CRIME : म्हणे सोहळा वास्तुशांतीचा, डाव मांडला अल्पवयीनांचा, औरंगाबादेत पोलिसांची मोठी कारवाई!

| Updated on: Feb 11, 2022 | 11:54 AM

ग्रामीण किंवा शहरी भागात कुठेही असे प्रकार आढळल्यास जिल्हा महिला व बालविकास, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी यांना कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

CRIME : म्हणे सोहळा वास्तुशांतीचा, डाव मांडला अल्पवयीनांचा, औरंगाबादेत पोलिसांची मोठी कारवाई!
सांकेतिक छायाचित्र
Follow us on

औरंगाबादः जिल्ह्यातील बिडकीन परिसरात एका घरात वास्तुशांतीचा कार्यक्रम असल्याचे भासवत नागरिकांनी वेगळाच डाव आखला होता. या घरात अल्पवयीन मुलं आणि मुलींचे लग्न (Child marriage) लावून देण्याचा घाट येथील लोकांनी घातला. सुदैवाने चाइल्ड हेल्पलाइनच्या  (Child line)औरंगाबादमधील कार्यालयाला याची माहिती मिळाली आणि या विभागाचे पथक पोलिसांच्या मदतीने घटनास्थळी पोहोचले. याच गावातील आणखी एका ठिकाणीदेखील बालविवाह सुरु होता. पोलिसांनी या दोन्ही ठिकाणी कारवाई केली. बुधवारी 9 फेब्रुवारी रोजी या घटना घडल्या. याप्रकरणी पोलिसांनी (Aurangabad police) पालकांची समजूत घेतली आणि त्यांच्याकडून बंधपत्र लिहून घेतले. आज शुक्रवारी जिल्हा बालकल्याण समितीसमोर हे प्रकरण सादर केले जाणार आहे.

वास्तुशांतीचा केला बनाव

बिडकीन परिसरातील फारोळा गावातील ही घटना आहे. गावातील 14, 15 वर्षांच्या मुली आणि 16,18 वर्षांच्या मुलांचे लग्न लावून देत असल्याची माहिती चाइल्ड हेल्पलाइनच्या औरंगाबाद कार्यालयाला मिळाली होती. त्यानुसार, चाइल्ड हेल्पलाइनचे प्रकल्प व्यवस्थापक, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, कायदा व परिविक्षा अधिकारी यांच्यासह बिडकीन पोलीस ठाण्याचे पथक गावात पोहोचले. तेव्हा 13 वर्षीय मुलीच्या लग्नाची तयारी सुरु होती. वीस ते पंचवीस नातेवाईक त्या ठिकाणी होते. या पथकाने सुरुवातीला चौकशी केली असता एका महिलेने इथे बालविवाह नाही तर वास्तुशांतीचा कार्यक्रम असल्याचे सांगितले. मात्र घरातील तयारी, वल्तू आणि मुलांच्या पेहरावावरून हे लग्न होत असल्याचे स्पष्ट झाले. सदर पथकाने यावेळी पालकांची समजूत घातली. तसेच त्यांच्याकडून बंधपत्र लिहून घेतले. अशाचप्रकारे गावातील आणखी एका ठिकाणी अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यास पथकाला यश आले. शुक्रवारी बालकल्याण समितीसमोर हे प्रकरण सादर केले जाणार आहे.

कोरोना संकटामुळे बालविवाहात वाढ

दरम्यान, मागील दोन वर्षांमध्ये कोरोना महामारीमुळे ग्रामीण भागातील लोकांच्या आयुष्यमानावर परिणाम झाला आहे. अनेक भागातील मुलींचे शिक्षण सुटले. त्यामुळे काही पालक अल्पवयीन मुलींचे लग्न लावून देत आहेत. आता मात्र याविषयी जास्तीत जास्त जनजागृती करण्यात आली पाहिजे. ग्रामीण किंवा शहरी भागात कुठेही असे प्रकार आढळल्यास जिल्हा महिला व बालविकास, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी यांना कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

इतर बातम्या-

नागपूर जिल्हा वार्षिक योजनेचा फक्त पन्नास टक्केच निधी खर्च, उर्वरित निधी महिनाभरात कसा होणार खर्च?

देव तारी त्याला कोणा मारी! अख्खी मालगाडी अंगावरून गेली पण पठ्ठ्याला खरचटलंही नाही..! पाहा Video