अतिवृष्टी, पूरग्रस्तांना तांदूळ, गहू, केरोसिन मोफत मिळणार

आपत्कालीन परिस्थितीत तातडीने अन्नधान्याची मदत व्हावी यासाठी शासनामार्फत आपादग्रस्त व निराधार कुटुंबांना प्रती कुटुंब 10 किलो गहू, 10 किलो तांदूळ व 5 लिटर केरोसिन मोफत देण्यात येणार आहे.

अतिवृष्टी, पूरग्रस्तांना तांदूळ, गहू, केरोसिन मोफत मिळणार
| Updated on: Aug 10, 2019 | 8:37 AM

मुंबई : राज्यात अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे (Sangli Flood) मोठ्या प्रमाणात कुटुंबं निराधार झाली आहेत. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत तातडीने अन्नधान्याची मदत व्हावी यासाठी शासनामार्फत आपातग्रस्त व निराधार कुटुंबांना प्रती कुटुंब 10 किलो गहू, 10 किलो तांदूळ व 5 लिटर केरोसिन मोफत देण्यात येणार आहे. येत्या आठवडाभरात अन्नधान्य व केरोसिन वाटपाचे काम शासनातर्फे पूर्ण करण्यात येणार आहे.

अतिवृष्टीमुळे उद्‍भवलेल्या आपातकालीन परिस्थितीमुळे 2 दिवसांपेक्षा जास्त कालावधीसाठी क्षेत्र पाण्यात बुडाल्यामुळे निराधार होणा-या कुटुंबांना अन्नधान्य वाटपाची कार्यपद्धती अन्न व नागरी पुरवठा विभागाने एका परिपत्रकाद्वारे निश्चित केली आहे. अतिवृष्टी व पूर परिस्थिती निर्माण झाल्याचे जाहीर केल्यानंतर पूरबाधीत कुटुंबांची संख्या त्यांना आवश्यक असणारे गहू व तांदळाचे प्रमाण, बाधित कुटुंबांची यादी या सर्व आवश्यक बाबी जिल्हास्तरीय महसूल यंत्रणेने जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना सांगितल्यानंतर गोदामात शिल्लक असलेल्या साठवणुकीतून तात्काळ वाटप सुरु करण्यात येणार आहे.

अन्न धान्याची अतिरिक्त मागणी असल्यास शासनामार्फत तात्काळ पुरवठा करण्यात येईल. यासाठीही भारतीय अन्न महामंडळाकडून अन्नधान्याची उचल करुन वाटप केलेल्या अन्नधान्याचे समायोजन करावे, अशा स्पष्ट सूचना विभागामार्फत संबधित यंत्रणेला देण्यात आल्या आहेत.

10 हजारांची तात्पुरती मदत

सांगली जिल्ह्यात आलेल्या पुराचा फटका मोठ्या प्रमाणावर लोकांना बसल्याने शासनाने तात्पुरती 10 हजार रूपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच जिल्ह्यातील पूरपरिस्थिती जाणून घेऊन नुकसान भरपाई देण्यात येईल. असेही सहकारमदत व पुनर्वसन मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी जाहीर केले आहे. 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us