चंद्रपुरात हजारो मजुरांची धडकी भरवणारी गर्दी, मजुरी नाही, रेशन संपल्याने प्रवास करु देण्याची मागणी

| Updated on: May 02, 2020 | 12:50 PM

मजुरी नाही, रेशन संपलं, त्यामुळे गावी जाण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी जवळपास 1500 मजुरांनी महामार्गावर येऊन ठिय्या मांडला.

चंद्रपुरात हजारो मजुरांची धडकी भरवणारी गर्दी, मजुरी नाही, रेशन संपल्याने प्रवास करु देण्याची मागणी
Follow us on

चंद्रपूर : चंद्रपुरात हजारो बांधकाम मजूर रस्त्यावर आले (Chandrapur labors on road) आहेत. मजुरी नाही, रेशन संपलं, त्यामुळे गावी जाण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी जवळपास 1500 मजुरांनी महामार्गावर येऊन ठिय्या मांडला. हे सर्व मजूर चंद्रपूरच्या नव्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय इमारतीच्या बांधकामाचं काम करत आहेत. सर्वजण उत्तर प्रदेश-बिहार-बंगालचे मजूर आहेत. (Chandrapur labors on road)

मजुरांसाठी काल तेलंगणातून झारखंडकडे एक रेल्वे रवाना झाली. ही रेल्वे चंद्रपुरातून गेली, मात्र चंद्रपुरातील मजुरांना त्यामध्ये प्रवेश दिला नाही.  त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील महत्त्वाचे रेल्वे स्थानक असलेल्या बल्लारपूर येथून मजूर स्पेशल रेल्वे गाडी बिहार बझारखंडच्या दिशेने रवाना होण्याच्या 12 तासांच्या आतच, त्याचे वेगळे परिणाम दिसू लागले आहेत. या रेल्वेस्थानकापासून केवळ काही किलोमीटर अंतरावर असलेल्या चंद्रपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय इमारत बांधकामस्थळी कामावर असलेले मजूर, अचानक महामार्गावर येऊन आंदोलन करु लागले.

चंद्रपूर -बल्लारपूर वळण मार्गावर ही नवी इमारत होऊ घातली आहे. प्रख्यात बांधकाम कंपनी शापूरजी -पालनजी यांच्याकडे बांधकामाचे कंत्राट आहे. इथले बांधकाम दीड महिन्यांपासून बंद आहे. मात्र इथला मजूर वर्ग काम नसल्याने आणि मजुरी मिळत नसल्याने संतापला आहे. सोबतच कंपनीने आश्‍वासन दिलेले रेशनदेखील अदा झाले नसल्याने या संतापात भर पडली.

आज सुमारे पंधराशे बांधकाम मजूर अचानक चंद्रपूर- हैदराबाद महामार्गावर आले आणि त्यांनी काही काळ महामार्ग रोखण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळी तातडीने पोलिस आणि महसूल विभागाचे अधिकारी दाखल झाले. सोबतच वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर मोरे यांनी देखील मजुरांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र गेल्या दीड महिन्यात कंपनीतर्फे केवळ आश्वासने दिली गेली आहेत, त्यामुळे आमच्या गावी जाण्यासाठी आम्हाला मुभा द्या अशी मागणी या कामगारांनी केली आहे. काम नाही- मजुरी नाही- रेशन नाही यापेक्षा गावाकडे कुटुंबासोबत राहू असं या कामगारांचं म्हणणं आहे.

दरम्यान वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या कामगारांच्या प्रतिनिधींनीसोबत बैठक घेत त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. देश आणि राज्यातील मजूर लॉकडाऊनमुळे जैसे थे परिस्थितीत होते. मात्र लॉकडाऊन- 3 च्या पार्श्वभूमीवर मजूर स्पेशल रेल्वे गाडी धावू लागल्याने, या मजुरांना आता पुढे नवा पर्याय दिसू लागला आहे. यामुळे अचानक ही परिस्थिती उद्भवली आहे.

चंद्रपूरच्या रामनगर पोलीस ठाण्यात आता या सर्व कामगार आणि प्रशासनाची एक बैठक होऊ घातली असून, त्यात यासंबंधी तोडगा अपेक्षित आहे. एवढ्या मोठ्या संख्येत कामगार अचानक रस्त्यावर आल्याने बिकट परिस्थिती उद्भवली होती. मात्र पोलिसांनी वेळीच कारवाई करत संयमाने स्थिती हाताळली.

(Chandrapur labors on road)