Parth Pawar Wedding : पार्थ पवारांच्या लग्नाची तारीख आली समोर, शंकराचार्यांशीही चर्चा; राष्ट्रवादीच्या नेत्याने दिली माहिती

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पार्थ पवार आणि कायनात दारा यांचा विवाह निश्चित झाला आहे. २९ जुलै रोजी साखरपुडा, तर २७ फेब्रुवारी २०२७ रोजी बारामती येथे लग्न होणार आहे. उमेश पाटील यांनी ही माहिती दिली. पार्थ यांच्या लग्नाबाबतच्या धार्मिक शंकांचे शंकराचार्यांनी निरसन केल्याचं त्यांनी सांगितलं.

Parth Pawar Wedding : पार्थ पवारांच्या लग्नाची तारीख आली समोर, शंकराचार्यांशीही चर्चा; राष्ट्रवादीच्या नेत्याने दिली माहिती
पार्थ पवार- कायनात दारा यांच्या लग्नाची तारीख आली समोर
| Updated on: Jul 24, 2026 | 1:59 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, राज्यसभेचे खासदार पार्थ अजित पवार यांच्या लग्नाची तारीख आता समोर आली आहे. कायनात दारा यांच्यासोबत पार्थ पवार यांचा विवाह ठरला असून येत्या 29 जुलै रोजी त्या दोघांचा साखरपुडा होणार आहे. तसेच त्यांच्या लग्नाची तारीखही आता समोर आल असून पुढील वर्षी म्हणजे 27 फेब्रुवारी 2027 रोजी ते दोघे विवाहबद्ध होणार आहेत. – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उमेश पाटील यांनी हा माहिती दिली असून लवकरच पवार कुटुंबात पुन्हा सनई-चौघड्यांचे सुरू घुमणार आहेत. पार्थ पवार -कायनात याच्या लग्नाबद्दल अनेकांना उत्सुकता होती, आता त्यांच्या विवाहाची तारीख समोर आल्यानंतर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

29 जुलैला साखरपुडा, लग्नाची तारीख समोर

या विवाहासंदर्भात काही धार्मिक शंकांचे निरसन करण्यासाठी आणि विधींबाबत माहिती जाणून घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उमेश पाटील यांनी करवीर पीठाचे शंकराचार्य यांची भेट घेऊन मार्गदर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी पार्थ पवार व कायनात यांच्या विवाहाची तारीख व स्थळ याबाबतची अधिकृत माहितीही जाहीर केली. येत्या 29 जुलै रोजी, अत्यंत साध्या आणि कौटुंबिक वातावरणात, मोजक्या नातेवाईकांच्या व फक्त निमंत्रित यांच्या उपस्थितीत पार्थ व कायनता यांचा साखरपुडा समारंभ पार पडणार आहे. तर पुढल्या वर्षी, 27 फेब्रुवारीला बारामती येथे दोघांचा विवाह होईल, असं पाटील यांनी सांगितलं.

कुठल्या आहेत कायनात दारा ?

कायनात दारा या मूळच्या चंदीगड येथील आहेत. सध्या त्या दिल्ली येथे वास्तव्यास आहेत. गेल्या काही दिवसांपासून काही माध्यमांमध्ये त्यांच्या जन्मस्थळाबाबत तसेच नावासंदर्भात चुकीची, अपूर्ण आणि दिशाभूल करणारी माहिती प्रसारित होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर वस्तुस्थिती स्पष्ट व्हावी आणि कोणताही गैरसमज राहू नये, या उद्देशाने पवार कुटुंबियांकडून कायनात यांच्याबद्दल माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान पार्थ पवार यांच्या विवाहाबद्दल काही प्रश्न उपस्थित केले जात होते. काही धार्मिक शंकाचे निरसन करण्यासाठी उमेश पाटील यांनी शंकराचार्यांची भेट घेतली. त्यांचे मार्गदर्शन घेतलं. कुटुंबातील आई किंवा वडिलांचे निधन झाल्यानंतर एका वर्षाच्या आत विवाह करणे आवश्यक असते, अन्यथा पुढील तीन वर्षे घरात विवाहासारखे शुभकार्य करता येत नाही, अशी समजूत समाजात प्रचलित आहे. या पार्श्वभूमीवर या प्रथेबाबत धर्मशास्त्रातील वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी करवीर पीठाचे शंकराचार्य यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली. करवीर शंकराचार्य पीठाचे छत्रपती शाहू महाराजांशी ऐतिहासिक संबंध असल्याने, विवाहासंदर्भातील रूढी, परंपरा आणि प्रचलित समजुती याविषयी मार्गदर्शन घेण्यात आले.

याबाबत शंकराचार्यांनी स्पष्ट केलं की, कुटुंबातील वडिलांचे निधन झाले असले तरी धर्मशास्त्रानुसार आवश्यक विधी आणि संस्कार योग्य पद्धतीने पार पाडणे महत्त्वाचे आहे, अशी माहिती उमेश पाटील यांनी दिली. मात्र, एका वर्षाच्या आत विवाह करणे धर्मशास्त्रानुसार बंधनकारक नाही. त्यामुळे यासंदर्भात कोणताही गैरसमज बाळगण्याचे कारण नसल्याचे त्यांनी स्पष्ट केलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us