मोठी बातमी: शिवसैनिकांनी पुण्यातील भाजप कार्यालयात सोडल्या कोंबड्या

Shivsena Pune | पुण्यात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयात कोंबड्या सोडल्या. तसेच 'नारायण राणे चोर है', अशी घोषणाबाजी केली. त्यामुळे याठिकाणी वातावरण चांगलेच तापले आहे.

मोठी बातमी: शिवसैनिकांनी पुण्यातील भाजप कार्यालयात सोडल्या कोंबड्या
Reporter Ashwini Satav Doke | Edited By: Rohit Dhamnaskar | Updated on: Aug 24, 2021 | 11:58 AM

पुणे: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यभरात शिवसैनिक प्रचंड आक्रमक झाले आहेत. पुण्यात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयात कोंबड्या सोडल्या.  तसेच ‘नारायण राणे चोर है’, अशी घोषणाबाजी केली. याशिवाय, नारायण राणे यांच्या आर डेक्कन मॉलवरती शिवसैनिकांनी जोरदार दगडफेक केल्यामुळे याठिकाणी वातावरण चांगलेच तापले आहे.

तत्पूर्वी मुंबईत पहाटेच्यावेळी शिवसेनेकडून नारायण राणे यांच्याविरोधात पोस्टर्स लावण्यात आली होती. बईतील दादर टीटी भागात शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक अमेय घोले यांनी नारायण राणे यांचा मोठा फोटो बॅनरवर लावला होता. त्यावर “कोंबडी चोर !!!” असे नारायण राणेंना झोंबणारे शब्द लिहिले आहेत. मात्र, पोलिसांना याबद्दल माहिती मिळाल्यानंतर हा बॅनर तातडीने हटवण्यात आला होता.

नाशिकमध्ये शिवसैनिकांनी भाजपचं कार्यालय फोडलं

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी अपशब्द वापरल्याने शिवसैनिकांचा संताप अनावर झाला आहे. नाशिकमध्ये शिवसैनिकांनी भाजपच्या कार्यालयाच फोडले आहे. भाजपच्या कार्यालयावर दगडफेक करत शिवसैनिकांनी हे कार्यालय फोडले आहे.

जुन्या नाशिकमध्ये भाजपचं वसंत स्मृती हे अलिशान कार्यालय आहे. शिवसैनिक गाडीत बसून आले आणि त्यांनी भाजपच्या कार्यालयावर प्रचंड दगडफेक केली. यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राला कोरोनाच्या काळात सावरले. त्यांनी महाराष्ट्र वाचवला. ते आमचे कुटुंब प्रमुख आहे. उद्धव ठाकरेंवर टीका केली तर त्याचे जशास तसे उत्तर दिलं जाईल. ही तर सुरुवात आहे, असा इशारा संतप्त शिवसैनिकांनी राणे यांना दिला.

काय आहे प्रकरण?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर पातळी सोडून टीका केल्याचे प्रकरण आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना भोवण्याची शक्यता आहे. कारण, नारायण राणे यांच्यावर पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांना अटक करण्यात येणार आहे. शिवसेना नेते सुधाकर बडगुजर यांनी नाशिक पोलिसांकडे यासंदर्भात तक्रार केली होती. नाशिक पोलिसांच्या सायबर सेलने नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल केला होता.

नारायण राणे नेमकं काय म्हणाले होते?

नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा सध्या कोकणात आहे. रायगडच्या महाडमध्ये पत्रकारांशी बोलताना राणे यांनी मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष असल्याचं विसरले. त्यावेळी त्यांनी हीरक महोत्सव हा शब्द वापरला. मात्र, तिथे उपस्थित असलेले राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी मुख्यमंत्र्यांना अमृत महोत्सव असल्याचं सांगितलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपली चूक सुधारली. “आज 74 वर्षे पूर्ण करुन 75 व्या वर्षात अमृत महोत्सवी… नाही हीरक महोत्सवी… अमृत महोत्सवी वर्षात आपण पदार्पण करतो आहोत”, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यावरुन राणे यांनी मी तिथे असतो तर कानाखाली लगावली असती, असा शब्दांत नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर प्रहार केला होता.

संबंधित बातम्या:

मग त्यावेळेस मुख्यमंत्र्यांवर गुन्हा का दाखल झाला नाही? राणे म्हणतात, मी क्रिमिनल ऑफेन्स केलाच नाही

Narayan Rane : मी नॉर्मल माणूस वाटलो काय? आमचं पण वरती सरकार, बघतोच : नारायण राणे

“कोंबडी चोर !!!” नारायण राणेंच्या वक्तव्यानंतर शिवसैनिकांचा संताप, दादरमध्ये डिवचणारे पोस्टर

Follow Us