Bihar Election : आमची मतं शिवसेनेला जातात, नितीशकुमारांच्या आक्षेपानंतर ‘धनुष्यबाण’ गोत्यात

| Updated on: Oct 04, 2020 | 10:06 AM

शिवसेनेचे उमेदवार बिहार विधानसभा निवडणुकीत धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह वापरू शकत नाहीत. जेडीयूच्या आक्षेपानंतर निवडणूक आयोगाने याबाबत आदेश दिले आहेत.

Bihar Election : आमची मतं शिवसेनेला जातात, नितीशकुमारांच्या आक्षेपानंतर धनुष्यबाण गोत्यात
Follow us on

पाटणा : शिवसेना (Shiv Sena) बिहार विधानसभा निवडणुकीत (Bihar Vidhansabha Polls) 50 जागा लढवणार आहे. परंतु ही निवडणूक शिवसेनेला त्यांच्या धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावर लढता येणार नाही. तसे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. (Shiv Sena cannot contest Bihar elections on Bow and arrow symbol – Election Commission orders)

बिहारमध्ये नितीशकुमार यांचा जनता दल (JDU) हा पक्ष सत्तेत आहे. बाण हे जेडीयू पक्षाचे निवडणूक चिन्ह आहे. त्यामुळे शिवसेनेचे निवडणूक चिन्ह असलेल्या धनुष्यबाणावर नितीश कुमार यांच्या जेडीयूचा आक्षेप होता. त्यामुळे शिवसेना बिहारमध्ये धनुष्यबाणाच्या चिन्हावर निवडणूक लढू शकत नाही.

शिवसेनेच्या निवडणूक चिन्हामुळे मतदारांचा गोंधळ होतो. आमची मते शिवसेनेला जातात. असा दावा जेडीयूने केला आहे. तसेच शिवसेना आणि झारखंड मुक्ती मोर्चा हे स्थानिक प्रसिद्ध किंवा ओळखीचे राजकीय पक्ष नाहीत. त्यामुळे या दोन्ही पक्षांना धनुष्यबाण ही निशाणी देण्यात येऊ नये, अशी मागणी जेडीयूने केली होती.

दरम्यान, बिहारमध्ये शिवसेनेच्या मतांच्या चढत्या आलेखामुळे जेडीयूने आणि त्यांच्या मित्र पक्षांनी धसका घेतला आहे, अशी टीका शिवसेनेचे सचिव आणि खासदार अनिल देसाई यांनी केली आहे.

देसाई म्हणाले की, शिवसेना बिहार विधानसभा निवडणूक लढवणार आहे. आम्ही अंदाजे अंदाजे 50 जागा लढवतो आहोत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर आज आम्ही निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे. त्यात आम्ही मागणी केली आहे की, फ्री सिम्बॉलपैकी एक चिन्ह आम्हाला देण्यात यावे. शिवसेनेचे सर्व उमेदवार त्या चिन्हावर निवडणूक लढतील.

2015 च्या बिहार विधानसभा निवडणुकीतील शिवसेनेची कामगिरी

  • शिवसेनेने लढवलेल्या एकूण जागा – 80/243
  • एकूण मिळालेली मते – 2 लाख 11 हजार 131
  • तिसऱ्या क्रमांकावरील एकूण उमेदवार – 07 (जमालपूर, कुम्हरार, पटनासाहिब, मोरवा, हयाघाट, दिनारा, बोचहा)
  • चौथ्या क्रमांकावरील एकूण उमेदवार – 02 (भमुआ, मनिहारी)
  • पाचव्या क्रमांकावरील एकूण उमेदवार – 01 (बलरामपूर)
  • एकूण 35 जागांवर शिवसेनेला भाजपपेक्षा अधिक मतं मिळाली होती. यापैकी तीन जागांवर शिवसेनेने घेतलेल्या निर्णायक मतांमुळे भाजप उमेदवार पराभूत झाले होते.
  • शिवसेनेला राष्ट्रवादी काँग्रेस आणि एमआयएम पक्षापेक्षा अधिक मतं मिळाली होती (राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेली मतं – 1 लाख 85 हजार 437, एमआयएमला मिळालेली मतं – 80 हजार 248)

लोकसभा निवडणूक 2019

  • शिवसेनेने एकूण लढवलेल्या जागा – 14/40
  • एकूण मिळालेली मतं – 64 हजार

संबंधित बातम्या

बिहार जिंकणारच, प्रभारीपदी नियुक्ती होताच देवेंद्र फडणवीसांचा एल्गार

MIM सोबत युतीने महाराष्ट्रात सुरुवात, आता देशात नवे राजकीय समीकरण, बिहार निवडणुकीसाठी प्रकाश आंबेडकरांचा एल्गार

(Shiv Sena cannot contest Bihar elections on Bow and arrow symbol – Election Commission orders)