‘जनता कर्फ्यू’नंतर पंतप्रधान पहिल्यांदा बोलणार, कोरोना प्रसाराबाबत संबोधनाची वेळ ठरली

| Updated on: Mar 24, 2020 | 11:32 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी एक दिवस जनता कर्फ्यू पाळून सर्व देशवासियांना एक दिवस घरी थांबण्याचं आवाहन केलं होतं. (Narendra Modi to speak after Janta Curfew)

जनता कर्फ्यूनंतर पंतप्रधान पहिल्यांदा बोलणार, कोरोना प्रसाराबाबत संबोधनाची वेळ ठरली
Follow us on

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘जनता कर्फ्यू’नंतर पहिल्यांदाच देशवासियांना संबोधित करणार आहेत. मोदी आज रात्री (24 मार्च) आठ वाजताचा मुहूर्त साधत ‘कोरोना व्हायरस’च्या वाढत्या प्रकोपासंदर्भात महत्त्वाची माहिती देणार आहेत. तमाम भारतीयांचे डोळे पंतप्रधानांच्या भाषणाकडे लागले आहेत. (Narendra Modi to speak after Janta Curfew)

भारतात 32 राज्यं किंवा केंद्रशासित प्रदेश लॉक डाऊन करण्यात आली आहेत. 560 जिल्ह्यांच्या सीमा सील आहेत. महाराष्ट्रात पुढील आदेशापर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी एक दिवस जनता कर्फ्यू पाळून सर्व देशवासियांना एक दिवस घरी थांबण्याचं आवाहन केलं होतं. घरच्या घरी थाळीनाद किंवा घंटानाद करून अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आभार मानण्याचं आवाहन त्यांनी केलं होतं. लॉक डाऊन गांभीर्याने न घेणाऱ्या नागरिकांविषयी मोदींनी ट्विटरवर नाराजी व्यक्त केली होती, मात्र जनता कर्फ्यूनंतर मोदींनी प्रत्यक्ष संवाद साधलेला नाही. (Narendra Modi to speak after Janta Curfew)

भारतात 492 जणांना कोरोनाची लागण झाली असून 10 जणांचा मृत्यू झाला आहे. 446 जण अद्यापही कोरोनाग्रस्त आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण असून आकडा शंभरच्या पार गेला आहे.

‘कोरोना’विरोधी लढ्यात भारतासारख्या देशांनी जगाला मार्ग दाखवला पाहिजे, अशा शब्दात जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) भारताच्या पाठीवर कौतुकाची थाप ठोकली आहे.

भारतासारख्या देशांनी जगाला मार्ग दाखवला पाहिजे. प्रसंगी आक्रमक व्हावं लागतं. सर्वसामान्यांपासून देशाच्या प्रमुखांपर्यंत सार्वजनिक आरोग्य राखणाऱ्या कृती गंभीर परिणामकारक ठरु शकतात, असं जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने सांगण्यात आलं.

कांजिण्या आणि पोलिओ निर्मूलनात भारताने जगाचे नेतृत्व केले; सार्वजनिक आरोग्यासह समाज पातळीवरही भारताने आक्रमक कृती करणे चालूच ठेवले आहे हे खरोखर महत्वाचे आहे, अशा शब्दात भारताचा गौरव करण्यात आला.

(Narendra Modi to speak after Janta Curfew)