हत्येच्या आरोपात अकरा वर्षांची जेल, मुरबाडमधील दोघांची निर्दोष सुटका

| Updated on: Sep 08, 2019 | 12:13 PM

मुरबाडमधील ज्ञानेश्वर मानभाव या तरुणाच्या हत्येप्रकरणी उमेश पडवळ आणि प्रविण गोडसे या दोघांनी अकरा वर्षांचा तुरुंगवास भोगला आहे. सुप्रीम कोर्टाने आता दोघांची निर्दोष सुटका केली आहे

हत्येच्या आरोपात अकरा वर्षांची जेल, मुरबाडमधील दोघांची निर्दोष सुटका
Follow us on

रायगड : हत्येच्या आरोपाखाली अकरा वर्ष तुरुंगवास भोगल्यानंतर दोघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. मुरबाडमध्ये झालेल्या तरुणाच्या हत्या (Murbad Murder) प्रकरणातून सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) आरोपींची निर्दोष सुटका केली आहे.

उमेश पडवळ आणि प्रविण गोडसे अशी निर्दोष सुटलेल्या तरुणांची नावं आहेत. शिक्षा झाली त्यावेळी उमेश 18 वर्षांचा, तर प्रवीण वीस वर्षांचा होता. मुरबाड तालुक्यातील गोरक्षगडाच्या जंगलात ज्ञानेश्वर मानभाव या तरुणाचा मृतदेह आढळला होता. ज्ञानेश्वरच्या हत्या प्रकरणाचा ठपका ठेवत दोघांना तुरुंगात धाडण्यात आलं होतं.

उमेश पडवळ आणि प्रविण गोडसे हे दोघं ज्ञानेश्वरला वाशिंदमधील जिंदल कंपनीत नोकरी देण्याचं आश्वासन देत घेऊन गेले होते. ज्ञानेश्वरचं लग्न झालं होतं, मात्र बेरोजगारीमुळे तो प्लम्बिंगची कामं करत होता. नोकरीसाठी उमेशच्या माध्यमातून ज्ञानेश्वरने एका व्यक्तीला 60 हजार रुपयेही दिले होते.

दोघांसोबत वाशिंदला गेलेला ज्ञानेश्वर घरी परतलाच नाही. वाशिंद रेल्वे स्थानकावरुन तो एकाएकी निघून गेल्याचं उमेश-प्रविण यांनी सांगितलं. अखेर, ज्ञानेश्वरचा मृतदेह गोरक्षगडाच्या जंगलात सापडला. ज्ञानेश्वरचं अपहरण आणि हत्या उमेश आणि प्रविण यांनी केल्याच्या संशयातून त्यांना बेड्या ठोकण्यात आल्या होत्या.

या गुन्ह्यासाठी तब्बल अकरा वर्ष सात महिन्यांचा तुरुंगवास त्या दोघांनी भोगला. ‘मारेकरी’ असा शिक्का घेऊन दोघांच्या आयुष्यातील अकरा वर्ष वाया घालवल्याबद्दल कुटुंबीयांनी हळहळ व्यक्त केली आहे.

चांदवड हत्याकांड आणि निर्दोष सुटका प्रकरणाची पुनरावृत्ती

यापूर्वी, हत्येच्या आरोपात अडकल्यामुळे फाशीची शिक्षा सुनावलेल्या नाशकातील सहा जणांची तब्बल दहा वर्षांनी निर्दोष सुटका करण्यात आली होती. या सहा जणांच्या पुनर्वसनासाठी प्रत्येकी पाच लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकारला दिले होते.

सशस्त्र दरोडा, संबंधित कुटुंबातील पाच सदस्यांची हत्या आणि गँगरेप प्रकरणी अंकुश मारुती शिंदे, राज्या अप्पा शिंदे, राजू म्हसू शिंदे, अंबादास लक्ष्मण शिंदे, बापू अप्पा शिंदे आणि सुऱ्या उर्फ सुरेश शिंदे या सहा जणांना दोषी ठरवण्यात आलं होतं.