हेल्मेट न घातल्याने 22 पोलिसांना दंड, औरंगाबाद वाहतूक पोलिसांची कारवाई, हेल्मेटशिवाय आयुक्तालयात एंट्री नाही

| Updated on: Sep 15, 2021 | 2:26 PM

औरंगाबाद: समाजाला शिस्त लावणे आणि कायद्याचा धाक दाखवत गुन्हेगारीचे प्रमाण कमी करण्याची जबाबदारी पार पाडणाऱ्या पोलिसांनाच औरंगाबादेत नियमभंग केल्यामुळे दंड भरावा लागला आहे. तोदेखील वाहतूक पोलिसांच्या कारवाईमुळे (Aurangabad Traffic Police). शहरातील वाहतूक पोलिसांनी हेल्मेट न घालणाऱ्यांविरोधात कठोर मोहीम हाती घेतली आहे. वारंवार होणारे अपघात आणि त्यामुळे नागरिकांच्या जीवाशी होणारा खेळ थांबवण्यासाठी ही कारवाई आवश्यक असल्याचे […]

हेल्मेट न घातल्याने 22 पोलिसांना दंड, औरंगाबाद वाहतूक पोलिसांची कारवाई, हेल्मेटशिवाय आयुक्तालयात एंट्री नाही
हेल्मेट न घालणाऱ्या 22 पोलिसांवरच वाहतूक पोलिसांची कारावाई
Follow us on

औरंगाबाद: समाजाला शिस्त लावणे आणि कायद्याचा धाक दाखवत गुन्हेगारीचे प्रमाण कमी करण्याची जबाबदारी पार पाडणाऱ्या पोलिसांनाच औरंगाबादेत नियमभंग केल्यामुळे दंड भरावा लागला आहे. तोदेखील वाहतूक पोलिसांच्या कारवाईमुळे (Aurangabad Traffic Police). शहरातील वाहतूक पोलिसांनी हेल्मेट न घालणाऱ्यांविरोधात कठोर मोहीम हाती घेतली आहे. वारंवार होणारे अपघात आणि त्यामुळे नागरिकांच्या जीवाशी होणारा खेळ थांबवण्यासाठी ही कारवाई आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. या कारवाईदरम्यान 22 पोलिसांनाच हेल्मेट न घातल्यामुळे दंडाची पावती देण्यात आली आहे. त्यामुळे कायदा हा सर्वांसाठी समान असल्याचा संदेश देण्यात आला आहे. वाहतूक पोलिसांच्या या कारवाईमागील कारणही तितकेच गंभीर आहे. दोन दिवसांपूर्वीच गणेश राजपूत (Ganesh Rajput) या पोलीस कॉन्स्टेबलचा जालना रोडवरील एसएफएस शाळेसमोर अपघात झाला. दोन दिवसांपासून ते बेशुद्धावस्थेत आहेत. असे अपघात भविष्यात टाळण्यासाठी वाहतूक शाखेने मोठी मोहीम हाती घेतली आहे.

अपघातग्रस्त कॉन्स्टेबल गंभीर अवस्थेत

शहरातील पोलीस कॉन्स्टेबल गणेश राजपूत यांचा जालना रोडवर एसएफएस शाळेसमोर अपघात झाला. रस्त्यावरील डिव्हायडरला धडकल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली. दोन दिवसांपासून ते बेशुद्धावस्थेत आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हेल्मेट न घातल्याने अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्यांची प्रकृती सध्या चिंताजनर आहे. ही माहिती कळाल्यावर शहरातील सर्वच पोलिसांनी दुचाकीवर हेल्मेट वापरावे, असे आदेश पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी मंगळवारी दिले.

वाहतूक शाखेची कठोर कारवाई

पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी विना हेल्मेट पोलिसांवर कारवाईचे आदेश वाहतूक शाखेला दिले. त्यानुसार पोलीस आयुक्तालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर वाहतूक शाखेचे कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. या प्रवेशद्वारातून येणाऱ्या-जाणाऱ्या पोलिसांसह सर्वच कर्मचाऱ्यांना, नागरिकांना रोखून हेल्मेट वापरण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. तसेच हेल्मेट न घालणाऱ्या 22 पोलिसांनाही दंडाच्या पावत्या देण्यात आल्या.

हेल्मेटशिवाय आयुक्तालयातच प्रवेश नाही

हेल्मेट न घातल्याने एखाद्याच्या जीवावर बेतू शकते, याचे गांभीर्य लक्षात आणून देण्यासाठी औरंगाबाद पोलीस आयुक्तालयातर्फे पोलिसांनाही कठोर हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्था राखणाऱ्या, समाजाला शिस्त लावण्यासाठी नेमण्यात आलेल्या पोलिसांनाही शिस्त लावण्यासाठी अशा प्रकारची मोहीम हाती घेण्यात आल्यामुळे औरंगाबाद शहरात हा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. ज्या पोलिसांकडे हेल्मेट नाही, त्यांना पोलीस आयुक्तालयात प्रवेशही दिला जाणार नाही, असा नियम तयार करण्यात आला आहे. तसेच हातात हेल्मेट नसेल तर आयुक्तालयातून बाहेर जाण्याचीही परवानगी नाही. विशेष म्हणजे हा नियम पाळला जातोय की नाही, हे पाहण्यासाठी पोलीस आयुक्तालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर 24 तास कर्मचारी तैनात राहणार आहेत.

सामान्य नागरिक व पोलिसांसाठी कायदा सारखाच!

औरंगाबादमध्ये सध्या हेल्मेट न घालणाऱ्यांना 500 रुपयांचा दंड आकारला जातो. औरंगाबाद वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणाले, कायदा हा सर्वांसाठीच समान आहे. सर्वसामान्य नागरिक आणि पोलीस यांच्यात भेदभाव केला जात नाही. त्यामुळे हेल्मेट न घालणाऱ्या पोलिसांवरही आम्ही कारवाई करत असतो. तशीच कारवाई यावेळीही केली आहे. त्यामुळे हेल्मेट सक्ती ही नागरिकांच्या हितासाठीच आहे, हे सर्वांनी लक्षात घेणे महत्त्वाचे आहे, असे आवाहन वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुरेश वानखेडे यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना केले आहे.

इतर बातम्या- 

औरंगाबाद टॉप 5: दिवस आंदोलनांचे, ओबीसी आरक्षणावरून भाजप आक्रमक, तर इतर पक्षही निदर्शनांच्या पवित्र्यात

औरंगाबाद ग्रामीण पोलिसांचा राज्यात डंका, महाराष्ट्रात सर्वोत्कृष्ट पोलीस युनिट म्हणून घोषित