Aurangabad | आता बांधकामासाठी शुद्ध पाण्याच्या वापरावर बंदी, औरंगाबाद मनपा प्रशासकांचा मोठा निर्णय !

| Updated on: May 09, 2022 | 3:06 PM

उन्हाळ्यात हा पाणीपुरवठा अत्यंत अपुरा होत असल्याने नागरिकांकडून वारंवार आंदोलन करण्यात येत आहे. शुक्रवार, शनिवारी सिडको भागातील नागरिकांनी अशाच प्रकारे संताप व्यक्त करत चोवीस तासांपेक्षा जास्त आंदोलन केले. त्यानंतर पाणी प्रश्न सोडवण्यासाठी महापालिकेतर्फे विविध पातळ्यांवर प्रयत्न केले जात आहेत.

Aurangabad | आता बांधकामासाठी शुद्ध पाण्याच्या वापरावर बंदी, औरंगाबाद मनपा प्रशासकांचा मोठा निर्णय !
Follow us on

औरंगाबादः शहरात (Aurangabad city) दिवसेंदिवस पाण्याची वाढती मागणी पाहता, महापालिका (Aurangabad municipal corporation) आयुक्तांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. शहरातील नागरिकांना आता बांधकामाच्या ठिकाणी शुद्ध पाणी वापरता येणार नाही. बांधकामासाठी महापालिकेने नळाद्वारे सोडलेले शुद्ध पाणी वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे. बांधकामासाठी इतर स्रोतांतील (water sources) अशुद्ध पाणी वापरण्यात यावे, असे आवाहन मनपातर्फे करण्यात येत आहे. शहरातील पाणीप्रश्न गंभीर होत असून विविध भागातील नागरिकांना दर आठ दिवसांनी पाणी पुरवठा होतो.उन्हाळ्यात हा पाणीपुरवठा अत्यंत अपुरा होत असल्याने नागरिकांकडून वारंवार आंदोलन करण्यात येत आहे. शुक्रवार, शनिवारी सिडको भागातील नागरिकांनी अशाच प्रकारे संताप व्यक्त करत चोवीस तासांपेक्षा जास्त आंदोलन केले. त्यानंतर पाणी प्रश्न सोडवण्यासाठी महापालिकेतर्फे विविध पातळ्यांवर प्रयत्न केले जात आहेत.

आजचा निर्णय काय?

औरंगाबाद मनपा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी शहरातील बांधकामासाठी आजपासून शुद्ध पाण्याच्या वापरावर पूर्णपणे बंदी घातली आहे. बांधकामासाठी फक्त अशुब्ध पाणी वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच गरज पडल्यास स्विमिंग पूल आणि कमर्शिअल वापरावरही बंधने आणणार असल्याचा इशारा मनपा प्रशासकांनी दिला आहे. तसेच सामान्य नागरिकांनाही पाण्याचा गैरवापर थांबवण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. असा गैरवापर करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करणार असल्याचे सूतोवाचही त्यांनी केले.

हर्सूल तलावातून अतिरिक्त पाण्याचा उपसा

दरम्यान, शहरातील हर्सूल तलावातून दररोज 6 एमएलडी पाणी उपसा केला जातो. शहरातील काही भागाला यातून पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र उन्हाळ्यात पाण्याची मागणी वाढल्याने हर्सूल तलावातून अतिरिक्त पाणीउपसा करण्याची योजना मनपाने आखली आहे. आज सोमवार 09 मे पासून अतिरिक्त पाणी उपशासाठी सुरुवात होत असून यासाठीचे पाइपही आणण्यात आले आहेत. पुढील तीन ते चार दिवसात यासाठीची सोय होईल. यानंतर हर्सूल तलावातून दररोज 8 ते 10 एमलडी पाणी उपसा करण्याची महापालिकेची योजना आहे.