लॉकडाऊन वाढवण्याचे पंतप्रधानांचे संकेत, सर्व मुख्यमंत्र्यांना रणनीती आखण्याच्या सूचना

| Updated on: May 12, 2020 | 8:09 AM

नरेंद्र मोदींनी राज्यांना आश्वासन दिले, की अर्थव्यवस्थेच्या रोडमॅपसाठी सर्व मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचनांवर योग्य विचार करण्यात आला आहे (Narendra Modi Lockdown Four)

लॉकडाऊन वाढवण्याचे पंतप्रधानांचे संकेत, सर्व मुख्यमंत्र्यांना रणनीती आखण्याच्या सूचना
Follow us on

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये लॉकडाऊन वाढवण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. मात्र तिसऱ्या लॉकडाऊनमधल्या निर्बंधांची चौथ्यामध्ये गरज नसेल, असं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी महाराष्ट्रातील लॉकडाऊन वाढवण्याची मागणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. (PM Narendra Modi on Lockdown Phase Four Blueprint Video Conference with Chief Ministers)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (सोमवारी) झालेल्या बैठकीत सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना शुक्रवारपर्यंत पुढील लॉकडाऊनची रणनीती देण्यास सांगितले. “माझे ठाम मत आहे, की पहिल्या लॉकडाऊनमधल्या सर्वच निर्बंधांची दुसर्‍या टप्प्यात जशी आवश्यकता नव्हती, त्याचप्रमाणे तिसऱ्या टप्प्यात केलेल्या उपायांची चौथ्या टप्प्यात गरज नसेल.” असं नरेंद्र मोदी म्हणाल्याची माहिती आहे.

अर्थचक्राला गती देण्यासाठी रेल्वे सेवा पुन्हा सुरु करण्याची आवश्यकता होती, परंतु सर्व मार्ग पुन्हा सुरु केले जाणार नाहीत. केवळ मर्यादित संख्येने गाड्या चालवल्या जातील, असे पंतप्रधान म्हणाले. अत्यावश्यक सेवेसाठी मुंबईत लोकल सेवा सुरु करा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी मोदींकडे केली.

मोदींनी राज्यांना आश्वासन दिले, की अर्थव्यवस्थेच्या रोडमॅपसाठी सर्व मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचनांवर योग्य विचार करण्यात आला आहे. परंतु कोरोना व्हायरसचा ग्रामीण भागात होणारा प्रसार रोखला पाहिजे, असा इशाराही त्यांनी दिला.

हेही वाचा : अत्यावश्यक सेवेसाठी मुंबईत लोकल सेवा सुरु करा, मुख्यमंत्र्यांची मोदींकडे मागणी

“मी आपणा सर्वांना विनंती करतो की तुम्ही प्रत्येकाने आपापल्या राज्यातील लॉकडाऊनचा कसा सामना करावा याची एक व्यापक रणनीती 15 मेपर्यंत सादर करावी. लॉकडाऊनच्या शिथिलतेवेळी आणि नंतर विविध बारकावे कसे हाताळावेत यावर तुम्ही ब्ल्यू प्रिंट बनवावी, अशी माझी इच्छा आहे” असे पंतप्रधान म्हणाले. ‘लस उपलब्ध होण्यापूर्वी कोरोनाविरुद्ध लढण्यात शारीरिक अंतर हेच सर्वात मोठे शस्त्र राहील” असा विश्वास मोदींनी व्यक्त केला. (PM Narendra Modi on Lockdown Phase Four Blueprint Video Conference with Chief Ministers)

31 मेपर्यंत तामिळनाडूमध्ये रेल्वे सेवा सुरु करु नका, अशी विनंती मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली होती. यावेळी गृहमंत्री अमित शाह यांनीही सर्व मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामनही बैठकीत सहभागी झाल्या होत्या.

लॉकडाऊन कसा वाढत गेला?

पहिला लॉकडाऊन – 25 मार्च ते 14 एप्रिल
दुसरा लॉकडाऊन – 15 एप्रिल ते 3 मे
तिसरा लॉकडाऊन – 4 मे ते 17 मे

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्र्यांच्या बैठका

  • पहिली बैठक – 20 मार्च
  • दुसरी बैठक – 2 एप्रिल
  • दुसरी बैठक – 11 एप्रिल
  • तिसरी बैठक – 27 एप्रिल
  • पाचवी बैठक – 11 मे

(PM Narendra Modi on Lockdown Phase Four Blueprint Video Conference with Chief Ministers)