CAA Protest : शुक्रवारच्या नमाजनंतर देशभरात निदर्शने, औरंगाबादेत महामोर्चा

| Updated on: Dec 20, 2019 | 5:27 PM

सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात (Protest against CAA and NRC). मोर्चे, निदर्शने अजूनही चालूच आहेत. दिल्लीपासून गल्लीपर्यंत आंदोलनाचं (Protest against CAA and NRC). लोण पोहोचलं आहे.

CAA Protest : शुक्रवारच्या नमाजनंतर देशभरात निदर्शने, औरंगाबादेत महामोर्चा
Follow us on

मुंबई : सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात (Protest against CAA and NRC). मोर्चे, निदर्शने अजूनही चालूच आहेत. दिल्लीपासून गल्लीपर्यंत आंदोलनाचं (Protest against CAA and NRC). लोण पोहोचलं आहे. महाराष्ट्रात गेल्या चार दिवसांपासून विविध जिल्ह्यात आंदोलनं सुरु आहेत. औरंगाबादमध्ये आज एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्त्वात निदर्शने करण्यात आली. महत्त्वाचं म्हणजे आज शुक्रवारच्या नमाजनंतर सर्व मुस्लिम नागरिकांनी, विविध शहरात उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरुन निषेध नोंदवला.

औरंगाबादेत एमआयएमचा महामोर्चा

सीएए आणि एनआरसी कायद्याविरोधात एमआयएमने औरंगाबादेत महामोर्चा काढला. औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात आझाद चौकातून या महामोर्चाला सुरुवात झाली. यावेळी मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. महामोर्चा रोशन गेट, चंपा चौक, बुढी लाईन, भडकल गेट, दिल्ली गेट मार्गे विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकला. या महामोर्चात मुस्लिम बांधव हजारोच्या संख्येने सहभागी झाले.

बीडमध्ये मोर्चा

संविधान बचाव संघर्ष समितीच्यावतीने परळीतील तहसील कार्यालयाबाहेर नागरिकत्व कायद्याविरोधात धरणे आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारने पारित केलेला कायदा दोन समाजात विभाजन करणारा असून हा कायदा रद्द करण्यात यावा, अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आली. आज दिवसभर जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी या कायद्याविरोधात आंदोलन तसेच मोर्चा काढण्यात येत आहे. तीव्र शब्दात केंद्र सरकारविरोधी घोषणा देत या विधेयकाला विरोध केला जात आहे.

नगरमध्ये विराट मोर्चा

अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरमध्ये विराट मोर्चा काढून नागरिकत्व कायद्याला विरोध दर्शवण्यात आला. या कायद्याविरोधात संविधान रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. मोर्चात हजारो मुस्लिम आंदोलक सहभागी झाले होते. जामा मशिदीजवळून प्रांत कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला.

आज कोपरगावात कडकडीत बंद पाळण्यात आला. संगमनेर आणि राहाता इथं संविधान रॅलीचे आयोजन करण्यात आलं.

भिवंडीत मोर्चा

नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात सर्व देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली असताना, भिवंडी शहरात शुक्रवारी दुपारी नमाजनंतर सर्व शहरातून मुस्लिम नागरीक उस्फूर्तपणे निदर्शने करण्यासाठी रस्त्यावर उतरले. त्यामुळे पोलीस यंत्रणेसह नागरिकांची तारांबळ उडाली.

चंद्रपुरातही महामोर्चा

शहरात मुस्लिम-बहुजन संघटनांनी CAA आणि NRC कायद्याविरोधात मोर्चा काढण्यात आला. गांधी चौकातून निघालेल्या मोर्चात नागरिकांचा लक्षणीय सहभाग होता.

अकोला : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात देशभर आंदोलने करण्यात येत असून, अकोल्यातही आज बहुजन क्रांती मोर्चाच्यावतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. जमिया मिलिया कॉलेजमध्ये झालेली कारवाई ही निंदनीय असून, याप्रकरणी चौकशी होऊन कारवाई करावी, नागरिकत्व कायदा रद्द करावा, आदी मागण्यांसाठी बहुजन क्रांती मोर्चाने आंदोलन करून आपल्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले.

सिंधुदुर्गात कायद्याच्या समर्थनार्थ आंदोलन

केंद्र सरकारने “नागरिकत्व सुधारणा कायदा संमत केल्यानंतर देशभरात या कायद्याला विरोध करण्यासाठी ठिकठिकाणी हिंसक आंदोलने केली जात आहेत. मात्र याउलट सिंधुदुर्गात या कायद्याच्या समर्थनार्थ आंदोलने केली जात आहेत. काल कुडाळ नंतर आज मालवण शहरात या कायद्याच्या समर्थनार्थ मालवणवासीयांनी एकत्र येत आंदोलन केलं आणि विधेयकाच्या विरोधात आंदोलन करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.