अब्दुल सत्तार अयोध्येला का गेले नाहीत? नाराज की आणखी काही कारण? सत्तारांनी स्पष्टच सांगितलं…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यावरून अनेक चर्चांना उधाण आलंय. या दौऱ्यात गैरहजर राहिलेले आमदार, खासदार नाराज असल्याच्या चर्चा आहेत. संजय राऊत यांनीही यासंदर्भात दावा केलाय.

अब्दुल सत्तार अयोध्येला का गेले नाहीत? नाराज की आणखी काही कारण? सत्तारांनी स्पष्टच सांगितलं...
Image Credit source: tv9 marathi
मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Apr 10, 2023 | 2:31 PM

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अयोध्या (Ayodhya) दौऱ्यातील ताफ्यात काही आमदार आणि खासदार गैरहजर असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे 3 आमदार आणि एका खासदाराच्या नाराजीवरून नवे आडाखे बांधले जात आहेत. कृषीमंत्री अब्दुल सत्तार, आमदार शहाजी बापू पाटील, अपक्ष आमदार बच्चू कडू आणि खासदार भावना गवळी यांच्या अयोध्येतील गैरहजेरीवरून प्रश्नचिन्ह उभं करण्यात आलंय. यावरून अब्दुल सत्तार यांनी स्पष्टत उत्तर दिलंय. मी नाराज नाही. इथे अवकाळी पाऊस सुरु असल्याने शेतीच्या नुकसानीची पाहणी करतोय. शेतकऱ्यांचे अश्रू पुसणं हेही रामाचंच काम आहे, असं वक्तव्य कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी केलंय.

काय म्हणाले सत्तार?

कृषीमंत्री अब्दुल सत्तार सध्या अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या भागांचा दौरा करतायत. या दौऱ्यादरम्यान, त्यांनी नाराजीच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ‘ रामाबद्दल माझ्या मनामध्ये एक असं तीळ मात्र शंका नाही. मी एक राम भक्तच आहे. काही ठिकाणी हे जे शेतकरी बांधवांवर संकट आलंय. पाहणीसाठी मी दौरा काढला आणि सातत्याने जालना झाला संभाजीनगर झाला त्यानंतर बीड झाला परभणीचा काही भाग मी पाहिला. आज मी दोन जिल्हे तीन जिल्हे पाहणार आहे. अकोला, बुलढाणा आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी रात्री आमच्याकडेही संभाजीनगरमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांचे अश्रू पुसणं हेही रामाचंच काम आहे. त्यासाठी मी अयोध्येला गेलो नाही, अशी प्रतिक्रिया सत्तार यांनी दिली.

संजय राऊत सगळ्यात मोठा गुंड- शहाजी पाटील

तर आमदार शहाजीबापू पाटील यांनीदेखील अस्वस्थतेच्या चर्चांवर प्रत्युत्तर दिलंय. ते म्हणाले, ‘
सांगोल्यात ग्रामीण साहित्य संमेलन आयोजित आहे. संमेलनाचा मी स्वागताध्यक्ष आहे. सुमारे ७०० साहित्यिक येणार होते. अशावेळी मी आयोध्येला जाणे योग्य वाटले नाही. परंतु आपण cm कडे परवानगी मागितली होती. त्यांच्या परवानगीने मी आयोध्येला गेलो नाही. आम्ही अस्वस्थ नाहीत. आम्ही अस्वस्थ कधी होतोय यांची ते वाट बघत आहेत.

अडीच वर्षे संजय राउत यांनी आमदारांना अस्वस्थ केले होते. आता आमदार स्वस्थ आहेत. मतदार संघात काम करत आहेत . राज्यातील मोठा गुंड संजय राऊत आहेत. अडीच वर्षांपूर्वी सगळ्यात जास्त 55 आमदार पवार साहेबांच्या झोळीत टाकले.. हा सगळ्यात मोठा गुंड आहे असा आरोप शहाजीबापू पाटील यांनी केलाय.

भावना गवळी काय म्हणाल्या?

खासदार भावना गवळी यांनीदेखील अयोध्येला न जाण्याच्या चर्चांना उत्तर दिलं. त्या म्हणाल्या, मी शिंदे यांच्या ताफ्यासोबत कामाख्या देवीच्या दर्शनाला गेले होते. मात्र अयोध्या दौऱ्याच्या वेळी मी वैयक्तिक कामात अडकले होते. त्यामुळे मला जाता आलं नाही. यात काहीही अस्वस्थता, गडबड नाही. उलट ठाकरे गटातील काही लोकच येत्या काही काळात शिंदेंच्या शिवसेनेत येणार आहेत, असा दावा खा. गवळी यांनी केलाय.

संजय राऊत यांचा दावा काय?

अयोध्येला एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यात काही जण नव्हते. शिंदेंच्या आमदारांचा एक मोठा गट अस्वस्थ आहे, काहीतरी गडबड आहे, असं माझ्या कानावर आलंय, असा दावा राऊत यांनी केला. तर सामनाच्या अग्रलेखातून त्यांनी स्पष्टच सूतोवाच केलंय. काहीजण अयोध्येत न जाणं ही शिंदे गटातील बेदिलीची ठिणगी आहे. आगामी काळात चित्र स्पष्ट होईल, असा दावा शिवसेनेने केलाय.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us