…त्यांचा पायच शिल्लक ठेवणार नाही, भाजपने अडवण्याची भाषा करू नये, अंबादास दानवे यांचा इशारा

| Updated on: Apr 15, 2023 | 1:09 PM

राहुल गांधी उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर येणार असल्याची चर्चा आहे. यावरून भाजप आक्रमक झाली आहे. या मुद्द्यावर अंबादास दानवे यांनी मोठं वक्तव्य केलंय.

...त्यांचा पायच शिल्लक ठेवणार नाही, भाजपने अडवण्याची भाषा करू नये, अंबादास दानवे यांचा इशारा
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

छत्रपती संभाजीनगर : भाजपने लक्षात घ्यावं ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी अन् ज्या गावच्या बाभळी त्याच गावच्या बोरी असतात, असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी दिलाय. महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेत अडथळा आणणाऱ्या भाजपसाठी हा मोठा इशारा असल्याचं दानवेंनी म्हटलंय. नागपूरमध्ये उद्या महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा आयोजित करण्यात आली आहे. त्यातच राहुल गांधी यांच्या महाराष्ट्र दौऱ्याच्या चर्चा सुरु आहेत. राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांच्यावरील वक्तव्यावरून माफी मागितली नाही तर महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही, असा इशारा भाजपने दिलाय. त्यावरून दानवे यांनी आक्रमक पवित्रा घेतला.

अंबादास दानवे काय म्हणाले?

कुणी कुणाला येऊ देऊ द्यावं, कुणाला अडवावं , या रिकाम्या गोष्टी भाजपने करू नये. हिंदुस्थानात कुणीही कुठं जाऊ शकतं. राहुल गांधी काश्मीर, श्रीनगरला जाऊन आले. महाराष्ट्र काय पाकिस्तान थोडाय? या देशाच्या भूमीचा एक भाग आहे. याला थांबवण्याची भाषा कुणी करू नये. ज्या गावच्या बोरी, त्याच गावच्या बाभळी आहेत. जे म्हणतायत कुणी पाय ठेवू नये… त्यांचा आम्ही पायच शिल्लक ठेवणार नाही, असा इशारा अंबादास दानवे यांनी दिलाय.

मातोश्रीवर राहुल गांधी येणार, स्वागत कसं?

राहुल गांधी उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर येणार असल्याची चर्चा आहे. यावरून अंबादास दानवे म्हणाले, ‘ मातोश्रीवर आतापर्यंत सगळे नेते येऊन गेले आहेत. त्यात फार नवीन असं काही नाही. महाविकास आघाडी एकत्रिकरणाची मोठी प्रक्रिया सुरु आहे. त्यात राहुल गांधी आले तर तो एक प्रमुख भाग आहे. त्यामुळे आले तरी आश्चर्य वाटायचं कारण नाही, असं वक्तव्य अंबादास दानवे यांनी केलंय.

बोरनारे यांना धमकीचं पत्र…

वैजापूरचे शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांना धमकीचं पत्र आलंय. यामागे राजकीय कारस्थान असल्याचा संशय बोरनारे यांनी व्यक्त केलाय. यावरून दानवे म्हणाले, आम्ही अशा प्रकारे धमक्या वगैरे देणार नाहीत, मात्र राजकीय पद्धतीने उत्तर देऊ. बोरनारे यांचा हा सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न आहे. मात्र पोलिसांनी या प्रकरणी योग्य ती चौकशी करावी.