‘दसऱ्यापर्यंत मंदिरं खुली करा, अन्यथा..’, विश्व हिंदू परिषदेचा इशारा

| Updated on: Oct 24, 2020 | 8:43 PM

मंदिर खुली करा, या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांनी शनिवारी (24 ऑक्टोबर) मुंबई, नागपूर, पुणे आणि राज्यातील विविध भागांमध्ये आंदोलन केलं (Vishwa Hindu Parishad protest).

दसऱ्यापर्यंत मंदिरं खुली करा, अन्यथा.., विश्व हिंदू परिषदेचा इशारा
Follow us on

मुंबई : दसऱ्यापर्यंत राज्यातील सर्व मंदिरं सुरु करा, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र आणि आक्रमक करु, असा इशारा विश्व हिंदू परिषदेने राज्य सरकारला दिला आहे. मंदिर खुली करा, या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांनी शनिवारी (24 ऑक्टोबर) मुंबई, नागपूर, पुणे आणि राज्यातील विविध भागांमध्ये आंदोलन केलं. मुंबईत मुंबा देवी परिसरात आंदोलन करण्यात आलं (Vishwa Hindu Parishad protest).

पुण्यात मंडईतील शारदा गणपती मंदिरासमोर शंख, ढोल यांचा नाद करत आंदोलन करण्यात आले. येत्या दसऱ्याला सरकारने जर मंदिरे उघडली नाहीत तर भविष्यात विश्व हिंदू परिषद तीव्र आंदोलन करेल, असा इशारा यावेळी देण्यात आला (Vishwa Hindu Parishad protest).

“इतर राज्यातील मंदिरं खुली झाली. मात्र, महाराष्ट्रात अजूनही मंदिरं उघडली नाहीत. राज्यात दारुचे दुकानं सुरु झाले. पण मंदिरं उघडली नाहीत”, अशी टीका आंदोलकांकडून यावेळी करण्यात आली. आंदोलनादरम्यान आंदोलकांनी घंटा वाजवत, शंकनाद आणि घोषणाबाजी करत सरकारचा निषेध केला.

“महाराष्ट्रातील मंदिरांच्या माध्यमातून हजारो लोकांच्या वर्षभराच्या रोजीरोटीची व्यवस्था होत असते. हे सगळे सरकारच्या निष्काळजीपणाने ठप्प झाले आहे. कोणत्याही निवडणुकीत सगळे छोटे-मोठे पुढारी देवळात दर्शन घेऊनच प्रचार करतात. त्यामुळे किमान आता तरी सरकारने समाजाचा आक्रोश लक्षात घ्यावा”, असे आंदोलक म्हणाले.

“हिंदुत्वनिष्ठ असलेल्या शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील कोट्यवधी हिंदूंच्या भावनांचा विचार करावा आणि या दसऱ्याला भक्तांसाठी मंदिरं खुली करावीत”, असा टोला आंदोलकांनी लगावला.

“दसरा आणि दिवाळीचं महत्त्व हिंदू समाजासाठी मोठे आहे. दसरा-दिवाळीमध्ये देवाला साक्षी ठेवून नवीन वस्तूंची खरेदी हिंदू समाज करत असतो. अशा प्रसंगी देवालये उघडी नसतील, तर हिंदूंचे आर्थिक व्यवहारही कमी होतील. त्यामुळे भक्तांच्या दर्शनासाठी मंदिर उघडावी यासाठी आता विश्व हिंदू परिषदेने पुढाकार घेतला आहे”, अशी भूमिका आंदोलकांनी मांडली.

“गेली चार महिने टप्प्याटप्प्याने का होईना सर्व व्यवहार सुरु झाले आहेत. सर्व बाजारपेठा, भाजीबाजार, मॉल, सर्व दुकाने, बँका, सर्व खाजगी सरकारी कार्यालय, कंपन्या, कारखाने सगळेच व्यवस्थित सुरु आहेत. सर्व ठिकाणी प्रचंड गर्दीही ओसंडून वाहत आहे. दसऱ्याला तर व्यायाम शाळा सुरु होत आहेत. परीक्षादेखील घेतल्या जात आहेत. हे सगळे सुरु आहे तर मंदिरांवर सरकार रोष का?” असा सवालही आंदोलकांनी उपस्थित केला आहे.

संबंधित व्हिडीओ :

संबंधित बातमी :

विश्व हिंदू परिषदेने धार्मिक स्थळांसाठी मोर्चे काढण्यापेक्षा, प्लाझ्मा दानचं आवाहन करावं : मंत्री अस्लम शेख