MIM On Raj Thackeray : मु्स्लिम समाजाला मी विनंती करतो की… राज ठाकरेंच्या औरंगाबादच्या ‘चिथावणीखोर’ भाषणावर पहिली प्रतिक्रिया

राज ठाकरे यांच्या आवाहानाला तरुणांनी प्रतिसाद द्यावा की नाही हे त्यांनी ठरवावं असं सांगताना खासदार इम्तियाज जलील म्हणाले, ' युवापिढी जी नोकऱ्यांसाठी भटकत आहे. त्रस्त आहे, त्यांना चांगलं मार्गदर्शन करण्याऐवजी आपण त्यांना मिसलीड करण्याचं, समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न आहे.

MIM On Raj Thackeray : मु्स्लिम समाजाला मी विनंती करतो की... राज ठाकरेंच्या औरंगाबादच्या चिथावणीखोर भाषणावर पहिली प्रतिक्रिया
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: May 01, 2022 | 9:44 PM

औरंगाबादः राज ठाकरे यांच्या भाषणावर मुस्लिम समाजाची काय प्रतिक्रिया उमटते यावर सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र औरंगाबादच्या राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या सभेनंतर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी अत्यंत संयमाने प्रतिक्रिया दिली. महाराष्ट्र सरकार, पोलीस प्रशासन राज ठाकरे यांच्या अल्टिमेटमबाबत निर्णय घेईल. राज ठाकरे यांनी मुस्लिमांना अल्टिमेटम दिलं नसून महाराष्ट्र सरकारला दिला आहे. मात्र मुस्लिम समाजाने (Muslim Community) यावर प्रतिक्रिया देण्याची काहीही गरज नाही. विरोध करण्याचीही गरज नाही, अशी अत्यंत संयमित प्रतिक्रिया एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी दिली आहे. तसेच राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना भोंग्यांवर हनुमान चालिसा लावण्याचे आदेश दिलेत, पण हे समाजाची दिशाभूल करण्याचे प्रयत्न असल्याची टीका खासदार जलील यांनी केली.

तरुणांनी ठरवावं यावर काय प्रतिसाद द्यावा…

राज ठाकरे यांच्या आवाहानाला तरुणांनी प्रतिसाद द्यावा की नाही हे त्यांनी ठरवावं असं सांगताना खासदार इम्तियाज जलील म्हणाले, ‘ युवापिढी जी नोकऱ्यांसाठी भटकत आहे. त्रस्त आहे, त्यांना चांगलं मार्गदर्शन करण्याऐवजी आपण त्यांना मिसलीड करण्याचं, समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आहे तर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी कुणाची होती? भाजप जे काही करत आहे. 2014 ते 2019 पर्यंत त्यांचं सरकार होतं. तेव्हा भाजपने याबाबतीत काही केलं नाही… मग आताच का हे सगळं आठवतंय, असा सवाल खासदार जलील यांनी केला.

‘जे चुकीचं झालं ते मान्य आहे’

महाराष्ट्राच्या इतिहासात काय घडलं यावर राज ठाकरे यांनी केलेल्या भाष्यावरही खासदार जलील यांनी प्रतिक्रिया दिली. खिल्जीने जे काय केलं ते चुकीचंच होतं, पण आता हा सर्व इतिहास उगाळून काय उपयोग? आता जे काम सुरु आहे, त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे, असं खासदार जलील म्हणाले.

माझी विनंती आहे की…

मुस्लीम समाजाला विनंती करताना खासदार इम्तियाज जलील म्हणाले,’आपल्याला काही प्रतिक्रिया देण्याची आवश्यकता नाही. विरोध करण्याचं कारण नाही. आपण या देशात राहतो. सुप्रीम कोर्टानं दिलेल्या आदेशाची अंमलबजाणी करावी. तुम्ही सुप्रीम कोर्टाच्या रिव्ह्यूमध्ये जाऊ शकता. पण एकदा सुप्रीम कोर्टानं जो काय निर्णय दिलाय, त्याचा परिणाम रस्त्यावर होऊ शकत नाही. आज युवकांना जे आदेश दिले जात आहेत. तुम्ही समाजात तेढ निर्माण करणार आहात. जे पोरं तिथे लाऊड स्पीकर लावणार आहेत. त्यांच्यावर केसेस आणि आपण एसी केबिनमध्ये बसणार. आम्ही अयोध्येला जाणार.. हे चुकीचं आहे.. असा इशारा खासदार जलील यांनी दिला.