानंतर जम्मू-काश्मीरच्या नागरोटा येथे काल (19 नोव्हेंबर) भारतात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या चार अतिरेक्यांचा भारतीय जवानांनी खात्मा केला. या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी उच्चस्तरीय बैठक बोलवली होती. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, गुप्तचर यंत्रणाचे अधिकारी उपस्थित होते.

संबंधित बातम्या:

दहशतवाद्यांचा पुन्हा 26/11 हल्ला घडवण्याचा कट? पंतप्रधान मोदींची अमित शाह आणि अजित डोवाल यांच्यासोबत बैठक

घुसखोरी करणारा एकही अतिरेकी जिवंत परतणार नाही; लष्करप्रमुखांचा निर्वाणीचा इशारा

पाकिस्तानमधील अनेक दहशतवादी बंकर्स उद्ध्वस्त, भारताची धडाकेबाज कारवाई

(Jammu Nagrota encounter phones medicines weapons from Pakistan)