एसएससी बोर्डाच्या दहावी-बारावीचे निकाल लांबण्याची शक्यता

| Updated on: May 10, 2020 | 10:33 AM

निकाल लांबल्यास पुढील शैक्षणिक प्रक्रिया आणि फेरपरीक्षांच्या नियोजनावरही परिणाम होणार आहे. (SSC HSC Exam Result may delay)

एसएससी बोर्डाच्या दहावी-बारावीचे निकाल लांबण्याची शक्यता
Follow us on

पुणे : एसएससी बोर्डाच्या इयत्ता दहावी आणि बारावीचे निकाल लांबण्याची शक्यता आहे. बोर्डाच्या उत्तरपत्रिका तपासणी आणि सबमिशनची कामं मंदावल्यामुळे पुढील नियोजनावर परिणाम होण्याची चिन्हं आहेत. (SSC HSC Exam Result may delay)

‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर जाहीर केलेल्या लॉकडाऊनची मुदत वाढवल्यामुळे शाळा-महाविद्यालये बंदच आहेत. दहावी आणि बारावीच्या काही उत्तरपत्रिका शाळा आणि मॉडरेटर यांच्याकडे पडल्या आहेत. अनेक शिक्षकांनी त्या अजूनही ताब्यात घेतल्या नसल्याची माहिती आहे.

ज्या उत्तरपत्रिका तपासलेल्या आहेत, त्यांचे शिक्षण मंडळाकडे पुरेशा प्रमाणात सबमिशन झालेले नाही. शिक्षण मंडळाकडून शिक्षकांना फोन करुन उत्तरपत्रिका लवकर तपासण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. निकाल लांबल्यास पुढील शैक्षणिक प्रक्रिया आणि फेरपरीक्षांच्या नियोजनावरही परिणाम होणार आहे.

हेही वाचा : दहावीचा भूगोलाचा पेपर रद्द, शिक्षण विभागाचा एसएससीच्या विद्यार्थ्यांना दिलासा

बारावीचे निकाल मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होतात. त्यानंतर साधारण तीन आठवड्यांनी म्हणजे जून महिन्याच्या अखेरपर्यंत दहावीचे निकाल विद्यार्थ्यांना मिळतात. (SSC HSC Exam Result may delay)

हेही वाचा : दहावी-बारावीचे निकाल वेळेत लावण्यासाठी एसएससी बोर्डाची लगबग

बारावीचे निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात निकाल जाहीर होणं अशक्य दिसत असल्याने शिक्षकांना एप्रिल महिन्यातच उत्तरपत्रिका घरी नेण्याची परवानगी देण्यात आली होती. शिक्षकांना बोर्डाच्या उत्तरपत्रिका घरी घेऊन जाण्याची विशेष सवलत देण्यात आली होती.

एसएससीचा इयत्ता दहावीचा भूगोल विषयाचा पेपर रद्द करण्यात आला आहे. ‘कोरोना’चा वाढता प्रादुर्भाव आणि लॉकडाऊन वाढवल्याच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने गेल्याच महिन्यात हा महत्वाचा निर्णय घेतला होता. 21 मार्चला इतिहास आणि नागरिकशास्त्र विषयाचा पेपर झाला होता, मात्र 23 मार्चला नियोजित भूगोलाचा पेपर त्यावेळी पुढे ढकलण्यात आला होता.