Ashish Shelar: राम मंदिर आंदोलनावेळी उद्धव ठाकरे, मनोहर जोशी, डाके, राऊत कुठे होते?; आशिष शेलार यांचा सवाल

| Updated on: May 03, 2022 | 4:27 PM

Ashish Shelar: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात राज ठाकरे सुपारी घेऊन बोलत होते हे अजित दादांनी मान्य केले आहे.

Ashish Shelar: राम मंदिर आंदोलनावेळी उद्धव ठाकरे, मनोहर जोशी, डाके, राऊत कुठे होते?; आशिष शेलार यांचा सवाल
राम मंदिर आंदोलनावेळी उद्धव ठाकरे, मनोहर जोशी, डाके, राऊत कुठे होते?; आशिष शेलार यांचा सवाल
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: राम मंदिर (ram mandir) आणि बाबरी प्रकरणी कोण कुठे होता या शर्यतीत उतरायचे असेल तर त्यावेळी तुमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) कुठे होते? हे संजय राऊतांनी सांगावे. शिवसेना (shivsena) नेते मनोहर जोशी, लिलाधर डाके कुठे होते? ते ढाचा तुटला तेव्हा कुठे होते? ढाचा तुटल्यावर ते कसे पोहचले? त्यांचे विमान कुठे भरकटले होते? ज्यावेळी विटांचे पूजन केले तेव्हा स्वतः राऊत तुम्ही कुठे होतात?, असा सवाल भाजपचे नेते आशिष शेलार यांनी केला. शिवसेना राममंदिर या विषयात अदखलपत्र आहे, अशी टीकाही त्यांनी केली. आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन राम मंदिराच्या विषयावरून शिवसेनेवर घणाघाती हल्ला केला. तसेच शिवसेनेवर प्रश्नांची सरबत्तीही केली. शिवसेना नेते संजय राऊत यांनी काल ट्विट केलं होतं. त्यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या मुलाखतीचा एक व्हिडीओ शेअर केला होता. तसेच त्यावेळचे सामनाचे अंक ट्विट करून भाजपवर निशाणा साधला होता. या पार्श्वभूमीवर आशिष शेलार यांनी ही टीका केली आहे.

कल्याण सिंह यांच्याकडे कुटुंबीयांकडून ट्युशन लावा. त्यांनी धर्मासाठी सत्ता सोडली. तुम्ही धर्म सोडून सत्तेला चिटकून बसला आहात. ही बेडूक उड्या मारणारी शिवसेना आहे. शिवसेनेचा आजचा कार्यक्रम आयत्या बिळावर नागोबा असा आहे. हिंदुत्वावरून तुम्ही फाटके आहात का? इतरांचे फाटके दाखवताय मग शिवसेना हे फाटकं बनियान आहे असे तुम्हाला आम्ही म्हणायचे का?, असा सवाल आशिष शेलार यांनी केला. मुख्यमंत्री यांच्यासोबत राज्यातील मंत्र्यांनी योगी ट्युशन क्लासेस लावावा. शिवाजी पार्कवर ईद नमाज पडू द्या असे म्हणणाऱ्यावर कारवाई का नाही? राऊत झेंड्याचा कलर बदलायला निघाले का?, असा सवालही त्यांनी केला.

कायद्याचे राज्य आहे का?

मनसेला आलेल्या नोटिशींवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. राज्य सरकारला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करायचा असं मला वाटतं. आमच्या दोन पदाधिकाऱ्यांना का नोटीस दिली. कायद्याचे राज्य आहे का? तुमच्या घरात बसून कायदे होत नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

अजितदादांनी सुपारीची किंमत सांगावी

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात राज ठाकरे सुपारी घेऊन बोलत होते हे अजित दादांनी मान्य केले आहे. मग त्यांनी आता सुपारीची किंमत सांगावी, असं आव्हान देतानाच राज्य सरकार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या इशारावर चालते. या सरकारचे रिमोट कंट्रोल शरद पवार यांच्या हाती आहे, असा चिमटाही त्यांनी काढला.

अघोषित आणीबाणी सुरू आहे

खासदार नवनीत राणा यांना मुंबई महापालिकेने नोटिस बजावली आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. राज्य सरकारच्या विरोधात कुणी बोलला की त्यांना नोटिसा पाठवतात. तानाशाही, दमनशाही आणि अघोषित आणीबाणी सुरू आहे. वैचारिक स्वातंत्र्य संपले आहे. आताच नोटीस का येते? ती बिल्डींग आता बांधलीय का? मग एवढीवर्षे का नोटीस पाठवली नाही? सरकार विरोधात कार्टून टाकले म्हणून कुणाचा डोळा फोडला जातो, कुणाचे मुंडन केले जाते. संपादक, पत्रकार यांना घरात घुसून अटक केली जाते असे दुर्दैवी चित्र आहे, असा संतापही त्यांनी व्यक्त केला.