‘त्या शब्दांबद्दल दिलगिरी व्यक्त केलीय, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री रक्षण करतील’, अब्दुल सत्तार यांची भूमिका

अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्याबाबत केलेल्या विधानावर वाद उफाळल्यानंतर सिल्लोड येथील सभेत त्यांनी भूमिका मांडली.

त्या शब्दांबद्दल दिलगिरी व्यक्त केलीय, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री रक्षण करतील, अब्दुल सत्तार यांची भूमिका
अब्दुल सत्तार
Chetan Patil | Updated on: Nov 07, 2022 | 7:57 PM

औरंगाबाद : कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी माफी मागावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून केली जातेय. त्यांच्या आक्षेपार्ह विधानाची दखल राज्य महिला आयोगाने देखील घेतलीय. त्यांनी सुप्रिया सुळे यांच्याबाबत केलेल्या विधानावर वाद उफाळल्यानंतर आज सिल्लोड येथील सभेत भूमिका मांडली. पण यावेळी त्यांनी सुप्रिया सुळे यांच्या नावाचा उल्लेख केला नाही. तसेच आपण टीका करताना वापरलेल्या शब्दांबद्दल आधीच दिलगिरी व्यक्त केल्याचं ते म्हणाले.

“मी आज जे वक्तव्य केलं की, मी बोललो की कोणत्याही महिला बघिनीच्या किंवा पक्षाच्या भावना दुखवायचा आमचा हेतू नव्हता. आमच्या लोकांना जे बदनाम करतात, त्यांच्याबद्दल मी जे शब्द बोललो त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त केलीय”, अशी भूमिका अब्दुल सत्तार यांनी मांडली.

“आमच्या बहिणी इथे हजारोंच्या संख्येने बसल्या आहेत. त्या आमच्या सन्मान आहेत. त्यांचा सन्मान करण्यासाठी कधीही कुणीही दुसऱ्या भाषेबद्दल जोडण्याचा प्रयत्न केला असेल तर त्याबद्दल मी जाहीर बोललो”, असं सत्तारांनी स्पष्ट केलं.

“मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे सर्वांचे रक्षक आहेत. सर्वांना न्याय देणारे आहेत. अन्याय करणारे नेते आमच्याकडे नाहीत. पण वेगळा अर्थ करुन लोकं त्याचीही चर्चा करतात”, असं सत्तार म्हणाले.

“काही लोकांच्या पोटामध्ये पोटशूळ उठतंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल कुणीही अपशब्दात बोलण्याचा प्रयत्न केला तर त्याला आम्ही कधीही माफ करणार नाहीत. यासाठी तुम्हालाही सर्वांना मैदानात उतरावं लागेल. ते यासाठी उतरावं लागेल की, आपण सर्वांचा सन्मान करतो”, असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं.

“या इतक्या बहिणी या ठिकाणी बसलेल्या आहेत, हजारोंच्या संख्येने उपस्थित आहेत, मी आज एक वक्तव्य केलं. आमच्याबद्दल खोके-खोके असे आरोप केले जात आहेत. कोणी मायचा लाल असा नाही की आमच्या आमदाराला खरेदी करु शकतो. त्यांना कुणीही खरेदी करु शकत नाही”, असं सत्तार आपल्या आमदारांना उद्देशून म्हणाले.

“मी जे बोलू लागलो ते सत्य बोलू लागलो. पण काही लोकं पोपटसारखे तेच बोलू लागले. तशाच भाषेत बोलू लागले. प्रत्येक वेळेस आमच्या आमदारांना बदनाम करण्याचं काम करु लागले”, असं सत्तार म्हणाले.

“सर्वांनी एकनाथ शिंदे यांच्या विश्वासावर उठाव केला ते कुणाच्या भीतीमुळे केला नाही. शिवसेना जीवंत राहावी यासाठी उठाव केला. पण त्यांनाही बदनाम करण्याचं काम काही लोकं करु लागले आहेत”, असंदेखील ते म्हणाले.

 संबंधित बातमीचा व्हिडीओ :

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us