Jammu and Kashmir | भाजप नेते वसीम बारी यांची हत्या

| Updated on: Jul 09, 2020 | 2:11 AM

जम्मू-काश्मीरच्या बंदीपोरा येथे अतिरेक्यांनी भाजप नेते वसीम बारी यांची हत्या केली (Terrorists fired upon bjp leader Wasim Bari).

Jammu and Kashmir | भाजप नेते वसीम बारी यांची हत्या
Follow us on

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या बंदीपोरा येथे अतिरेक्यांनी भाजप नेते वसीम बारी यांची हत्या केली. अतिरेक्यांनी बुधवारी (8 जुलै) रात्री वसीम यांच्या बंदीपोऱ्यातील दुकानाजवळ जाऊन बेछूट गोळीबार केला. या गोळीबारात वसीम यांचे वडील बशीर अहमद आणि भाऊ उमर सुल्तान यांचादेखील मृत्यू झाल्याची माहिती जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंह यांनी दिली. ही घटना बुधवारी (8 जुलै) रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली (Terrorists fired upon bjp leader Wasim Bari).

वसीम बारी यांचं बंदीपोरामध्ये दुकान आहे. दुकानाजवळच त्यांचं घरदेखील आहे. बुधवारी (8 जुलै) रात्री ते वडील आणि भावासोबत दुकानात होते. यावेळी अतिरेक्यांनी दुकानाबाहेर घेराव घातला. दुकानात वसीम यांच्यासोबत एकही सुरक्षा रक्षक नव्हता. याच संधीचा फायदा घेत अतिरेक्यांनी गोळीबार सुरु केला. या हल्ल्यात वसीम, त्यांचे वडील आणि भाऊ यांचा मृत्यू झाला.

वसीम यांच्या सुरक्षेसाठी 8 सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले होते. मात्र, अतिरेक्यांनी हल्ला केला तेव्हा घटनास्थळी एकही सुरक्षा रक्षक उपस्थित नव्हता. त्यामुळे सुरक्षा रक्षकांना अटक करण्यात आल्याची माहिती, पोलिसांनी दिली आहे (Terrorists fired upon bjp leader Wasim Bari).

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी वसीम यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. “आज आपण बंदीपोऱ्यात वसीम बारी, त्यांचे वडील आणि भाऊ गमावले आहेत. हे पक्षाचं खूप मोठं नुकसान आहे. आम्ही त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहोत. त्याचं बलिदान व्यर्थ जाणार नाही”, असं जे. पी. नड्डा म्हणाले.

भाजपचे सरचिटणीस राम माधव आणि बीएल संतोष यांनीदेखील वसीम यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केलं आहे. “वसीम यांचा गुन्हा इतकाच होता की, त्यांनी हातात तिरंगा घेतला. देशाच्या काही भागात देशभक्त होण्यासाठी जीवाची किंमत मोजावी लागते”, असं बीएल संतोष म्हणाले.

काही दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग येथे अतिरेक्यांनी सरपंच अजय पंडिता यांची हत्या केली होती. लष्कर-ए-तोयबाशी संबंधित द रेजिस्टेंस फ्रंटने या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. अजय पंडिता हे काँग्रेसचे नेते होते. हल्लेखोरांनी अजय यांच्या घराजवळच जाऊन गोळीबार केला होता. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.