आश्रमशाळेतील वरणात पाल पडल्याने 31 विद्यार्थी अत्यवस्थ, मळमळ-उलट्यांचा त्रास झाल्याने विद्यार्थी रुग्णालयात

आश्रम शाळेत दुपारी जेवण सुरु असताना वरणात पाल पडल्याचे निदर्शनास आले, त्यानंतर मुलांना मळमळ आणि उलट्यांचा त्रास सुरु झाला. शाळेच्या या निष्काळजी कारभाराविषयी आता समाज कल्याण विभाग काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आश्रमशाळेतील वरणात पाल पडल्याने 31 विद्यार्थी अत्यवस्थ, मळमळ-उलट्यांचा त्रास झाल्याने विद्यार्थी रुग्णालयात
Student admitted to hospital
| Updated on: Sep 01, 2026 | 7:56 PM

चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातल्या नगराळा गावातील श्री अंब्रू नाईक खाजगी आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या वरणाच्या भांड्यात पाल पडल्याने 31 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची माहिती पुढे आली आहे. आज सकाळच्या सुमारास विद्यार्थ्यांना जेवण दिले होते. मुलींच्या जेवणानंतर मुले जेवत होती. मात्र वरणाच्या भांड्यात पाल पडल्याचे बघितल्यानंतर एकच गोंधळ उडाला. मुलींनी जेवण करत असलेल्या मुलांना याविषयी सांगितल्यानंतर सर्वांनाच मळमळ- उलटीचा त्रास होऊ लागला. यापैकी 31 विद्यार्थ्यांना तातडीने राजुरा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्याच्या नगराळा येथील श्री अंब्रू नाईक माध्यमिक या खाजगी आश्रमशाळेत ही घटना घडली आहे. या शाळेत दुपारचे जेवण सुरु होते. आधी मुलींना जेवण देण्यात आले. त्यानंतर मुलांचे जेवण सुरु असताना एका मुलीला वरणात पाल सापडली. तिने ही घटना मुलांना सांगितली. त्यानंतर मुलांना मळमळ आणि उलट्यांचा त्रास होऊ लागला. या मुलांना राजुरा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुलांची प्रकृती आता स्थिर आहे. या शाळा प्रशासनाच्या निष्काळजीने मुलांच्या आरोग्याला धोका निर्माण झाल्याने पालकांनी या प्रकरणात कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

चंद्रपुरातील या घटनेनंतर पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या अन्नपदार्थांच्या स्वच्छता आणि दर्जाची तपासणी करण्याची जबाबदारी नेमकी कोणाची आहे असा सवाल केला जात आहे. अन्नपदार्थांची नियमित तपासणी केली जाते का ? स्वयंपाक घरात अन्न स्वच्छतेचे नियम पाळले जातात का ? जेवण तयार करताना संबंधित कर्मचारी लक्ष देतात का ? असे अनेक सवाल पालकांनी केले आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us