इतिहास साक्षी आहे, विस्तारवाद नेहमीच नष्ट झालाय, पंतप्रधान मोदींचा चीनला थेट इशारा

| Updated on: Jul 03, 2020 | 3:05 PM

पंतप्रधान मोदींनी चीनच्या विस्तारवादावर निशाणा साधत चीनला थेट इशारा दिला आहे (PM Narendra Modi warn China for Expansionism).

इतिहास साक्षी आहे, विस्तारवाद नेहमीच नष्ट झालाय, पंतप्रधान मोदींचा चीनला थेट इशारा
Follow us on

लडाख : भारत-चीन सीमेवर सुरु असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (3 जुलै) लडाखला भेट दिली. त्यांनी सैनिकांशी संवाद करत त्यांचा आत्मविश्वास वाढला. यावेळी त्यांनी चीनच्या विस्तारवादावर निशाणा साधत चीनला इशारा दिला आहे (PM Narendra Modi warn China for Expansionism). इतिहास साक्षी आहे विस्तारवाद नेहमीच नष्ट झाला आहे किंवा त्याला झुकावं लागलं आहे. आज देखील संपूर्ण जग या विस्तारवादाच्या विरोधात एक झाल्याचं मत नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं.


नरेंद्र मोदी म्हणाले, “विस्तारवादाचं युग संपलेलं आहे. हे युग विकासवादाचं आहे. वेगाने बदलणाऱ्या परिस्थितीत विकासवादाच योग्य आहे. यासाठीच भविष्यात संधी आहेत. विकासच भविष्याचा आधार आहे. मागील शतकांमध्ये विस्तारवादानेच मानवतेचं सर्वात जास्त नुकसान केलं, मानवतेला संपवण्याचा प्रयत्न केला. विस्तारवादाचं भूत ज्याच्या मानगुटीवर बसतं, तो नेहमीच जागतिक शांततेसाठी धोका बनला आहे.”

“इतिहास साक्षी आहे की विस्तारवाद करण्याचा प्रयत्न करणारे नेहमीच नष्ट झाले आहेत किंवा झुकले आहेत. याच अनुभवातून आताही संपूर्ण जगाने या विस्तारवादाच्या विरोधात एक होण्याचा निर्णय घेतला आहे. आज जग विकासवादासोबत आहे आणि खुल्या विकासाचं जग स्वागत करत आहे.”

“मानवतेच्या प्रगतिसाठी शांतता आणि मित्रता महत्त्वाची आहे. मात्र, कमकुवत लोक शांतता कधीच आणू शकत नाही हे आम्हाला माहिती आहे. शुरपणा हीच शांततेची पूर्वअट आहे. भारत जमीन, पाणी, हवा आण अंतराळात आपली शक्ती वाढवत आहे. यामागे मानव कल्याण हाच हेतू आहे. भारत आज आधुनिक शस्त्रास्त्रांची निर्मिती करत आहे. जगातील आधुनिक तंत्रज्ञान भारतीय सैन्यासाठी आणलं जात आहे. यामागे भारताला सशक्त करणं शांतता आणणं हाच आहे,” असं मोदींनी नमूद केलं.

पंतप्रधान मोदी म्हणाले, “जागतिक युद्ध असो की शांततेसाठी प्रयत्न करणं असो, जेव्हा जेव्हा गरज पडली आहे तेव्हा तेव्हा जगाने भारतीय सैन्याचा पराक्रम पाहिला आहे. भारताच्या सैन्याचे शांततेसाठीचे प्रयत्न सर्वांनी पाहिले आहेत. भारताने मानवतेच्या सुरक्षेसाठी नेहमीच प्रयत्न केले आहे, जीवन पणाला लावले आहे. तुम्ही या कामाचे अग्रभागीचे नेते आहात.”

“तुमचा उत्साह आणि शौर्य, देशाच्या मान-सन्मान आणि संरक्षणासाठी तुमचं समर्पण अतुलनीय आहे. तुम्ही ज्या कठीण परिस्थितीत, बर्फच्छादित प्रदेशात भारत मातेची ढाल बनून संरक्षण करतात त्याचा सामना संपूर्ण जगभरात कुणीही करु शकत नाही. तुमचं धैर्य या हिमालयापेक्षाही उंच आहे. तुमची इच्छाशक्ती आजूबाजूंच्या पर्वतांइतकी मजबूत आहे. आज मी या सर्व गोष्टींचा अनुभव घेत आहे. माझ्या डोळ्यांनी मी हे बघत आहे. देशाची संरक्षणाची जबाबदारी तुमच्यावर आहे. तुमच्यावर संपूर्ण देशाचा विश्वास आहे. त्यामुळेच देश निश्चिंत आहे. तुमचं सीमेवर तैनात असणं ही गोष्ट देशातील नागरिकांना काम करण्यासाठी प्रेरणा देते,” असंही मोदी म्हणाले.

हेही वाचा :

PM Modi at Nimu | जवानांच्या हातात देश सुरक्षित, जगाला भारताच्या सामर्थ्याचे दर्शन, लडाखमध्ये पंतप्रधान मोदींचे जवानांना नमन

Live Update : हिमालय जिंकणं आपलं ध्येय, आपला पण आहे : पंतप्रधान मोदी

भारतीय उद्योगपतीचा झटका, चीनला तब्बल 3000 कोटी रुपयांचा फटका

PM Narendra Modi warn China for Expansionism