महसुलासाठी वाईन शॉप्स सुरु करा, राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

| Updated on: Apr 23, 2020 | 3:27 PM

'वाईन शॉप्स सुरु करा, याचा अर्थ दारु पिणाऱ्यांचा विचार करा, असा नाही. राज्याच्या घटत्या महसुलाचा विचार करा, असं राज ठाकरे म्हणतात (Raj Thackeray asks CM Uddhav Thackeray to reopen Wine Shops during Lockdown)

महसुलासाठी वाईन शॉप्स सुरु करा, राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
Follow us on

मुंबई : महाराष्ट्राचं रुतलेलं अर्थचक्र बाहेर काढावंच लागेल, अर्थव्यवस्थेसाठी काही निर्णय घ्यावेच लागतील. यासाठी हॉटेल्स आणि वाईन शॉप्स पुन्हा सुरु करुन बघायला काय हरकत आहे? असं जाहीर आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केलं आहे. दारुवरच्या अबकारी शुल्कातून राज्याला दिवसाला 41.66 कोटी, महिन्याला 1250 कोटी आणि वर्षाला 15 हजार कोटी मिळतात. जवळपास 35 दिवस झाल्याने राज्याने किती महसूल गमावला आणि किती गमावू याकडे राज ठाकरे यांनी लक्ष वेधलं आहे. (Raj Thackeray asks CM Uddhav Thackeray to reopen Wine Shops during Lockdown)

‘गेले 35 दिवस महाराष्ट्रातील उपहारगृहे आणि रेस्टॉरंट पूर्णपणे ठप्प आहेत. याचा फटका हॉटेल व्यावसायिक आणि कर्मचाऱ्यांच्या रोजगाराला बसला आहे, तसा सामान्यांनाही बसला आहे. आज मुंबई आणि इतर शहरांमध्ये हॉटेल ही काही चैनीची गोष्ट राहिली नाही, तर ती गरज बनली आहे.’ असं राज ठाकरे यांनी लिहिलं आहे.

‘छोटी हॉटेल, पोळी भाजी केंद्र, खानावळीमध्ये माफक दारात राईसप्लेट मिळते. त्यांची किचन्स सुरु होणं गरजेचं आहे. अनेकांच्या घरात जेवण बनवणारी व्यक्ती किंवा साधनसामग्री नसल्याने मोठी लोकसंख्या त्यावर अवलंबून आहे. हे वास्तव स्वीकारले पाहिजे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शारीरिक अंतर राखणं गरजेचे आहे, पण पार्सल सेवा सुरु करायला काय हरकत आहे?’ असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला आहे.

हेही वाचा : मला राजचीही साथ, उद्धव ठाकरेंकडून एकजुटीचा उल्लेख

‘पार्सल सेवा देताना ग्राहकांमध्ये पुरेसे अंतर राखले जात आहे आणि स्वच्छता ठेवली जात आहे, याची जबाबदारी हॉटेल मालकांची असेल. यातून राज्यातील मृत अर्थव्यवस्थेत धुगधुगी येईल’, असा विश्वास राज ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. (Raj Thackeray asks CM Uddhav Thackeray to reopen Wine Shops during Lockdown)

‘खडखडाट झालेल्या राज्याच्या तिजोरीत आता महसुलाची आवक सुरु व्हावी लागेल. जवळपास 18 मार्चपासून राज्य टाळेबंदीत आहे. आधी 31 मार्च, मग पुढे 14 एप्रिल आणि आता 3 मे आणि अजून किती दिवस पुढे ही परिस्थिती राहील, याची खात्री नाही. अशा काळात किमान वाईन शॉप्स सुरु करुन महसुलाचा ओघ सुरु होईल, हे बघायला काय हरकत आहे?’ असंही राज ठाकरे यांनी विचारलं.

हेही वाचा : मद्यविक्री दुकानांबाबत काटेकोरपणे नियमावली तयार करणार : राजेश टोपे

‘वाईन शॉप्स सुरु करा, याचा अर्थ दारु पिणाऱ्यांचा विचार करा, असा नाही. राज्याच्या घटत्या महसुलाचा विचार करा. हा विषय निव्वळ राज्याच्या महसुलाचा आहे, जो पूर्ण आटला आहे. पेट्रोलपंप जवळपास बंद आहेत. जमिनी आणि स्थावर मालमत्तांचे व्यवहार बंद आहेत. दारुवरच्या अबकारी शुल्कातून राज्याला दिवसाला 41.66 कोटी, महिन्याला 1250 कोटी आणि वर्षाला 15 हजार कोटी मिळतात. जवळपास 35 दिवस झाल्याने राज्याने किती महसूल गमावला आणि किती गमावू याचा अंदाज येईल’, असंही राज ठाकरे म्हणतात.