Aurangabad| आव्हानं पेलणं कठीण जातंय का? ऊसाचा आयशर पलटला, औरंगाबादेत ड्रायव्हरची आत्महत्या!

| Updated on: May 19, 2022 | 10:24 AM

सोमीनाथ यांनी नेमक्या कोणत्या कारणासाठी आत्महत्या केली, याचा तपास आता पोलीस करत आहेत.

Aurangabad| आव्हानं पेलणं कठीण जातंय का? ऊसाचा आयशर पलटला, औरंगाबादेत ड्रायव्हरची आत्महत्या!
Follow us on

औरंगाबादः कोरोना संकट, सभोवतालच्या अडचणी आणि वाढलेली महागाई यामुळे अनेक ठिकाणचे मध्यमवर्गीय आणि कामगार, मजूर आर्थिक तणावाखाली (Tension) असल्याचं दिसून येत आहे. कुठे गुंडगिरी वाढल्यामुळे एकमेकांचे खून घडतायत तर कुठे जीवनात येणाऱ्या आव्हानांना (Challanges in life) पेलण्याची क्षमता अपुरी पडल्यामुळे ते संपवण्याचा निर्णय घेतला जातोय. औरंगाबादमध्ये असंच एक उदाहरण समोर आलं आहे. औरंगाबादहून नांदेडकडे (Aurangabad to Nanded) ऊस घेऊन जाणारा आयशर विरेगाव जवळील आनंदनगर शिवारात उलटला. त्यानंतर ड्रायव्हरने घटनेची माहिती घरच्यांना आणि ऊस मालकाला दिली आमि लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेतला. बुधवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. सदर ड्रायव्हरने नेमक्या कोणत्या कारणास्तव आत्महत्या केली, याचा तपास पोलीस करीत आहेत, मात्र आयशर उलटणे हे या घटनेसाठी तात्कालिक कारण घडले की हा निर्णय घेण्यामागे आणखीही कारण होते याचा उलगडा लवकरच होईल.

नेमकी घटना काय घडली?

या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमीनाथ बळीराम पवार (37, हर्सूल, औरंगाबाद) असे मृताचे नाव आहे. औरंगाबादहून नांदेडकडे जात असताना जालना तालुक्यातील विरेगावजवळील आनंदनगर शिवारात मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास उलटला. आपला आयशर उलटल्याची माहिती घरी देऊन मुलाला लवकर पाठवा, अशी माहिती फोनवर दिली. ऊस मालकालाही कॉल करून तुमच्या मालाची तुम्ही सोय करून ध्या, अशी माहिती देऊन आयशरलगत अससलेल्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह काढला

मंगळवारी रात्री सोमीनाथ यांनी आत्महत्या केली. यावेळी रात्र गस्तीवर असलेले मौजपुरी पोलीस ठाण्याचे बीट जमादार प्रशांत देशमुख, धोंडिराम वाघमारे यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह खाली उतरवून पोस्ट मॉर्टेमसाठी जालना येथील सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आला. मौजपुरी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

आत्महत्येचं कारण काय?

सोमीनाथ यांनी नेमक्या कोणत्या कारणासाठी आत्महत्या केली, याचा तपास आता पोलीस करत आहेत. केवळ ऊसाचा आयशर पलटला हे कारण आहे का सोमीनाथ हे आणखी वेगळ्याच तणावात होते, याची चौकशी कुटुंबीय आणि मित्रमंडळींकडे केली जात आहे.