आजी-माजी सैनिकांच्या पाल्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशात 5 टक्के आरक्षण, उदय सामंत यांची घोषणा

| Updated on: Oct 24, 2020 | 9:27 PM

उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील सर्व महाविद्यालयात पदविका आणि पदवी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशात राज्यातील आजी/ माजी सैनिकांच्या पाल्यांना 5 टक्के जागा आरक्षित ठेवण्यात येणार आहेत.

आजी-माजी सैनिकांच्या पाल्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशात 5 टक्के आरक्षण, उदय सामंत यांची घोषणा
Follow us on

मुंबई : उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील सर्व महाविद्यालयात पदविका आणि पदवी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशात राज्यातील आजी/ माजी सैनिकांच्या पाल्यांना 5 टक्के जागा आरक्षित ठेवण्यात येणार आहेत. या पूर्वीची जास्तीत जास्त 5 जागांची अट रद्द करण्यात येत आहे, अशी घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज (24 ऑक्टोबर) पत्रकार परिषदेत केली (Uday Samant declare 5 percent Reservation for Soldier Child in vocational courses).

उदय सामंत म्हणाले, “केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेमध्ये समाविष्ट प्रत्येक अभ्याक्रमासाठी 5 टक्के समांतर आरक्षण विहित करण्यात आले आहे. या प्रवेशासाठी प्रत्येक संस्थेमध्ये असलेली जास्तीत जास्त 5 जागांची प्रचलित अट चालू शैक्षणिक वर्षापासून रद्द करण्यात येत आहे. एमएचटी-सीईटी 2020 ऑनलाईन प्रवेश परीक्षेसाठी ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्र डाऊनलोड केले होते, परंतु कोव्हिड-19 विषाणूचा प्रादुर्भाव आणि अतिवृष्टीमुळे परीक्षेस उपस्थित राहिले नाहीत, अशा विद्यार्थ्यांसाठी विशेष परीक्षेचे नियोजन करण्यात येणार आहे.”

“तसेच प्रवेश नोंदणीसाठी  आता 26 ऑक्टोबर 2020 रोजी रात्री 12 वाजेपर्यंतची  मुदत वाढ देण्यात आली आहे. तसेच सदरील उमेदवारांची परीक्षा पुढील 15 दिवसात घेण्याच्या सूचनाही विभागास देण्यात आल्या आहेत. विद्यापीठांमध्ये ऑनलाईन परिक्षांबाबत काही ठिकाणी अडचणी आल्या आहेत.  त्याबाबत  चौकशी करून परीक्षा घेणाऱ्या संबंधित संस्थेवर कारवाई करण्यात येईल. यासाठी  4 सदस्यीय सत्यशोधन समिती गठीत करण्यात आली आहे. ज्या विद्यापीठांना आपल्या परीक्षा 31 ऑक्टोबर 2020 पर्यंत घेणे शक्य नाही, त्यांनी  विद्यापीठ अनुदान आयोग, राज्यपाल आणि राज्य शासनास अहवाल सादर करावा,” असंही उदय सामंत म्हणाले.

‘कोणत्याही विद्यार्थ्याच्या प्रमाणपत्रावर कोविड –19 चा  उल्लेख राहणार नाही’

“ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेणे बाकी आहे अथवा अन्य कारणांमुळे परीक्षा देऊ शकले नाहीत अशा सर्व विद्यार्थ्यांच्या उर्वरित परीक्षा या दिवाळीपूर्वी घेण्यात याव्यात. कोणत्याही विद्यार्थ्याच्या प्रमाणपत्रावर कोविड –19 चा  उल्लेख राहणार नाही.  विद्यार्थ्यांना दरवर्षीप्रमाणे त्यांचे पदवी प्रमाणपत्र देण्यात येईल,” असंही सामंत यांनी यावेळी सांगितले.

उदय सामंत म्हणाले, “शैक्षणिक वर्ष 2019-20 मध्ये तंत्रशिक्षणातील अभ्यासक्रमाला मागास प्रवर्गातील उमेदवारांनी प्रवेश घेतले आहेत. परंतु जात पडताळणी प्रमाणपत्र सादर केले नाहीत अशा उमेदवारांची यादी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष यांनी शासनाकडे पाठवावी. यावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. पुढील शैक्षणिक वर्षापासून सीईटी परीक्षेचे केंद्र तालुका स्तरावर घेण्यात येणार आहे. त्याची सर्व तयारी करण्याच्या सूचना संबंधित विभागास दिल्या आहेत. यावर्षी 50 पेक्षा अधिक ठिकाणी नवीन परीक्षा केंद्रे वाढवण्यात आली आहेत.”

“राज्यातील उच्च शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोग, अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद यांनी केलेल्या नवीन शैक्षणिक सुधारणा इत्यादी बाबी तपासून महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, 2016 मध्ये सुधारणा करणे अपरिहार्य आहे. या सुधारणा करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. तसेच नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण – 2020 चा अभ्यास करण्यासाठी डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यबल गट (Task Force)  गठीत करण्यात आला आहे,” असंही सामंत यांनी सांगितले.

हेही वाचा :

रखडलेल्या परीक्षा 10 नोव्हेंबरपर्यंत घेणार, सामंतांची घोषणा, विद्यापीठ कायद्यात सुधारणांसाठी समिती

लालपरीतील प्रवासी मास्क लावतात की नाही, उदय सामंतांनी केली पाहणी

पालकमंत्री अमिताभ बच्चन आहे का? नितेश राणेंनी सरकारी अधिकाऱ्याला झाडलं, तासात न आल्यास मिरवणूक काढतो, धमकीचा व्हिडीओ व्हायरल

Uday Samant declare 5 percent Reservation for Soldier Child in vocational courses