भारतीय विंग कमांडरला सोडणार, इम्रान खान बिथरला!

| Updated on: Jul 05, 2019 | 4:22 PM

नवी दिल्ली : भारतीय विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची उद्याच सुटका करु, अशी घोषणा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तानी संसेदत केली. शांततेसाठी सदिच्छा म्हणून अभिनंदन यांची सुटका करत आहोत, असे इम्रान खान यांनी सुटकेची घोषणा करताना म्हटलं आहे. उद्या सकाळीच वाघा बॉर्डरवरुन भारतीय विंग कमांडर अभिनंदन यांची पाकिस्तानकडून सुटका केली जाईल. पाकिस्तानी संसदेत इम्रान […]

भारतीय विंग कमांडरला सोडणार, इम्रान खान बिथरला!
Follow us on

नवी दिल्ली : भारतीय विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची उद्याच सुटका करु, अशी घोषणा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तानी संसेदत केली. शांततेसाठी सदिच्छा म्हणून अभिनंदन यांची सुटका करत आहोत, असे इम्रान खान यांनी सुटकेची घोषणा करताना म्हटलं आहे. उद्या सकाळीच वाघा बॉर्डरवरुन भारतीय विंग कमांडर अभिनंदन यांची पाकिस्तानकडून सुटका केली जाईल.

पाकिस्तानी संसदेत इम्रान खान काय म्हणाले?

1. इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या संयुक्त संसदेला आज निवेदन दिलं. यावेळी त्यांनी भारतीय पायलटची सुटका उद्याच करु असं सांगितलं. मात्र भारतीय पायलटची सुटका म्हणजे आमचा दुबळेपणा समजू नये, असं इम्रान खान म्हणाले.

2. सर्व समस्या या संवादातूनच सोडवायला हव्या. करतारपूर कॉरीडोअर आम्ही सुरु करुनही भारताने प्रतिसाद दिला नाही.

3. जेव्हा पुलवामा हल्ला घडला, त्याच्या अवघ्या 30 मिनिटातच आमच्यावर आरोप करण्यात आला. मला हे म्हणायचं नाही की भारतानेच त्याबाबतची खेळी केली असेल, पण मी त्यांना पुरावे देण्याची मागणी केली, असं इम्रान खान म्हणाले.

4. शांततेसाठी सदिच्छा म्हणून अभिनंदन यांची सुटका करत आहोत

भारताने पाकिस्तानला काय इशारा दिला होता?

“भारताचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना लगेच परत येण्याची अपेक्षा आहे. कोणत्याही व्यवहाराचा कोणताही प्रश्न नाही. जर पाकिस्तानला असे वाटते की त्यांच्याशी वाटाघाटी करण्यासाठी अभिनंदनचा वापर होईल, तर ते चुकीचे आहे. विंग कमांडर अभिनंदन यांना मानवी पद्धतीने वागवावे अशी भारताची अपेक्षा.”, असा थेट इशारा भारताने पाकिस्तानला दिला होता.

पायलटच्या सुटकेसाठी अटी-बिटी काही मानणार नाही, असेही भारताने पाकिस्तानला ठणकावून सांगितले होते.

कोण आहेत अभिनंदन वर्धमान?

अभिनंदन हे भारतीय वायूसेनेत विंग कमांडर आहेत. बुधवारी ते मिग 21 हे विमान घेऊन उड्डाण घेतलं, पण पाकिस्तानने हे विमान पाडलं. अभिनंदन यांनी स्वतःची सुटका तर केली, पण ते खाली पडलेल्या अवस्थेत असताना त्यांना पाकिस्तानी रेंजर्सने अटक केली. स्थानिकांकडून अभिनंदन यांना मारहाणही करण्यात आली.

पाकिस्तानने सकाळी जो व्हिडीओ रिलाज केला, त्यात अभिनंदन यांच्या चेहऱ्यावर रक्त दिसत होतं. पण दुसऱ्या व्हिडीओमध्ये ते चहा पिताना दिसत आहेत. शिवाय मी सुरक्षित असल्याचंही त्यांनी सांगितलंय. अभिनंदन आपण दक्षिण भारतीय असल्याचं सांगत आहेत. शिवाय लग्न झालेलं आहे का असं विचारल्यानंतर त्यांनी हो उत्तर दिलं.

अभिनंदन यांना देशसेवेचं बाळकडू घरातून मिळालंय. त्यांचे वडीलही भारतीय वायूसेनेतच होते. अभिनंदन हे 2004 मध्ये वायूसेनेत दाखल झाले. अभिनंदन यांना अटक केल्याची माहिती समोर येताच भारतात त्यांच्या सुटकेसाठी प्रार्थना करण्यात येत आहे. सोशल मीडियावर अभिनंदन यांना परत आणा म्हणून मोहिम राबवण्यात आली.