भिल्ल कुटुंबाने गाव सोडून जाण्यास नकार दिल्याने जबर मारहाण

| Updated on: Jul 05, 2019 | 3:46 PM

गाव सोडून जायला नकार दिल्याच्या रागातून सवर्ण समाजाकडून एका भिल्ल कुटुंबाला अमानुष मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार गेवराई तालुक्यातील वंजारवाडी या गावात घडला.

भिल्ल कुटुंबाने गाव सोडून जाण्यास नकार दिल्याने जबर मारहाण
Follow us on

बीड : गाव सोडून जायला नकार दिल्याच्या रागातून सवर्ण समाजाकडून एका भिल्ल कुटुंबाला अमानुष मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार गेवराई तालुक्यातील वंजारवाडी या गावात घडला. मारहाणीनंतर पीडित कुटुंबाने पोलिसांकडे तक्रार दिली. मात्र, तक्रार का दिली म्हणून पुन्हा या कुटुंबाला मारहाण झाल्याचेही समोर आले आहे.

पीडित कुटुंबाची तक्रार आल्यानंतर पोलिसांनी मारहाण करणाऱ्या लोकांवर गुन्हा दाखल केला. तसेच आरोपींना अटकही केली. दरम्यान, तक्रार का दाखल केली अशी विचारणा करत आरोपींच्या नातेवाईकांनी सवर्णांनी भिल्ल कुटुंबाला पुन्हा अमानुष मारहाण केली. दरम्यान, मारहाण होत असताना तेथे उपस्थित व्यक्तीने या घटनेचा व्हिडीओ मोबाईलवर काढला. हाच मारहाणीचा व्हिडीओ आज सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. घटनेनंतर पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नसल्याचा आरोप पीडित कुटुंबाने केला आहे.

‘गावात भिल्ल नको म्हणून जबर मारहाण’

अमानुष मारहाणीनंतर पीडित आदिवासी भिल्ल कुटुंब दहशतीत आहे. मीराबाई बरडे यांचं कुटुंब गेवराईतील वंजारवाडी गावात वास्तव्यास आहे. गावात भिल्ल समाजाचे एकच घर आहे. गावात भिल्ल नको म्हणून गावातील सरपंच रवी चोरमले यांच्यासह अन्य 4 जणांनी भिल्ल कुटुंबाला गाव सोडण्याची ताकीद दिली. मात्र, गाव सोडून जायचं कुठं हा प्रश्न आ वासून उभा राहिल्याने बरडे कुटुंबांनी गाव न सोडण्याचा निर्णय घेतला. याचा आरोपी सरपंच चोरमलेच्या जिव्हारी लागले. यानंतर चोरमले आणि त्याच्या साथीदारांनी बरडे कुटुंबाला बेदम मारहाण केली.

पीडित कुटुंबाला सुरक्षा देण्याची मागणी

मारहाणीनंतर भिल्ल कुटुंबाने गेवराई पोलीस ठाणे गाठून सविस्तर तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक होती. परंतु गुन्हा का दाखल केला म्हणून आरोपी चोरमले यांचे गावातील सहकारी राहुल ढगे आणि उद्धव ढगे यांनी मिळून बरडे कुटुंबातील वडील, आई आणि मुलीला अमानुष मारहाण केली. पीडित कुटुंबाने संबंधित लोकांपासून संरक्षण देण्याची मागणी केली आहे.

‘असा काहीही प्रकार घडला नसल्याचा पोलिसांचा दावा’

दुसरीकडे गेवराई पोलिसांनी असा काहीही प्रकार घडला नसल्याचा दावा करत पीडित कुटुंबाला पोलीस ठाण्यातूनच हाकलून दिल्याचा संतापजनक प्रकारही समोर आला. त्यामुळे या कुटुंबाला पोलीस संरक्षण देवून गावातील आरोपींविरुद्ध कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक सामाजिक कार्यकर्ते अॅड. अभय मगरे यांनी केली. तसेच कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचाही इशारा यावेळी देण्यात आला. या प्रकरणावर कॅमेरासमोर बोलण्यास पोलिसांनी नकार दिला आहे.