विक्रोळीत दरड कोसळून 2 दोघांचा मृत्यू, झोपेतच काळाचा घाला !

विक्रोळीच्या पार्कसाईट परिसरातील जनकल्याण सोसायटीच्या आवारात दरड कोसळल्यामुळे या दुर्दैवी घटनेत दोघांचा मृत्यू झाला. दोघे गंभीर जखमी असून त्यांच्यावर घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

विक्रोळीत दरड कोसळून 2 दोघांचा मृत्यू, झोपेतच काळाचा घाला !
विक्रोळीत दरड कोसळून दोघांचा मृत्यू
| Updated on: Aug 16, 2025 | 8:48 AM

विक्रोळीच्या पार्कसाईट परिसरातील जनकल्याण सोसायटीच्या आवारात लँड्स स्लाईड झाली आहे. दरड कोसळल्यामुळे या दुर्दैवी घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून आणखी दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रात्रभर कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे पार्कसाईट परिसरात ही दुर्घटना घडली आहे.

आज जन्माष्टमीचा दिवस, शुभ दिवस मात्र याच सणाला आज गालबोट लागलं आहे. दरड कोसळून दोघांचा मृत्यू झाल्याने या कुटुंबावर अक्षरश: दु:खाचा डोंगर कोसळला आहे.  विक्रोळीतील पार्कसाईट या परिसरात उंचच उंच डोंगरावर छोटी-छोटी घर बांधण्यात आली असून संपूर्ण घरांची रचना ही एकमेकांना लागूनच आहे. काल रात्रीपासून सतत पाऊस सुरू असून मध्यरात्री 1 ते 1.30 च्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली.

पार्कसाईट परिसरातील घरांमध्ये राहणारे नागरिक गाढ झोपेत असतानाच अचनाक काळाने त्यांच्यावर घाला घातला. मध्यरात्रीच्या सुमारास अचानक दरड कोसळली आणि जवळचं घर अगदी दबलं गेलं, त्यामुळे झोपेत असलेल्या दोघांना मृत्यूने गाठलं. शालू मिश्रा (19 वर्षे) आणि सुरेश मिश्रा ( वय 50)  असं मृत वडील-मुलीचे नाव आहे. तर आरती मिश्रा आणि ऋतुराज मिश्रा या दोघांवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  या दुर्दैवी घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

डोंबिवलीत 45 वर्ष जुनी इमारत खचली; सुदैवाने जीवितहानी नाही

दरम्यान डोंबिवली पश्चिम येथील गुप्ते रोडवरील सीमंतिनी सोसायटी ही सुमारे 45 वर्ष जुनी इमारत काल रात्री उशिरा अचानक खचली. इमारतीला भेगा पडल्याचे लक्षात आल्यानंतर सतर्क झालेल्या रहिवाश्यांनी तातडीने इमारत खाली केली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आणि कोणतीही जीवितहानी झाली नाही.

इमारत खचल्याची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. परिसरात सुरक्षा बंदोबस्त वाढवण्यात आला असून इमारतीच्या आजूबाजूचा परिसर लोकं जमा झाले. ही इमारत जुनी व जीर्ण अवस्थेत होती. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी, स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.