Galwan Valley conflict | भारत-चीनमध्ये गलवान खोऱ्यांवरुन नेमका तणाव काय?

| Updated on: Jun 16, 2020 | 4:46 PM

भारत आणि चीन या दोन्ही देशांमध्ये गेल्या काही आठवड्यांपासून तणावाची स्थिती आहे (Galwan Valley conflict).

Galwan Valley conflict | भारत-चीनमध्ये गलवान खोऱ्यांवरुन नेमका तणाव काय?
Follow us on

मुंबई : भारत आणि चीन या दोन्ही देशांमध्ये गेल्या काही आठवड्यांपासून तणावाची स्थिती आहे (Galwan Valley conflict). वास्तविक नियंत्रण रेषा (एलएसी) परिसरात दोन्ही देशांनी सैनिक तैनात केले आहेत. गलवान खोरं हे भारत-चीन सीमेवरील लडाख सीमेजवळचा भाग आहे. हे खोरे चीनच्या दक्षिण शिनजियांग ते भारताच्या लडाखपर्यंत पसरलेले आहे (Galwan Valley conflict).

गलवान खोऱ्यातील नदी किनाऱ्यावर चीनी सैन्यांचे तंबू भारतीय लष्कराला दिसले. त्यामुळे भारतीय लष्करानेदेखील या परिसरात सैन्याचा फौजफाटा वाढवला. तर चीनकडून भारताने या भागात संरक्षण संबंधित बेकायदा बांधकाम केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

गेल्या महिन्यात भारत-चीन सीमाभागात दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये संघर्ष झाला. 9 मे रोजी उत्तर सिक्कीमच्या नाकूला सेक्टर येथे दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये झडप झाली. त्याचदरम्यान लडाखच्या वास्तविक नियंत्रण रेषा परिसरात चीनी सेनेचे हेलिकॉप्टर दिसले होते. त्यानंतर भारतीय वायूसेनेने सुखोईसह इतर लढाऊ विमानांसह गस्त घालण्यास सुरुवात केली.

गलवान खोरे क्षेत्र महत्त्वपूर्ण का आहे?

“गलवान खोरे क्षेत्र भारताच्या दृष्टीने अंत्यंत महत्त्वाचे आहे. कारण हे खोरे पाकिस्तान, चीनचे शिनजियांग आणि भारताच्या लडाख सीमा रेषेभागात पसरले आहे. 1962 साली भारत-चीन युद्धात हे क्षेत्र केंद्रस्थानी होतं”, असं जवाहरलाल नेहरु विद्यापीठाचे माजी प्रोफेसर आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक एसडी मुनी यांनी ‘बीबीसी’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे.

चीनचा भारतावर आरोप

दरम्यान, भारत-चीन यांच्यात निर्माण झालेल्या तणाव परिस्थितीवर चीनने भारताला जबाबदार ठरवले आहे. चीनच्या ‘ग्लोबल टाइम्स’ वृत्तपत्राने सोमवारी (15 जून) प्रकाशित केलेल्या एका लेखात भारतावर आरोप करण्यात आले आहेत.

“भारताने गलवान खोऱ्यात संरक्षण संबंधित बेकायदा बांधकाम केलं आहे. त्यामुळे चीनला त्या भागात सैनिक वाढवावे लागले. मात्र, या भागात डोकलाम सारखी परिस्थिती निर्माण होणार नाही, याची आम्हाला शाश्वती आहे. भारत सध्या कोरोना संकंटात आर्थिक परिस्थितीशी झुंजत आहेत. अशावेळी जनतेचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी गलवान खोऱ्यात तणाव निर्माण केला गेला”, असा आरोप चीनकडून करण्यात आला आहे.

सोमवारी मध्यरात्री दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये झडप

दरम्यान, याप्रकरणी दोन्ही देशांच्या सैन्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक पार पडली होती. मात्र, सोमवारी मध्यरात्री भारत-चीन दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये झडप झाली. यामध्ये भारताचे दोन जवान शहीद झाले.

संबंधित बातम्या :

India China Face Off | आमचे 5 जवान भारताने मारले, चीनचा दावा, गलवान खोऱ्यात भारत-चीनमध्ये संघर्ष