‘त्या’ माऊलीचा हंबरडा ऐकून नवनीत राणाही गहिवरल्या

| Updated on: Sep 18, 2019 | 11:58 AM

अमरावतीत गणेश विसर्जनादरम्यान नदीत वाहून मृत्यू झालेल्या चौघांच्या कुटुंबाचं सांत्वन खासदार नवनीत कौर राणा यांनी केलं. त्यावेळी मुलांच्या आठवणीने मातांच्या अश्रूंचा बांध फुटला.

त्या माऊलीचा हंबरडा ऐकून नवनीत राणाही गहिवरल्या
Follow us on

अमरावती : गणपती विसर्जनाच्या वेळी नदीपात्रात बुडून प्राण गमवावे लागलेल्या चौघा तरुणांच्या कुटुंबीयांची अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा (Navneet Rana helps Victim Families)  यांनी भेट घेतली. यावेळी पोटचं पोर गमावलेल्या मातांचा हंबरडा ऐकून नवनीत राणा यांनाही अश्रू अनावर झाले.

नवनीत कौर राणा यांनी आमदार रमेश बुंदीले यांच्यासह पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. पीडित कुटुंबाचं सांत्वन करत नवनीत राणा यांनी त्यांच्या दुःखावर फुंकर घालण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मुलांच्या आठवणीने मातांच्या अश्रूंचा बांध फुटला. माऊलींना धीर देताना नवनीत राणा यांच्याही काळजात कालवाकालव झाली (Navneet Rana helps Victim Families) आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले.

त्यानंतर नवनीत राणा यांनी मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी चार लाख रुपयांचा धनादेश घरी जाऊन प्रदान केला. यावेळी उपविभागीय अधिकारी, दर्यापूरचे तहसीलदार दर्यापूर आणि इतर अधिकारी उपस्थित होते. युवा स्वाभिमान पक्ष लेकरु गमावणाऱ्या कुटुंबियांच्या सदैव पाठीशी राहील अशी ग्वाही नवनीत राणा यांनी दिली.

काय झालं होतं?

अनंत चतुर्दशीला अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यात वाठोडा शुक्लेश्वरमध्ये गणपती विसर्जनादरम्यान नदी पात्रात चौघं जण बुडाले होते. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे चौघांचाही बुडून मृत्यू झाला. गौरखेडामध्ये राहणाऱ्या संतोष बारकाजी वानखडे, सागर शेंदुलकर, ऋषिकेश वानखडे आणि सतीश सोळंके यांचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला होता.

गौरखेडा येथील वीर शिवाजी तरुण उत्साही सार्वजनिक मंडळाच्या गणेशमूर्तीचं विसर्जन करण्यासाठी सर्व जण गेले होते. आधी खल्लार येथील चंद्रभागा नदीच्या पुलाजवळ गणेश विसर्जन करण्याचं ठरलं होतं. मात्र पॉवर हाऊसजवळ आले असताना काही कार्यकर्त्यांनी वाठोडा शुक्लेश्वर येथील पूर्णा नदीच्या पात्रात गणेशमूर्ती विसर्जन करण्याचा आग्रह धरला.

गणेश मूर्ती नेली जात असलेला ट्रॅक्टर शुक्लेश्वर घाटाकडे वळवण्यात आला. ऋषीकेश आणि सतीश या दोघांच्याही आई ट्रॅक्टरमध्ये होत्या, तर संतोष वानखडे यांचा सातवीत शिकणारा मुलगा यश आणि बहीण रोहिणी ट्रॅक्टरमध्ये होते.

कार्यकर्ते गणेशमूर्ती विसर्जनासाठी जात असताना संतोष वानखडे घरी होते. त्यांची विसर्जनाला जाण्याची इच्छा नव्हती, परंतु मुलांच्या काळजीने ते गेले.

पुलावरुन विसर्जन करायचे की घाटावरून, याबाबत कार्यकर्त्यांमध्ये एकमत नव्हतं. पाणी अधिक असल्याने नदीपात्रात न उतरण्याची सूचना करुनही काही जण नदीपात्रात उतरले.

खासदार नवनीत राणांकडून धूर फवारणी, रोगराई हटवण्यासाठी मैदानात

ऋषीकेशला वाचवण्यासाठी काका संतोष वानखडे यांनी नदीपात्रात उडी घेतली. मात्र नदीपात्राच्या प्रवाहामुळे ते वाहून गेले. वडिलांना वाहून जाताना पाहून चिमुरड्या यशने आरडाओरड केली. मात्र तोपर्यंत उशिर झाला होता.

नदीत बुडालेल्या चौघांचे मृतदेह बराच वेळ सापडले नव्हते. अखेर काही तासांच्या शोधाशोधीनंतर बचाव पथकाने त्यांचे मृतदेह बाहेर काढले.चौघांच्या मृतदेहाच्या शोधमोहीमवेळीही खासदार नवनीत राणा स्वतः उपस्थित होत्या. त्यावेळी शोधमोहिम करणाऱ्या पथकाशीही त्यांनी संपर्क ठेवला.

मृत संतोष वानखडेवर शुक्रवारी सायंकाळी, सागर शेंदूरकरवर शनिवारी दुपारी, तर ऋषीकेश वानखडे याच्या पार्थिवावर शनिवारी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.