विधीमंडळासमोर वॉटरप्रूफ एसी मंडप, पावसाळी अधिवेशन सभागृहाबाहेर घेण्याच्या हालचाली

प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दाखवला, तर विधानभवनाबाहेर भरलेलं हे इतिहासातील पहिलेच अधिवेशन ठरेल.

विधीमंडळासमोर वॉटरप्रूफ एसी मंडप, पावसाळी अधिवेशन सभागृहाबाहेर घेण्याच्या हालचाली
| Updated on: Jul 31, 2020 | 10:24 AM

मुंबई : विधीमंडळाचे सात सप्टेंबरपासून सुरु होणारे पावसाळी अधिवेशन विधानभवनाबाहेर होण्याची शक्यता आहे. विधीमंडळाच्या समोर असलेल्या मोकळ्या जागेत मंडप उभारुन अधिवेशन घेतले जाण्याची चिन्हं आहेत. (Vidhansabha Rainy Session likely to conduct outside the hall)

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी बुधवारी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सभागृहाबाहेर अधिवेशनाच्या तयारीचा आढावा घेतला. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे त्याबाबतचा प्रस्ताव काल पाठवला आहे.

काय आहे प्रस्ताव?

विधान परिषदेचे कामकाज विधानभवनात शारीरिक अंतर राखून करता येऊ शकेल. तर विधानसभेचे कामकाज मात्र सभागृहाच्या बाहेर वॉटरप्रूफ वातानुकूलित मंडप उभारुन त्या ठिकाणी घ्यावे, असा प्रस्ताव आहे.

प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दाखवला, तर विधानभवनाबाहेर भरलेलं हे इतिहासातील पहिलेच अधिवेशन ठरेल.

दरम्यान, विधीमंडळाच्या पार्किंगच्या जागेचाही अधिवेशन स्थळासाठी विचार होत आहे. त्यामुळे वाहन पार्किंगचा प्रश्न उद्भवणार आहे. त्यासाठी आजूबाजूच्या काही खासगी व शासकीय इमारतींमधील पार्किंगची जागा तात्पुरत्या स्वरुपात घेण्याचा विचार केला जाऊ शकतो.

खाजगी कार्यालयामध्ये सध्या 10 टक्केच कर्मचारी उपस्थिती असल्याने जवळच्या बहुमजली इमारतींमध्ये वाहन पार्किंगसाठी मोठी जागा उपलब्ध होऊ शकते.

विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक 7 ऑगस्टला होणार आहे. त्यात अधिवेशनाच्या आयोजनाची रुपरेषा निश्चित केली जाणार आहे. त्यात मोकळ्या जागेत अधिवेशन आयोजित करण्याच्या प्रस्तावावर अंतिम निर्णय होईल.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

राज्यासमोरील महत्वाचे प्रश्न, पुरवणी मागण्या आणि विधेयकांना मंजुरी हे पावसाळी अधिवेशनातील मुख्य कामकाज असते. दोन अधिवेशनामध्ये सहा महिन्यापेक्षा अधिक अंतर असू नये, हा नियम आजवर अत्यंत अपवादात्मक परिस्थिती वगळता पाळला गेला आहे. त्या दृष्टीने 14 सप्टेंबरपूर्वी अधिवेशन होणे आवश्यक आहे.

याआधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवरच मार्च महिन्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन एक आठवडा आधीच गुंडाळण्यात आलं होतं. त्यानतंर आता पावसाळी अधिवेशनावरही कोरोनाचे सावट कायम असल्याचे चित्र आहे. राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मुंबईतलं हे दुसरे अधिवेशन आहे.