चिमुरड्यांना दाताने पकडलं, हवेत फिरवलं अन् मग खिळ्यांवर… अकोल्यातील भोंदू बाबाचे अंगावर शहारे आणणारे कृत्य

अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील निंबा गावात चिमुरड्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या भोंदू चेतन महाराज मुळे याच्यावर अखेर गुन्हा दाखल झाला असून, या धक्कादायक प्रकरणाचा सविस्तर आढावा.

चिमुरड्यांना दाताने पकडलं, हवेत फिरवलं अन् मग खिळ्यांवर... अकोल्यातील भोंदू बाबाचे अंगावर शहारे आणणारे कृत्य
akola
| Updated on: Apr 23, 2026 | 11:59 AM

महाराष्ट्र राज्याला पुरोगामी विचारांचा वारसा लाभला आहे. असे असताना आजही काही भागात अंधश्रद्धेचे अघोरी प्रकार सुरूच असल्याचे धक्कादायक वास्तव समोर येताना दिसत आहे. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील निंबा गावात एका भोंदू बाबाने उपचाराच्या नावाखाली चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ मांडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सर्वत्र संताप व्यक्त होत होता. आता अखेर भोंदू चेतन महाराज मुळे याच्यावर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे लवकरच त्यांना अटक होण्याची शक्यता आहे..

नेमकं प्रकरण काय?

निंबा गावातील चेतन सुनील मुळे हा स्वतःला गुलाल शेष बाबा म्हणवून दरबार भरवत असे. या दरबारात व्याधी आणि कौटुंबिक समस्या दूर करण्याचा दावा केला जायचा. मात्र, नुकताच या बाबाचा अंगावर शहारे आणणारा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये हा भोंदू बाबा उपचाराच्या नावाखाली लहान मुलांना चक्क दाताने उचलून हवेत गरागरा फिरवताना दिसत आहे. इतकेच नाही तर मुलांना खिळ्यांच्या आसनावर बसवणे यांसारख्या इतर अघोरी प्रथांचा अवलंब करत तो त्यांच्या आरोग्याशी खेळत होता.

या प्रकरणाची दखल घेत महिला व बालकल्याण समितीच्या सदस्य प्रांजली जैस्वाल यांनी मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीनंतर पोलिसांनी चेतन मुळे याच्यावर भारतीय न्यायसंहीता कलम १२५, बालन्याय अधिनियम २०१५ चे कलम ७५ आणि महाराष्ट्र जादूटोणाविरोधी कायदा २०१३ च्या कलम ३ नुसार गुन्हे दाखल केले आहेत.

राज्यातील भोंदूगिरीचे सत्र थांबेना

अकोल्यातील ही घटना ताजी असतानाच, राज्याच्या इतर भागातही अशीच प्रकरणे समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी अशोक खरात नावाच्या भोंदू बाबानेही अशाच प्रकारे अघोरी कृत्ये करून लोकांच्या फसवणुकीचा प्रयत्न केल्याचे उघड झाले होते. राज्यात जादूटोणाविरोधी कायदा अस्तित्वात असतानाही, १० वी नापास असलेले हे भोंदू महाराज गेल्या १० वर्षांपासून आपला व्यवसाय बिनदिक्कतपणे चालवत आहेत, ही चिंतेची बाब ठरत आहे.

कोण आहे चेतन महाराज मुळे?

चेतन महाराज मुळे हा अकोल्यातील निंबा गावात सक्रीय होता. तो दहावी नापास आहे. दरबारात लिंबू फेकणे, कोडं सोडवणे आणि अमानुष कृत्य करणे, असे अनेक कांड तो दरबारात करायचा. धक्कादायक म्हणजे एकट्या निंबा गावात असे चार वेगवेगळे दरबार भरत असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा ग्रामीण भागात जनजागृतीची आणि अशा भोंदू बाबांवर कडक कारवाईची गरज अधोरेखित झाली आहे.

Follow Us