Aurangabad | Raj Thackeray शिरखुरमासाठी बोलवण्याच्या लायक नाहीत, दुरूनच ईद मुबारक, खासदार Imtiaz Jaleel यांची प्रतिक्रिया

| Updated on: May 03, 2022 | 10:34 AM

राज ठाकरे यांना तुम्ही शिरखुरमा खाण्यासाठी बोलवाल का, असा प्रश्न खासदार जलील यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी स्पष्ट शब्दात नकार दिला. राज ठाकरे हे आता त्या लायकीचे राहिले नसून त्यांना दुरूनच ईद मुबारक देतो, असे खासदार जलील म्हणाले.

Aurangabad | Raj Thackeray शिरखुरमासाठी बोलवण्याच्या लायक नाहीत, दुरूनच ईद मुबारक, खासदार Imtiaz Jaleel यांची प्रतिक्रिया
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

औरंगाबादः मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यासमोर मी एकदा मैत्रीचा हात पुढे केला. त्यांना इफ्तार पार्टीचे निमंत्रण दिले. मात्र ते आले नाहीत. त्यानंतर औरंगाबादच्या सभेत त्यांनी जी भाषा वापरली त्यानंतर ते बोलावण्याच्या लायकीचेच उरले नाहीत, अशी खंत एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (MP Imtiaz Jaleel) यांनी व्यक्त केली. रमजान ईद (EID) निमित्त खासदार जलील औरंगाबादच्या ईदगाह मैदानावर नमाज पठणासाठी आले होते. यावेळी हजारो भाविकांसोबत त्यांनी नमाज पठण केले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. राज ठाकरे यांना तुम्ही शिरखुरमा खाण्यासाठी बोलवाल का, असा प्रश्न खासदार जलील यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी स्पष्ट शब्दात नकार दिला. राज ठाकरे हे आता त्या लायकीचे राहिले नसून त्यांना दुरूनच ईद मुबारक देतो, असे खासदार जलील म्हणाले.

खासदार जलील यांच्या डोळ्यात अश्रू का?

औरंगाबाद येथील ईदगाह मैदानावर आज खासदार इम्तियाज जलील यांनी हजारो मुस्लिम भाविकांसोबत नमाज अदा केली. नमाज पठण सुरु असतानाच खासदार जलील अचानक भावूक झाले. त्यांच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. रुमालाने अश्रू पूसत त्यांनी नमाज अदा केला. खासदार जलील यांना असं एकाएकी रडू का आलं, असा प्रश्न सर्वांना पडला. मात्र काही वेळाने त्यांनी माध्यमांना यामागचं कारण सांगितलं. कोरोना काळात मागील दोन वर्षात आपण अनेक प्रियजनांना गमावलं. दोनच महिन्यांपूर्वी माझ्या आईचं निधन झालं. आई शिवाय ही पहिली ईद आहे. त्यामुळे आठवणींचा बांध फुटला, अशी भावूक प्रतिक्रिया त्यांनी दिली.

‘शांतता व बंधूप्रेमासाठी प्रार्थना’

राज्यात तसेच देशभरातील स्थिती पाहता शांतता व भाईचारा टिकून राहण्यासाठी आज रमजान ईदनिमित्त अल्लाह कडे प्रार्थना केल्याचं खासदार जलील यांनी सांगितलं. देशातील मशिदींवर आज संकट आलं आहे. नमाज पठणात अडथळे निर्माण केले जात आहे. त्यामुळे देशात शांतता राखणं महत्त्वाचं आहे. मोहम्मद पैगंबरांनी मानवतेची शिकवण दिली आहे. त्यामुळे आजच्या प्रार्थनेत आम्ही फक्त मुस्लिमच नव्हे तर देशभरातील समस्त जाती-धर्माच्या लोकांसाठी प्रार्थना केल्याची प्रतिक्रिया खासदार जलील यांनी दिली.