बालभारतीच्या आठवीच्या पुस्तकात घोडचूक, भगतसिंह, राजगुरुंसह कुरबान हुसेन फासावर गेल्याचा उल्लेख

| Updated on: Jul 17, 2020 | 11:29 AM

प्रख्यात लेखक यदुनाथ थत्ते यांच्या "भारत माझा देश आहे" या पाठात चूक झाल्याचे निदर्शनास आले आहे.

बालभारतीच्या आठवीच्या पुस्तकात घोडचूक, भगतसिंह, राजगुरुंसह कुरबान हुसेन फासावर गेल्याचा उल्लेख
Follow us on

पुणे : राज्य शिक्षण प्रसारक मंडळाकडून बालभारतीच्या पुस्तकात अक्षम्य चूक झाल्याचे समोर येत आहे. इयत्ता आठवीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट असलेल्या पुस्तकात क्रांतिकारक भगतसिंह, राजगुरु यांच्यासह फासावर गेलेल्या सुखदेव यांच्याऐवजी कुरबान हुसेन अशा नावाचा उल्लेख करण्यात आलेला आहे. (SSC Balbharati Eight Standard Book Mistaken Indian revolutionary Shaheed Sukhdev with Qurbaan Hussain)

भारतीय स्वातंत्र्य संग्रामात देशाच्या स्वातंत्र्यासाठी फासावर गेलेल्या भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरु या तिघांची नावे देशभरातील प्रत्येक नागरिकाच्या मनावर कोरलेली आहेत. मात्र प्रख्यात लेखक यदुनाथ थत्ते यांच्या “भारत माझा देश आहे” या पाठात चूक झाल्याचे निदर्शनास आले आहे.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

आठवीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट असलेल्या या धड्यात भगतसिंह, राजगुरु यांच्यासह कुरबान हुसेन फासावर गेल्याचे लिहिले आहे. राज्य शिक्षण प्रसारक मंडळाकडून ही छपाईतील चूक झाली, की जाणीवपूर्वक त्यात खोडसाळपणा करण्यात आला आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

काय आहे उल्लेख?

“देशावर प्रेम करायचे तर भूमी आणि भूमिपुत्र, दोघांवर प्रेम हवे, होय ना?”
“बरोबर आहे” मुले म्हणाली.
एक मुलगा म्हणाला, “भगतसिंह, राजगुरु, कुरबान हुसेन हे फासावर गेले. ते देशावर खरेखुरे प्रेम करत होते”
मी विचारले “ते खरेच आहे, पण आता त्यांच्यासारखे प्रेम करायचे तर देश पुन्हा गुलाम व्हायला हवा? आपले देशावर प्रेम असते ते फक्त आपत्काळी…

 

दरम्यान, सरकारने संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी ब्राह्मण महासंघाच्या आनंद दवे यांनी केली आहे. “आठवीच्या मराठीच्या पुस्तकातील चूक ही ‘गाढव चूक’ असून निंदनीय आहे. हे पुस्तक त्वरित मागे घ्यावे आणि जबाबदार व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात यावा” असे दवे म्हणाले.

“याची शहानिशा करुन चौकशी व्हावी. ही छपाईची चूक असू शकते, जाणूनबुजून कोणी केले असेल असे वाटत नाही” असे राष्ट्रवादीचे विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी म्हणाले. “महाविकास आघाडी सरकार संवेदनशील असून प्रत्येक महामानवाचा विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा विचार करते. त्यामुळे याला राजकीय रंग असेल असे वाटत नाही, चौकशी करुन कारवाई करावी” अशी प्रतिक्रिया अमोल मिटकरी यांनी दिली.