आरोग्यदूत म्हणून 21 हजार मानधन, नोकरीच्या नावाखाली फसवणूक करणारी टोळी गजाआड

| Updated on: Nov 18, 2019 | 1:51 PM

वाढत्या बेरोजगारीसह आता नोकरी देण्याच्या निमित्ताने (Cheating on the name of Arogydoot job) फसवणुकीच्या घटनांमध्येही चांगलीच वाढ होताना दिसत आहे.

आरोग्यदूत म्हणून 21 हजार मानधन, नोकरीच्या नावाखाली फसवणूक करणारी टोळी गजाआड
Follow us on

उस्मानाबाद : वाढत्या बेरोजगारीसह आता नोकरी देण्याच्या निमित्ताने (Cheating on the name of Arogydoot job) फसवणुकीच्या घटनांमध्येही चांगलीच वाढ होताना दिसत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात वैशाली जनआरोग्य सुरक्षा योजनेच्या नावाखाली (Cheating on the name of Arogydoot job) तरुणांना आरोग्यदूताची नोकरी देण्याचे आमिष दाखवण्यात आले. त्यातून तरुणांची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक झाल्याचं समोर आलं आहे. ही फसवणूक करणाऱ्या टोळीला उस्मानाबाद पोलिसांनी जेरबंद केलं आहे.

आरोपींकडून वर्तमानपत्रांमध्ये आरोग्यदूत नेमणुकीची जाहिरात दिली होती. यात त्यांनी केंद्र शासनाची मान्यता असलेल्या सोशल फॉऊंडेशनसाठी आरोग्यदूत नेमत असल्याचं म्हटलं. तसंच या पदावर नेमणूक होणाऱ्यांना दरमहा 21 हजार रुपये मानधन देणाचं अमिष दाखवण्यात आलं.

या मुलाखतीसाठी येणाऱ्या उमेदवारांना बँक पासबुक, चालू खात्याचे 3 कोरे चेकसह इतर कागदपत्रे आणण्यास सांगण्यात आलं होतं. आरोग्यदूत पदाच्या मुलाखती सुरु असताना काही तरुणांकडून 500 ते 1250 रुपयांपर्यंत नोंदणी आणि इतर शुल्कही आकारण्यात आलं. उमेदवारांना पृथ्वी मेडिकल फॉऊंडेशन या संस्थेच्या नावाची रुग्णालय स्थापना आणि विकास कामासाठीची देणगी पावती देण्यात आली. शिवाय काही तरुणांकडून अनामत सुरक्षा म्हणून 3 कोरे बँक घेण्यात आले.

तरुणांनी टीव्ही9 मराठीचा मदतीचा हात

हा सर्व प्रकार संशयास्पद वाटल्यानंतर काही तरुणांनी टीव्ही9 मराठीच्या माध्यमातून उस्मानाबाद पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांनी छापा टाकत या टोळीला अटक केली. तरुणांची फसवणूक करणारी संबंधित टोळी उस्मानाबाद शहरातील एका लॉजवर तरुणांच्या मुलाखती घेत होती. या कामाच्या बदल्यात तरुणांना दरमहा 21 हजार रुपयांच्या नोकरीचे अमिषही दाखवण्यात येत होते. दरम्यान, मुलाखती घेत असतानाच 4 जणांना पोलिसांनी रंगेहात अटक केली. त्यांच्याकडून अनेक अवैध आणि संशयास्पद कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. पोलिसांनी देणगीचे पावती पुस्तक, पोलीस विभागासह विविध दैनिकांचे पत्रकार असल्याचे ओळखपत्र, उमेदवारांचे कोरे चेक, पैसे असा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी मोतीचंद राठोड यांनी दिली.

फसवणुकीसाठी वापरलेली आरोग्यदूत योजना काय आहे?

आरोग्यदूत म्हणून नेमण्यात आलेल्या उमेदवाराने दरमहा 300 व्यक्तींची नोंदणी करायची. त्यासाठी प्रत्येक व्यक्तीकडून 500 रुपये प्रमाणे 1 लाख 50 हजार रुपयांची देणगी जमा करायची. नाव नोंदणी केल्यानंतर नागरिकांना वैशाली जनआरोग्य सुरक्षा योजनेचे एक ओळखपत्र दिले जात होते. त्यात त्या व्यक्तीला हृदयरोग, कॅन्सरसह अन्य रोगाचे उपचार शस्त्रक्रिया मोफत देण्याचे अमिष दाखवण्यात येत होते.

संबंधित योजनेच्या आरोग्य कार्डवर मुंबई आणि पुणे येथील 2 प्रस्तावित रुग्णालये आणि औरंगाबाद, नागपूरसह सोलापूरच्या 7 नियोजित रुग्णालयांची नावे देण्यात आली होती. विशेष म्हणजे या कार्डवरील एकही रुग्णालय सध्या अस्तित्वात नाही. असं असतानाही येथे उपचार केले जातील असं भासवण्याचा प्रयत्न करण्यात आला. रुग्णांना मोफत उपचाराचे अमिष दाखवत संबंधित टोळीकडून आरोग्यदूतांच्या मार्फत पैसे उकळण्याचे काम राजरोसपणे सुरु होते. मात्र, उस्मानाबाद पोलिसांनी या योजनेसह इतर कागदपत्रांची मागणी केल्यावर संबंधितांचे बिंग फुटले.

मुळात या संस्थेकडे विमा योजना राबवण्यासाठी कोणतीही परवानगी नव्हती. तसेच निधी संकलनासह अन्य महत्वाची कागदपत्रे देखील नव्हती. उस्मानाबाद येथील आरोग्यदूत पदाच्या भरतीसाठी बीड, लातूर, परभणी, नांदेडसह अन्य जिल्ह्यातील तरुणही आले होते. एकीकडे बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे, तर दुसरीकडे मराठवाड्यात दुष्काळाची स्थिती आहे. त्यामुळे अनेक तरुण या खोट्या जाहिरातींना फसले जात आहे. त्यामुळे त्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत आहे. हे प्रकार उघड झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दगूभाई शेख यांनी तरुणांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

पृथ्वी फाऊंडेशनच्या नावाने आरोग्यदूताच्या नोकरीचा हा फसवणुकीचा प्रकार महाराष्ट्रभर सुरु असल्याची प्राथमिक माहिती तपासात समोर आली आहे. यात सुशिक्षित बेरोजगार तरुणांना नोकरीचे अमिष दाखवून त्यांच्याकडून नोंदणी फी घेतली जाते. तरुणांना फसवणाऱ्या या टोळीने महाराष्ट्रात आणखी कुठे कुठे गंडा घातला आहे याचाही तपास करणे पोलिसांसमोर एक आव्हान असणार आहे.