ना मास्क, ना सोशल डिस्टन्सिंग, पुण्यातील उरुळी गावात टँकरभोवती नागरिकांची झुंबड

| Updated on: Apr 23, 2020 | 11:14 AM

उरुळी गावातील नागरिकांनी पाण्यासाठी टँकरच्या भोवती तुफान गर्दी केली. पाणी घेण्यासाठी स्त्री-पुरुष, आबालवृद्ध टँकरभोवती जमा झाले होते (Pune Uruli Villagers rush for water tanker amid corona lockdown)

ना मास्क, ना सोशल डिस्टन्सिंग, पुण्यातील उरुळी गावात टँकरभोवती नागरिकांची झुंबड
Follow us on

पुणे : पुण्यात ‘कोरोना’ व्हायरसचं थैमान सुरुच आहे. पुणे जिल्ह्यात रुग्णांची संख्या हजाराच्या टप्प्याकडे वाटचाल करत आहे. पुण्यातील उरुळी देवाची गावात पाणी पुरवठा होत नसल्याने नागरिकांना अखेर टँकरचा आधार घ्यावा लागला. मात्र या नादात उरुळीवासियांनी मास्क न घालता सोशल डिस्टन्सिंगचाही फज्जा उडवल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. (Pune Uruli Villagers rush for water tanker amid corona lockdown)

उरुळी गावातील नागरिकांनी पाण्यासाठी टँकरच्या भोवती तुफान गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळालं. पाणी घेण्यासाठी स्त्री-पुरुष, आबालवृद्ध टँकरभोवती जमा झाले होते. अनेकांनी मास्क न लावता पाण्यासाठी टँकरला गराडा घातला. सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा तर उडालाच, मात्र ‘कोरोना’ व्हायरसच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची ऐसीतैसी झाली. त्यामुळे ‘कोरोना’चा प्रादुर्भाव कमी होण्याऐवजी आणखी पसरण्याची भीती आहे.

एका बाजूला प्रशासन ‘कोरोना’शी लढत असताना वेगवेगळ्या उपाययोजना करत आहे. मात्र पाण्यासाठी जर नागरिकांची झुंबड उडत असेल, तर या सर्व प्रयत्नांवर पाणी पडण्याची शक्यता आहे. पाण्यासाठी नागरिक जीव धोक्यात घालून टँकरला गराडा घालत आहे. त्यामुळे प्रशासनाने या नागरिकांना त्वरित पाणी देणे गरजेचे आहे.

उरुळी देवाची आणि काही गावांसाठी पाण्याची टाकी बांधण्यात आली आहे. बंद पाईपलाईनच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्याचं कामही पूर्ण झालं आहे. काही ठिकाणी पाणी येत असून उरुळीत मात्र पाणी येत नाही. त्यामुळे उरुळी गावात पाईपलाईनने पाणी देण्यात यावं, अशी मागणी माजी उपसरपंच अतुल बहुले यांनी केली आहे.

पुण्यात ‘कोरोना’बाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होताना दिसत आहे. पुणे जिल्ह्यात काल रात्रीपासून सकाळी नऊ वाजेपर्यंत 53 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. पुण्यात ‘कोरोना’चा प्रादुर्भाव झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 934 वर गेली आहे. काल मध्यरात्रीपर्यंत 32 रुग्ण तर आज सकाळी नऊ वाजेपर्यंत 21 रुग्ण वाढले. एकूण मृतांचा आकडा 59 वर गेला आहे.