ममता बॅनर्जींच्या पराभवासाठी भाजपचा खास प्लॅन; ‘हे’ पाच नेते गेमचेंजर ठरणार?

| Updated on: Nov 18, 2020 | 12:45 PM

पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या एकूण 294 जागा आहेत. याठिकाणी बहुमतासाठी 148 आमदारांच्या संख्याबळाची गरज आहे. | West Bengal Election 2021

ममता बॅनर्जींच्या पराभवासाठी भाजपचा खास प्लॅन; हे पाच नेते गेमचेंजर ठरणार?
Follow us on

कोलकाता: बिहार निवडणुकीत बाजी मारल्यानंतर आता भाजपने आपले सर्व लक्ष पश्चिम बंगालमधील निवडणुकीवर (West Bengal Election 2021 ) केंद्रित केले आहे. डाव्यांची सत्ता उलथवून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री झालेल्या ममता बॅनर्जी यांच्याविरुद्धची लढाई आपल्यासाठी सोपी नसेल, याची पुरेपूर जाणीव भाजपला आहे. त्यामुळेच गेल्या काही महिन्यांपासून भाजपचे प्रमुख नेते पश्चिम बंगालमध्ये सक्रिय झाले आहेत. मात्र, आता विधानसभा निवडणूक जवळ आल्याने भाजपने एक खास रणनीती तयार केली आहे. (BJP planning for West Bengal Election 2021)

त्यानुसार पश्चिम बंगालमध्ये भाजपने पाच झोन तयार केले असून प्रत्येक झोनची जबाबदारी एका नेत्यावर सोपविली आहे. त्रिपुरात डाव्यांची सत्ता उलथवून कमळ फुलवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सुनील देवधर यांच्याकडे हावडा, हुगळी आणि मिदानपूर या भागाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर विनोद तावडे यांच्याकडे नवद्वीप, विनोद सोनकर यांच्याकडे राड बंग तर केंद्रीय नेते हरीश द्विवेदी यांच्याकडे उत्तर बंगालची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. भाजपचे राष्ट्रीय महासचिव दुष्यंत गौतम यांना कोलकाता विभागाचे निवडणूक प्रभारी करण्यात आले आहे.

याशिवाय, ज्या विभागांमध्ये भाजपला जास्त जागा मिळण्याचा अंदाज आहे तेथील जबाबदारी वेगवेगळ्या केंद्रीय नेत्यांवर सोपवली जाईल. हे सर्व नेते स्थानिक पातळीवरील रणनीती, प्रचार आणि कोणत्या मुद्द्यांवर भर द्यायचा याचा निर्णय घेतील. 18, 19 आणि 20 नोव्हेंबरला हे सर्व नेते एकत्र चर्चा करतील यानंतर अमित शाह यांच्याकडे एक अहवाल पाठवला जाईल. त्यानंतर 30 नोव्हेंबरला अमित शाह पश्चिम बंगालमध्ये येण्याची शक्यता आहे.

पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या एकूण 294 जागा आहेत. याठिकाणी बहुमतासाठी 148 आमदारांच्या संख्याबळाची गरज आहे. गेल्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने 211 जागांवर विजय मिळवत एकहाती सत्ता स्थापन केली होती. तर काँग्रेसला 44 , डाव्या पक्षांना 26 आणि भाजपला अवघ्या तीन जागांवर विजय मिळाला होता.

पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस आणि डावे पक्ष एकत्र लढणार

पश्चिम बंगाल मध्ये काँग्रेस आणि डावे पक्ष एकत्र विधानसभा निवडणूक लढणार आहेत. या दोन्ही पक्षांमध्ये जागावाटप आणि इतर बोलणी पूर्ण झाली आहेत. आता सोनिया गांधी या निर्णयावर शिक्कामोर्तब करतील. नुकत्याच झालेल्या बिहार निवडणुकीत काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी महागठबंधनमधून एकत्र निवडणूक लढवली होती. यामध्ये काँग्रेसच्या हाताला फार काही लागले नव्हते. मात्र, डाव्या पक्षांनी 12 जागांवर विजय मिळवला होता.

संबंधित बातम्या:

ममतादीदी, ‘कोरोना एक्स्प्रेस’ तुमचा ‘एक्झिट रुट’ ठरेल, अमित शाह यांचा घणाघात

विनोद तावडेंची सेकंड इनिंग; राष्ट्रीय राजकारणात छाप पाडणार?

देवेंद्र फडणवीसांनंतर भाजपकडून महाराष्ट्रातील आणखी तीन नेत्यांना राष्ट्रीय राजकारणात मोठी जबाबदारी

(BJP planning for West Bengal Election 2021)