मोठी बातमी! माजी आमदाराच्या गाडीचा भीषण अपघात, चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले अन्…
Shrikant Deshpande : अमरावती शिक्षक मतदारसंघाचे माजी आमदार श्रीकांत देशपांडे यांच्या गाडीला अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

गणेश सोलंकी, बुलढाणा : अमरावती शिक्षक मतदारसंघाचे माजी आमदार श्रीकांत देशपांडे यांच्या गाडीला अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. जलंबहून शेगावकडे जात असताना खेर्डा गावाजवळ हा अपघात झाला. अचानक रोही (नीलगाय) आडवी आल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी थेट रस्त्याच्या खाली उतरली. गाडी रस्त्यापासून सुमारे 20 फूट खाली गेल्यानंतर पलटी झाली. या अपघातात गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, गाडीमध्ये असलेले माजी आमदार श्रीकांत देशपांडे यांच्यासह सर्वजण सुदैवाने थोडक्यात बचावले. अपघातानंतर रस्त्याने जाणाऱ्या दोन व्यक्तींनी देशपांडे यांना मदत केली.
माजी आमदार श्रीकांत देशपांडे यांच्या वाहनाचा अपघात
समोर आलेल्या माहितीनुसार, अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रीकांत देशपांडे जिल्हा दौऱ्यावर होते. त्याचदरम्यान खेर्डा गावाजवळ त्यांच्या वाहनाला हा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. या अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेमुळे काही काळ परिसरात खळबळ उडाली होती.
जळगावमध्ये चारचाकी-कंटेनरचा भीषण अपघात
जळगाव जिल्ह्यातील पाळधी-तरसोद बायपासवर चारचाकी आणि कंटेनरची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. तरसोदजवळ झालेल्या या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, दोन्ही वाहनांचे चालक गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच नशिराबाद पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिस आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचावकार्य सुरू करण्यात आले. जखमी चालकांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी हलवण्यात आले आहे.
या भीषण अपघातामुळे बायपासवरील वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला होता. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, याबाबत नशिराबाद पोलिसांकडून पुढील तपास केला जात आहे. दरम्यान, पाळधी-तरसोद बायपासवर वारंवार अपघाताच्या घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. या मार्गावर कायमस्वरूपी पोलिस बंदोबस्त ठेवावा, तसेच तरसोद आणि पाळधी येथील प्रवेशद्वारांवर नियमित पोलिस पेट्रोलिंग सुरू करावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
